Friday, April 13, 2018

1938 साली देशाला कुटुंबनियोजन सांगणारे राष्ट्रनेते-





1938 साली देशाला कुटुंबनियोजन सांगणारे राष्ट्रनेते - प्रा.हरी नरके
शंभर वर्षांपुर्वी त्यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा, शेतीसमस्या मांडणारं पुस्तक लिहिलं...
बाबासाहेब देशाला "उर्जा साक्षरता व जल साक्षरतेची सर्वाधिक गरज आहे" असं 1942 मध्ये सांगत होते.

देशाची अफाट वाढणारी लोकसंख्या हे भयावह संकट आहे हे ओळखून 1930 च्या दशकात त्यावर उपाययोजना करायचा तळमळीनं सल्ला देणारे तीन महापुरूष होते.
1.जे. आर. डी. टाटा
2. समाजस्वास्थकार र.धो.कर्वे,
आणि
3. डॉ.बाबासाहेब आंबेडकर

टाटा आणि कर्वेंना निवडणुका लढवायच्या नसल्यानं लोकमत, लोकप्रियता यांचा विचार करण्याची गरज नव्हती. लोक नाराज झाले तरी त्याची पर्वा करायची आवश्यकता नव्हती.
जेआरडीसर मला म्हणाले होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धाडशी नेते होते. देशाच्या विकासाचं संकल्पचित्र डोळ्यापुढे ठेऊन काम करणारे नेते होते. त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या 1937 सालच्या निवडणुक जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते की एक किंवा फार फार तर 2 मुलं बस्स असा कायदाच आम्ही करू.
बाबासाहेबांनी आपला शब्द पाळला.

मुंबई विधीमंडळात त्यांनी लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब कल्याण विधेयक आणले.
10 नोव्हेंबर 1938 ते मंजूर व्हावे म्हणून त्यांनी खुप धडपड केली.
तेव्हा त्यांनी कुटुंब नियोजन करणाराला पुरस्कार आणि न करणाराला शिक्षा, थेट तुरूंगवास अशी तरतूद सुचवली होती.

जर मुलांमुलींना चांगलं शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा आणि आनंदी जीवन द्यायचं असेल तर एकावरच थांबा हा त्यांचा नारा होती.
12 डिसेंबर 1938 ला त्यासाठी त्यांनी त्यासाठी मुंबईच्या शिवाजी पार्कवर युवक परिषद घेतली होती.
1952 च्या सालच्या निवडणुक जाहीरनाम्यात त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं होतं की एक किंवा 2 मुलं पुरेत असा कायदा आम्ही करू.

शंभर वर्षांपुर्वी 1918 साली त्यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा, त्यांच्यापुढच्या शेतीसमस्या मांडणारं पुस्तक लिहिलं. "समॉल [small] होल्डींग्ज इन इंडीया अ‍ॅंड देअर रेमेडीज".
शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला.
शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळायला हवा.
शेतकरी सुखी तर देश सुखी.
हे उपाय तातडीने केले नाहीत तर शेतकरी डेंजर झोनमध्ये येईल असं भाकीत त्यांनी शंभर वर्षांपुर्वी केलं होतं.
बाबासाहेबांनी 1929 साली पहिली शेतकरी परिषद घेतली. त्यांनी विधीमंडळावर काढलेला पहिला मोर्च्या दलितांचा नव्हता तर शेतकर्‍यांचा होता.
कसणाराला जमीन मिळावी म्हणून त्यांनी 1932 मध्ये खोती रद्द करण्याचे विधेयक मांडले.
हे पुस्तक ना भक्तांना माहित आहे, ना विरोधकांना.

लंडनहून बाबासाहेब मुंबईला निघाले तेव्हा तिथल्या पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलीसांना टेलीग्राम केला होता, " प्रखर राष्ट्रभक्त, बुद्धीमान आणि उच्च शिक्षित असलेला तरूण भिमराव रा. आंबेडकर तिकडे येतोय, त्याच्यावर 24 तास गुप्त वॉच ठेवा."

बाबासाहेब दलितांचे हे समीकरण इतके घट्टपणे कोरले गेलेय की 1919 साली सर्वप्रथम "सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे" असे साऊथबरो कमिटीला सांगणारे
बाबासाहेब आपल्याला कुठे माहित आहेत?

1928 साली त्यांनी स्टार्ट कमिटीला सांगितले की ओबीसींना घटनात्मक संरक्षण दिले पाहिजे.
1946 ला त्यांनी ओबीसींवर, बारा बलुतेदार अठरा अलुतेदारांवर पुस्तक लिहिले. "शूद्र पुर्वी कोण होते?"
सरकार ओबीसींच्या कल्याणासाठी पावले उचलत नाही म्हणून त्यांनी 1951 ला कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.

स्त्रियांच्या प्रगतीवरून देशाची प्रगती मोजायची असल्यानं स्त्री-पुरूष समता सर्वात अग्रक्रमाची बाब आहे असं ते वारंवार सांगत असत.

देशाचे उर्जामंत्री, पाटबंधारे मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे व विमान वहातूक खात्याचे मंत्री असलेले बाबासाहेब देशाला "उर्जा साक्षरता व जल साक्षरतेची सर्वाधिक गरज आहे" असं 1942 साली सांगत होते.
देशातली पहिली 15 धरणं बांधणारे, देशातल्या मोठ्या नद्या एकमेकीला जोडून दुष्काळ हटवण्याची योजना करणारे, सारा देश हायवेंनी जोडणारे, भारताला विकास हवाय, बिजली, सडक, पाणी म्हणजेच विकास हे सुत्र ते मांडत होते.

अशा महापुरूषाला दलितांपुरते सिमित करणारे आपण भारतीय करंटेच नाही काय?

आधुनिक भारताच्या या महान नेत्याला, राष्ट्रनेते बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!

-प्रा.हरी नरके
संपादक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 17 ते 22

Saturday, April 7, 2018

आणि महात्मा फुले जयंती रूजू लागली-



[महात्मा जोतीराव फुले यांचे अस्सल निगेटिव्हवरून विकसित केलेले कृष्णधवल छायाचित्र.]

थोर सत्यशोधक केशवराव विचारे गुरूजी यांच्याकडच्या दुर्मिळ पुस्तकांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये सातत्यानं शोध घेतल्यावर मला एक खजिना सापडला.
.....................

आपल्या देशात एखादी चांगली गोष्टही रुजायला किती काळ जावा लागतो. त्यासाठी धडपडणारी व्यक्ती अगदी थकून जाते. नाउमेद होते. 25/30 वर्षांपुर्वी तुमच्यापैकी कोणाला महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम झाल्याचे आठवतेय?
नाही ना?
अहो, होतच नव्हती तर आठवणार कुठून?

फुले जयंती ही अगदी ताजी घटनाय, प्रथाय. एक स्फुर्तीदायक उपक्रमाय.
पण त्यासाठी किती रक्त आटवावं लागलं माहितीय?

महात्मा जोतीराव फुले यांच्या महत्वाच्या चरित्रकारांपैकी म्हणजे, पंढरीनाथ सीतराम पाटील, धनंजय कीर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा.गं.बा.सरदार, प्रा.भा.ल.भोळे, प्रा.य.दि.फडके, प्रा.मा.गो.माळी, बा.ग.पवार, प्रा.गजमल माळी यातल्या कोणाच्याही पुस्तकात महात्मा फुलेंची जन्मतारीख दिलेली नाही. त्यांचं 1827 हे जन्मवर्ष फक्त माहित होतं. तारीख सपाडतच नव्हती.

महात्मा फुले यांची जन्मतारीख माहितच नसल्यानं देणार तरी कशी आणि कुठून?
या महात्म्याचं महापरिनिर्वाण 28 नोव्हेंबरला झाल्यामुळे त्यांची पुण्यतिथी किंवा त्यांचा स्मृतीदिन 28 नोव्हेंबरला गंभीरपणे पाळला जायचा. जिभेला/लेखणीला वळण पडल्यामुळे पत्रकार मित्र स्मृतीदिवस साजरा झाला असं लिहीतात/ म्हणतात, जे चुकीचं आहे.

1969 साली महात्मा फुले समग्र वाड्मयाच्या प्रथामावृत्तीच्या प्रस्तावनेत संपादक धनंजय कीर आणि प्रा. स.गं.मालसे यांनी फुल्यांच्या जन्माची एक आठवण नमूद केलेली होती. शनिवारवाड्याला लागलेली आग या घटनेच्या आधारे त्यांनी फुले यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1828 ला झाला असावा अशी एक शक्यता वर्तवून ठेवली होती. त्याबाबत मी त्या दोघांशी प्रत्यक्ष भेटून चर्चाही केलेली होती.

तथापि यात एक अडचण होती. फुल्यांच्या सर्वच चरित्रकारांनी फुले जन्मवर्ष 1827 दिलेले असल्यानं 1828 ची ही नोंद सदोष वाटत होती.पटत नव्हती.
माझं "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हे पुस्तक 1989 ला प्रकाशित झालं. त्यातून कमलताई विचारे यांचा माझा परिचय झाला. थोर सत्यशोधक केशवराव विचारे गुरूजी यांच्या त्या सुनबाई. त्यांच्याकडच्या दुर्मिळ पुस्तकांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये सातत्यानं शोध घेताना मला एक खजिना सापडला.

1891 साली सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं "महात्मा फुले यांचे अमर जीवन" हे चरित्र मला त्यात मिळालं.
स्मृतीशेष कॉ. गोविंद पानसरे यांचे पणजोबा नारायण बाबाजी पानसरे यांनी लिहिलेले हे चरित्र. ते अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे.
त्यांच्या हस्ताक्षरातील काही पत्रंही मिळाली. ते आपलं नाव भलं मोठं लांबलचक लिहित असत. महाधट नारायण बाबाजी पानसरे पाटील."

या चरित्रात पानसरेंनी महात्मा फुले यांची जन्मतारीख 11 एप्रिल 1827 ही दिलेली सापडली.

महात्मा फुले यांच्या जन्माची नेमकी तारीख मिळाली तो क्षण माझ्यासाठी अक्षरश: युरेका ! युरेका! चा क्षण होता.

गुरूवर्य डॅा. य. दि. फडकेसर, डॅा. बाबा आढाव, डॅा. भा. ल. भोळेसर,प्रा.गो.पु.देशपांडे या सार्‍यांशी त्याबाबत बोललो. खात्री करून झाल्यावर त्यांचा पाठींबा मिळवला आणि मगच तत्कालीन मुख्यमंत्री श्री.शरद पवार यांना मी पत्र लिहिलं. सातत्यानं त्याचा पाठपुरावा करावा लागला.खातरजमा करण्यात बराच वेळ गेला.

फुले जन्मतारखेबाबत मी म.टा., तरूण भारत आणि इतर अनेक वर्तमानपत्रात लेख लिहिले.
या जन्मतारखेबाबत शासकीय समितीच्या मान्यतेची सर्व प्रक्रिया पुर्ण करून घेतली.
तेव्हा कुठे मान्यता मिळाली.

मग तातडीनं सर्व शासकीय पुस्तकं आणि दस्तावेजात ही तारीख नोंदवली.
मुख्य म्हणजे विधानभवनातील महात्मा फुले पुतळ्याखाली ही नोंद करून घेतली.

महात्मा फुले यांची शासनस्तरावर तोपर्यंत झळकलेली रंगीत तैलचित्रं चुकीची होती.
गोपीनाथराव पालकर, डॅा. बाबा आढाव आणि विजय व सरोजा परूळकर यांच्या सहकार्यानं महात्मा फुले यांच्या काचेच्या अस्सल निगेटिव्हवरून त्यांचा अस्सल कृष्णधवल फोटो विकसित करण्यात आम्हाला यश आलं. त्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळालं.

28 नोव्हेंबर 1992 ला शासनातर्फे या अस्सल कृष्णधवल छायाचित्राचे प्रकाशन करून त्यावर ही तारीख नोंदवली.
सदर फोटो हजारोपट मोठा करून फुलेवाड्यात बसवला.

सातत्याने गेली 25/30 वर्षे चिकाटीनं पाठपुरावा आणि धडपड, प्रयत्न केल्यानंतर आता कुठं महात्मा फुले जयंती साजरी होऊ लागलेली आहे.
कालच देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी या वर्षीपासून महात्मा फुले जयंती देशभर करणार असल्याचं जाहीर केलं.
या वर्षीपासून ही जयंती अनेक ठिकाणी होईल असं चित्र आहे.

अर्थात ती नाचगाणी, फ्लेक्स, डि.जे. उन्मादी जल्लोश, नाच तमाशे असल्या ओंगळवाण्या पद्धतीनं होऊ नये. शिक्षण, प्रबोधन, संवाद,जनजागरण, साहित्य,कला यांच्या माध्यमातून ही जयंती संस्मरणीय व्हायला हवी.
एकुण काय?

एखादं चांगलं काम रुजायलाही खुप काळ लोटावा लागतो. खुप पाठपुरावा करावा लागतो.
पण सत्य आणि कळकळ असेल तर यश मिळतंच.
-प्रा. हरी नरके
............................................

Monday, April 2, 2018

डॉक्टर उच्च कुळातला आणि देखणाच असावा- डॉ.आनंदीबाई जोशी




एखादी व्यक्ती कितीही बुद्धीमान आणि कर्तबगार असली तरी ती ज्या काळात जन्मते, वाढते त्या काळाचा प्रभाव तिच्यावर असतो. त्या काळातील विचारधारा आणि समजुती यांचा पगडा असतो. त्या संस्कार आणि दबावातून मुक्त होणं ही सोपी गोष्ट नसते.
फक्त मोजक्या समाजक्रांतिकारकांनाच काळाच्या पुढचं दिसत असतं.

डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांनी लहान वयात अमेरिकेला जाऊन तिथल्या पेनसिल्व्हानिया महिला वैद्यकीय महाविद्यालयाची 2 वर्षीय पदविका [ डिप्लोमा ]
मिळवणं ही ऎतिहासिक गोष्ट होती.

त्यांच्या आद्य चरित्रकार कॅरोलिना डाल यांनी 1888 साली म्हणजे आनंदीबाईंच्या मृत्यूला 1 वर्ष व्हायच्या आत आनंदीबाईंचे चरित्र इंग्रजीत लिहून प्रसिद्ध केले होते.
[The Life of Dr. Anandibai Joshi, Carolina Dall, 1888] त्यात त्यांनी Diploma असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

त्यासाठी डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांनी लिहिलेला शोधनिबंध वाचताना आनंदीबाईंच्या विचारांचा परिचय होतो.
त्या भारताबद्दल अतिशय कडवट बनल्या होत्या.
अमेरिकेला जाण्यापुर्वी त्यांनी कलकत्त्याजवळील श्रीरामपूरला एक भाषण केले होते.
त्यात त्यांनी भारताइतका रानटी देश जगात दुसरा नाही, अशी जाहीर टिका केलेली होती.

त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता, " Obstetrics among the Aryan Hindus "
त्या ब्राह्मण स्त्रियांबद्दल लिहितात. ब्राह्मणांच्यात काय शिकवलं व आचरलं जातं यावर त्या प्रकाश टाकतात.
इतर भारतीय स्त्रियांच्या आरोग्याबद्दल मात्र त्या अवाक्षरही लिहित नाहीत. त्यांनी आपल्या विषयाला नाव हिंदू दिलं असलं तर तरी त्यांनी स्वत:ला एकाच जातीपुरतं मर्यादित केलेलं होतं.
हा शोधनिबंध अतिशय ढोबळ व त्रोटक आहे. वर्णनपर आणि परिचयात्मक आहे.
यात विश्लेषक व चिकित्सक वृत्तीचा संपुर्ण अभाव असल्याचं व आनंदीबाईंची मतं एकांगी असल्याचा अभिप्राय त्यांचे चरित्रकार व्यक्त करतात. त्यांनी खरं तर "Obstetrics among the Brahmins" असं शीर्षक दिलं असतं तर शोभून दिसलं असतं असं त्यांच्या चरित्रकार अंजली किर्तने म्हणतात. [पृ.323]

"डॉक्टर हा दिसायला सुंदर असावा. तो उच्च कुळातलाच असायला हवा.
मनुने घालून दिलेली नियमावली, त्यांची शास्त्रवचने बरोबरच आहेत.ती मोडणं हे पाप आहे.
बालविवाहाची प्रथा योग्यच आहे.
गरोदर स्त्रियांनी वारंवार प्रार्थना कराव्यात, गर्भपाताची शक्यता दिसत असेल तर वैद्यकीय उपचार घेण्याऎवजी प्रार्थना कराव्यात असं त्या पुन्हापुन्हा सांगतात. बाळंतिन अडली आणि शस्त्रक्रियेची वेळ आली तर काय करावं याचं उत्तर देताना त्या लिहितात, मानवी प्रयत्न आणि प्रार्थना कराव्यात.
आई जर तापट, भावनाप्रधान आणि स्वार्थी असेल तर मुलंही तशीच जन्मतात. त्या केवळ शारिरिक अनुवांशिकतेबद्दल बोलत नाहीत. माणसाचा स्वभाव अनुवांशिक असतो असं त्या सांगतात.
मुलाला स्तन्य देताना मुलाची आई ज्या जातीची असेल त्याच जातीची दाई असायला हवी."

ही  मतं त्यांच्या शोधनिबंधातली आहेत.
स्वत: आनंदीबाई दिसायला सुंदर नव्हत्या, सामान्य होत्या असं त्यांच्या तिन्ही महिला चरित्रकारांनी नोंदवलेलं आहे.
तरी डॉक्टर हा दिसायला सुंदरच असावा असं मत आनंदीबाईंनी नोंदवावं याची गंमत वाटते.
- प्रा.हरी नरके