Friday, March 9, 2018

मेरा पांडुरंग नही दुंगी-

मेरा पांडुरंग नही दुंगी- प्रा.हरी नरके
10 मार्च 1897 ला सावित्रीबाई गेल्या. काम करता करता गेल्या.
पुण्या-मुंबईत प्लेगनं कहर मांडला होता. शेकडो माणसं दररोज मरत होती. त्यांच्या मृत्यूची नोंद करायला नगरपालिकेजवळ कारकून नसल्यानं आज 367 लोक मेले. आज 289 लोक लोक मेले अशा नोंदी नगरपालिकेच्या दप्तरात केल्या जात होत्या.

ब्राह्मण विधवेकडून दत्तक घेतलेला सावित्रीबाईंचा मुलगा यशवंत डॅाक्टर होता. तो सैन्यात नोकरीला होता. सावित्रीबाईंनी त्याला तार करून पुण्याला बोलावून घेतले. हडपसरजवळ ससाणे मळ्यात तंबू टाकून दवाखाना सुरू करायला लावला. तो आईला ह्या आजाराची भीषणता समाजावून सांगत होता. सावित्रीबाईंचा एकच प्रश्न होता, "आज जोतीराव असते तर ते निष्क्रिय बसून राहिले असते काय? आपल्याला जमेल तेव्हढ्यां रूग्णांना आपण वाचवूया."

त्याकाळात न अ‍ॅंब्युलन्स होती ना स्ट्रेचर. आजार भयानक होता. संसर्गजन्य होता. आजारी माणसाला स्पर्श केला तर माणूस मरतो हे डोळ्याला दिसत असल्यानं पुणे शहरावर मृत्यूची छाया पसरलेली होती. कुणीही मदतीला येत नव्हतं. पुणे शहरभर प्लेगच्या उंदरांचं आणि गिधाडांचं साम्राज्य पसरलेलं होतं.

अंधश्रद्धेमुळं लोक औषधपाणी करायला, घरात फवारणी करून घ्यायला घाबरत होते. पुण्यात रॅंडसाहेब आरोग्याची सक्ती करीत असल्याची नाराजी वाढत होती.
सावित्रीबाई एकटीनं घरोघर फिरून आजारी असलेल्या लहान मुलं, मुली, महिला यांना उपचारासाठी यशवंतच्या दवाखान्यात घेऊन जात होत्या. स्वत: त्यांची सुश्रुषा करीत होत्या.

इतक्यात मुंबईत कामगार नेते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर, रूग्णांवर उपचार करताना गेल्याची बातमी आली. सावित्रीबाईंना शोक अनावर झाला. जवळचा खंदा कार्यकर्ता गेला.
पण त्या रडत बसल्या नाहीत. उठल्या नी पुन्हा कामाला लागल्या.

पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी जिवाच्या भितीनं गावोगावी पांगले होते.

सावित्रीबाईंनी कित्येकांना वाचवले. बरे केले.

मुंढव्याच्या दलित वस्तीतल्या गायकवाडांच्या मुलाला प्लेग झाल्याचं सावित्रीबाईंना समजलं. गायकवाड अस्पृश्य मानले जात असल्यानं सरकारी वैद्यकीय कर्मचारीही मदत करीत नव्हते.
सावित्रीबाई तिथं धावून गेल्या.

पांडुरंग गायकवाड 11 वर्षांचा होता. काखेत गोळा आलेला. तापानं फणफणलेला.
एका चादरीत पोराला गुंडाळलं. पाठीवर घेतलं.

सावित्रीबाईंचं वय झालेलं होतं. गेली पन्नास वर्षे त्या अहोरात्र राबत होत्या. 7 वर्षांपुर्वीच जोतीराव गेलेले होते.
मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा, व्हाया मगरपट्टा पल्ला मोठा होता.

67 वर्षे वयाची एक म्हातारी बाई अकरा वर्षांच्या आजारी पोराला पाठीवर घेऊन साताठ किलोमीटर चालत जाते.
त्याच्यावर उपचार करते. त्याला बरा करते. पांडुरंग जगतो. मोठा होतो.

सावित्रीबाई त्याला पाठीवर घेऊन चालल्या असतील तेव्हा त्या नक्की प्लेगला सांगत असणार, "मेरा पांडुरंग नही दुंगी."
मृत्यूला त्यांच्यापुढे पराभव पत्करावा लागला.

पण त्याच काळात, त्याच कामात सावित्रीबाईंना मात्र प्लेगचा संसर्ग झाला.
पांडुरंग हा त्यांनी वाचवलेला शेवटचा रूग्ण.

सलग 50 वर्षे आपला देह या समाजासाठी, महिला, मुलं, मुली यांच्यासाठी त्यांनी वाहिलेला होता. आता देह थकला होता.
10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई प्लेगमध्ये रूग्णसेवेचं काम करता करता गेल्या.

राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणारे इतिहासात अजरामर झाले.
या सामाजिक शहीदांसाठीही आपण एखाद दुसरा आसू असू द्यावा.
-प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment