Tuesday, March 6, 2018

वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद न बाळगणे हे बाबासाहेबांचे वैशिष्ट्य: प्रा. हरी नरके

https://unishivsandesh.blogspot.in/2018/03/blog-post_6.html प्रा. आलोक जत्राटकर
वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद न बाळगणे हे बाबासाहेबांचे वैशिष्ट्य: प्रा. हरी नरके
इतिहास अधिविभागात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
कोल्हापूर, दि. ३ मार्च: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांच्या समकालीनांसमवेत वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक मनभेद कधीही बाळगले नाहीत, हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग व सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. आंबेडकर आणि त्यांचे समकालीन (समानता आणि मतभिन्नता- एक अभ्यास)’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषक म्हणून ते बोलत होते. इतिहास अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मानव्यविद्या विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील होत्या.
प्रा. नरके यांनी डॉ. आंबेडकर आणि त्यांचे समकालीन असणारे समतुल्य नेते यांच्यातील सहसंबंधांचा अत्यंत व्यापक परिप्रेक्ष्यातून वेध घेतला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे महान नेते होते व आहेत. तथापि, अलीकडील काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर या इतिहासपुरूषांचे इतक्या मोठ्या प्रमाणात दैवतीकरण करण्यात येत आहे की त्यांची चिकित्सा करता येणेही मुश्कील होऊ लागले आहे. अनुल्लेख (Conspiracy of Silence) आणि अतिदैवतीकरण (Conspiracy of Glorification) या दोन्ही बाबी एखाद्या महान व्यक्तीमत्त्वाच्या कर्तृत्वाविषयी झाकोळ निर्माण करण्यासाठी पुरेशा ठरतात. त्यांचे अनुयायी आणि विरोधक या दोहोंकडून त्यांचा वेळोवेळी वापर करण्यात येत असतो. ऐतिहासिक संशोधनामध्ये पुरावे, दस्तावेजांच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीच्या कार्याची मोकळेपणी चिकित्सा करण्याची, तसेच त्याविषयी मोकळेपणाने, निर्भयपणाने मांडणी करण्याची आवश्यकता असते. मात्र, आज नेमक्या त्याच बाबी धोक्यात आल्या आहेत. स्वतः बाबासाहेबांनी आपले तरुण चरित्रकार धनंजय कीर यांना आपल्यासारख्या सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीचे चरित्र लिहीण्यासाठी परवानगी मागण्याची आवश्यकता नसल्याचे कळविले होते. चरित्र लिहील्यानंतर प्रसिद्ध होण्यापूर्वी वाचून दुरुस्ती करणे म्हणजे ती लादलेली सेन्सॉरशीप असेल, असे म्हणून त्यालाही नकार देऊन आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविणारे बाबासाहेब हे सच्चे संशोधक असल्याचे यातून स्पष्ट होते.
प्रा. नरके पुढे म्हणाले, बाबासाहेब आणि त्यांचे समकालीन असे म्हटले की, सर्वप्रथम त्यांचे आणि महात्मा गांधी यांच्या संबंधांचा विचार पुढे येतो. या दोन्ही व्यक्ती आपापल्या ठिकाणी मोठ्या होत्या. त्या काळावर त्यांनी स्वतःची नाममुद्रा उमटविलेली आहेच. पण या दोघांच्याही मोठेपणात, दोघांच्याही विकासात त्यांचा परस्परांचा अत्यंत मोलाचा वाटा होता, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. तीच बाब काँग्रेस अर्थात तत्कालीन काँग्रेसचे नेते जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद आणि मौलाना आझाद यांच्या आंबेडकरांशी असलेल्या संबंधाच्या बाबतीतही होते. घटना समितीमध्ये बाबासाहेबांना आणण्यासाठी बॅ. जयकरांच्या रिक्त जागेवर त्यांना निवडून आणण्यास गांधींनी सांगितले आणि काँग्रेसने बाबासाहेबांना बिनविरोध निवडून दिले. तत्पूर्वी, १९४२मध्ये बाबासाहेबांनी ‘गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांचे काय केले?’ हा ग्रंथ लिहील्याने काँग्रेसमध्ये त्यांच्याविषयी नाराजी स्वाभाविक होती. तथापि, घटना समितीसमोर भाषण करताना बाबासाहेबांनी सर्व सदस्यांना असे आवाहन केले की, आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या गटाचे नेते आहोत, पण आता आपण आपले सारे गटतट विसरून, सारे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊ या आणि येथून पुढे शतकानुशतके भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशी घटना एकदिलाने निर्माण करू या. बाबासाहेबांच्या या आवाहनाने समस्त काँग्रेसजन चकित झाले होते. त्यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेचे स्वागत केले. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे घटना समितीत काँग्रेसचे ८२ टक्क्यांहून अधिक बहुमत असूनही त्यात विरोधकांनाही स्थान देण्याचे औदार्य त्यांनी दाखविले. त्याचप्रमाणे हजरजबाबी युक्तीवाद करून आपल्या विरोधकांनाही आपले म्हणणे पटवून देऊन मतपरिवर्तन घडवून आणण्याचे बाबासाहेबांचे कौशल्यही वादातीत होते, याची प्रचिती घटना समितीत वेळोवेळी आलेली आहे. त्यामुळेच भारताच्या बहुविधतेच्या संस्कारांचे जतन करण्याच्या भूमिकेतून परंपरा व परिवर्तन यांचा मेळ घालणारी राज्यघटना स्वतंत्र भारताला लाभली, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
बाबासाहेबांच्या समकालीन संदर्भांचा अभ्यास करीत असताना स्त्री-पुरूष समता, सृजनशील ज्ञाननिर्मिती व कौशल्य विकास, कृतीशील जातिनिर्मूलन, चिकित्सा आणि लोकशाही मूल्यांची जोपासना या पंचसूत्रीचा आधार अभ्यासकांनी घेण्याची आवश्यकता प्रा. नरके यांनी प्रतिपादन केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भारती पाटील म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या समकालीनांचा विचार करताना दलितमुक्ती चळवळीतील नेते-कार्यकर्ते, काँग्रेसमधील नेते, ‘हिंदुराज्या’ची मागणी करणारे समकालीन नेते, तत्कालीन स्त्रीवादी विचारवंत आणि बौद्ध धम्माच्या अनुषंगाने बाबासाहेबांशी विचारांचे आदानप्रदान करणारे विचारवंत अशा विविधांगांनी त्यांचा वेध घेणे शक्य आहे. त्याचप्रमाणे तत्कालीन परिस्थितीत चर्चेची, वादविवादांची जी पृष्ठभूमी होती, ती सद्यपरिस्थितीत किती स्थिर, किती अस्थिर झालेली आहे, या अनुषंगानेही चर्चा होणे आवश्यक आहे. यावेळी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. नंदा पारेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. अवनिश पाटील यांनी परिचय करून दिला. सह-समन्वयक डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. डॉ. नीलांबरी जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी माजी अधिविभाग प्रमुख डॉ. अरुण भोसले, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, प्रा. सुरेश शिपूरकर, प्रा. व्यंकाप्पा भोसले, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. टी.एस. पाटील, डॉ. ओमप्रकाश कलमे, डॉ. चंद्रकांत कुरणे, डॉ. कविता गगराणी यांच्यासह अनेक संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tuesday, 6 March 2018

No comments:

Post a Comment