Sunday, December 30, 2018

महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचा निरोप घेताना









२०१८ मध्ये महत्वाच्या ५ ग्रंथांच्या सुधारित आवृत्त्या मला प्रकाशित करता आल्या.
१. महात्मा फुले : समग्र वाड्मय,
२. सावित्रीबाई फुले : समग्र वाड्मय,
३. आम्ही पाहिलेले महात्मा फुले,
४. महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ,
५. महात्मा फुले: गौरव ग्रंथ,
या पुस्तकांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महात्मा फुले : समग्र वाड्मयच्या आठ महिन्यात तीन आवृत्त्या संपल्या

या मालिकेतला ६वा ग्रंथ, "महात्मा फुले:शोधाच्या नव्या वाटा" हा प्रकाशनासाठी तयार आहे.
इतरही डझनभर पुस्तकांची कामं पुर्णतेच्या जवळ पोचलेली आहेत.
आणखी काही पुस्तकं छपाईच्या प्रक्रियेत पाईपलाईनमध्ये आहेत.
सध्या प्रकाशनाच्या प्रक्रियेत असलेली ही पुस्तके प्रकाशित होतील की नाही हे मला माहित नाही.

सध्या या ग्रंथ प्रकाशन समितीची सुत्रे सनातनी, सरंजामी, जात्यंधाच्या हातात आहेत.
मुलत: फुले आंबेडकरद्वेशावरच ते पोसले गेलेले आहेत. प्रबोधनाशी हाडवैर असलेल्यांना समाजक्रांतीच्या विचारांबद्दल जन्मजात आकस आहे.नफरत आहे. या समतावादी विचारांचे विकृतीकरण करण्यासाठी तसेच हे विचार नष्ट करण्यासाठी आजवर ते कार्यरत होते. आजही आहेत.

सगळेच राजकारणी फुले-शाहू-आंबेडकरांचा जप करीत असतात. मात्र या सरकारी ग्रंथ प्रकाशन समितीकडे एकही मुद्रीतशोधक, संशोधन सहाय्यक किंवा संपादन सहाय्यक नाही. कधीही नव्हते. सगळे काम एकहाती संपादक/सदस्य सचिवाला करावे लागते. त्याचा प्रवासखर्चही मिळाला तर पाच दहा वर्षांनी कधीतरी मिळतो.
सदस्य सचिवाला या पुर्णवेळ कामासाठी शिपाई, हमाल, झाडूवाले आदींच्या मासिक पगाराच्या २५% पेक्षाही कमी मानधन मिळते. अर्थातच तेही आठदहा वर्षांनी कधीतरी मिळते.

खरंतर हा सगळा थॅंकलेस जॉब आहे.भरपूर शिव्या, दूषणे आणि मन:स्तापाचा खुराक मात्र मुबलक मिळतो. टेल्कोतली माझी नोकरी सोडून मी हे काम करण्यासाठी गेलो. अनेक हिन्दी, मराठी, इंग्रजी पुस्तकं प्रकाशित केली. शंभर वर्षात महात्मा फुले साहित्याचे हिन्ही, इंग्रजीत भाषांतर झालेले नव्हते. ते केले. त्यातून बंगाली, तेलगू, गुजराती, उर्दू, मल्याळम, कन्नड, सिंधी, उर्दूत अनुवाद होऊन फुले साहित्य देशभर पोचले. लोकव्यवहार आणि शासनव्यवहार यात फक्त ’स्व’हित पाहिले जाते. सामाजिक कृतज्ञतेचा बहुधा दुष्काळ असतो. फुले-आंबेडकरी चळवळीबद्दलची माझी समज खूपच भाबडी होती असे आज मला वाटते. प्रबोधन चळवळीच्या ह्या कामासाठी टेल्को सोडण्याचा, पुर्णवेळ वाहून घेण्याचा, स्वत:चे प्रचंड आर्थिक नुकसान करून घेण्याचा निर्णय चुकला की काय अशी मला आज शंका येते.

महात्मा फुले यांच्या जीवनावर संशोधनाच्या नव्या प्रकाशात अद्ययावत चित्रपट करावा असा प्रस्ताव मी १९९९ साली राज्य शासनाला दिला होता. तो स्विकारला गेला होता. त्याच्या निर्मितीचे काम एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेल यांच्याकडे सोपवले गेले होते. विजय तेंडूलकर, य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, भा.ल.भोळे अशा दिग्गजांसोबत मला संशोधन व स्क्रिप्टवर काम करायला मिळेल हा आनंद होता.
तथापि ही चित्रपटनिर्मिती १८ वर्षे रखडली. त्याची कारणे सरकार, एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेल हेच सांगू शकतील. या काळात संशोधन व स्क्रिप्ट टीममधल्या काही मान्यवरांचे निधन झाले. आता एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेलांकडचे हे काम नविन संस्थेकडे सोपवण्यात आलेले आहे.
नवी टिम ह्या कामाला गती देणार आहे.
२०१९ मध्ये ही संस्था महात्मा फुले यांच्या जीवनावरील भव्य अशा हिंदी, मराठी, इंग्रजीतील चित्रपटाची निर्मिती करील अशी आशा आहे.

प्रा.हरी नरके, ३१ डिसेंबर, २०१८

Friday, December 28, 2018

तेथे पाहिजे जातीचे -बॅकलॉग, प्रा.हरी नरके


श्री.विनोद तावडे ज्या ज्या खात्यांचे मंत्री आहेत तिथल्या बहुतेक सर्व समित्या, संस्था, प्राधिकरणे यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करताना एक सुत्र प्रमुख असल्याचे
दिसते. त्यांनी या ४ वर्षात खालील नियुक्त्या केलेल्या आहेत.
१. बालभारती, इतिहास समिती - अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
२. भाषा सल्लागार समिती, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
३. साहित्य संस्कृती मंडळ, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
४. सारथी, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
५. ग्रंथ खरेदी तपासणी समिती, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
६. साहित्य संस्कृती मंडळ, अध्यक्ष- श्री. बाबा भांड,
७. महाराजा सयाजीराव गायकवाड ग्रंथ समिती, सचिव- श्री. बाबा भांड,
८. उत्कृष्ठ वाड्मयनिर्मिती राज्य पुरस्कार समिती, अध्यक्ष- श्री. बाबा भांड,
९. राजर्षी छ.शाहू ग्रंथ समिती- सचिव- प्रा. रमेश जाधव,
१०. भाषा सल्लागार समिती, अध्यक्ष, प्रा. दिलीप धोंडगे,

११.. १२.. १३.. १४..१५..
अध्यक्ष वा सचिवपदी निवड झालेले हे सर्व गुणवंत मान्यवर त्यांच्या योग्यतेमुळे निवडले गेलेले आहेत यात शंका नसावी..
ते मंत्रीमहोदयांचे स्वजातीय असणे हा निव्वळ योगायोग समजावा. तो काही त्या अध्यक्षांचा वा सचिवांचा गुन्हा नाही.
अशा पद्धतीने गुणीजनांचा आजवर गेल्या ६० वर्षात असलेला बॅकलॉग बहुधा प्रथमच भरला जात असावा.
- प्रा.हरी नरके, २८ डिसेंबर, २०१८

Tuesday, December 25, 2018

डॉ. आंबेडकर प्रकाशन समिती वाद






राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आंबेडकरप्रेमी आहे, हे आता तरी समजून घ्यावे : तावडे, डॉ. आंबेडकर प्रकाशन समिती वादावर उत्तर, विशेष प्रतिनिधी | पुणे
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आस्था, आदर आणि प्रेम बाळगणारे आंबेडकरप्रेमी आहेत, याचा शोध जर या निमित्ताने कोणाला लागला असेल तर त्याचे स्वागतच आहे,' अशी खोचक प्रतिक्रिया राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ चरित्र साधने प्रकाशन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष विनोद तावडे यांनी दिली. राज्य शासनाने या समितीवर नव्याने केलेल्या नियुक्त्यांना विराेध करणाऱ्यांना तावडेंनी ही उत्तर दिले.
'शासकीय समित्यांवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हा नियमित कामकाजाचा भाग असतो. यामध्ये कोणी राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही. कोणती व्यक्ती कोणत्या विचारधारेशी बांधील वगैरे कोणताही विचार करण्याचे कारण नाही. डॉ. आंबेडकरांचे महान कार्य जगात पोहोचवण्याचा दृष्टिकोन ठेवून ताज्या दमाच्या, सक्षम व्यक्तींकडे ही जबाबदारी सोपवण्याचा विचार शासनाने केला. बाकी कोणताही हेतू नाही. 'संघाची माणसे नेमली' हा दावा निरर्थक आहे,' असे तावडेंनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.
डॉ. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निवृत्त उपकुलसचिव डॉ. सुधाकर बोकेफोडे यांना समितीचे सचिव करण्यात आले आहे. त्यांच्यापूर्वी ही जबाबदारी दिवंगत प्रा. अविनाश डोळस यांच्याकडे होती. 'कोणत्या निकषांवर आपली निवड झाली?' या प्रश्नावर डॉ. बोकेफोडे यांनी सांगितले, गेली ३२ वर्षे मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. व्यवस्थापनात माझा हातखंडा आहे. आंबेडकरी चळवळीशी मी निगडित आहे. याच विषयावर माझी दुसरी पीएचडीदेखील चालू आहे. हिंदुत्ववादी संघटनांशी जोडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याबद्दल अधिक न बोलणेच इष्ट ठरेल. डॉ. आंबेडकरांचे सर्व उपलब्ध साहित्य जगभरच्या नव्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. इंटरनेटच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचे विचार आणखी विस्तृतपणे जगापुढे कसे ठेवता येतील यावर आमचा भर असेल. डॉ. आंबेडकरांचे अजूनही काही लेखन अप्रकाशित राहिले असेल तर त्याचा शोध घेण्याचाही प्रयत्न समिती करेल,' असे ते म्हणाले.
हिणवऱ्यांबद्दल बाेलणार नाही : मिलिंद कांबळे
नूतन समिती सदस्य मिलिंद कांबळे म्हणाले की, आम्हाला 'नवआंबेडकरवादी' किंवा 'जातीयवादी' म्हणून हिणवणाऱ्यांबद्दल मी काहीच बोलणार नाही. परंतु, डॉ. आंबेडकर यांचे सर्व उपलब्ध जगभर पोहोचवणारे खास संकेतस्थळ मी सर्वात पहिल्यांदा अठरा वर्षांपूर्वीच सुरू केले. 
डॉ. बाबासाहेबांचा अर्थक्रांतीचा, उद्यमशीलतेचा विचार देशभरच्या दलितांमध्ये रुजवून त्यांच्यात उद्योजक घडवण्यासाठी 'दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'ची मुहूर्तमेढ मी रोवली. केवळ 'बोलका विचारवंत' न राहता डॉ. आंबेडकरांचे विचार जास्तीत जास्त आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याने कदाचित माझी निवड या समितीवर झाली असे मला वाटते.' असेही कांबळे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
नेमका वाद आहे तरी काय ?
डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचा प्रचार करणारी समिती संघ स्वयंसेवकांच्या ताब्यात गेली आहे, डॉ. आंबेडकरांच्या साहित्याशी फारसा संबंध नसलेली मंडळी या समितीवर आल्याचे सांगून वाद निर्माण केला जात आहे. डॉ. भीमराव भोसले, प्रा. रमेश पांडव, डॉ. सुनील भंडगे, प्रा. वैजनाथ सुरनर, डॉ. राजन गवस, डॉ. शरणकुमार लिंबाळे, डॉ. श्यामराव अत्रे, मिलिंद कांबळे आणि इतर नवे सदस्य संघाशी संबंधित असल्याचा आरोप हाेत आहे.
समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात : हरी नरके
साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. आंबेडकर समितीवर यापूर्वी काम केलेले हरी नरके आदींनी नव्या नेमणुकांवर नाराजी व्यक्त केली आहे. 'अपरिचित लोकांची समिती' या शब्दांत डॉ. वाघमारे यांनी टीका केली, तर नरके यांनी 'नव आंबेडकरवाद्यांच्या समितीला हार्दिक शुभेच्छा' अशी बोचरी प्रतिक्रिया साेशल मीडियातून व्यक्त करत ही संपूर्ण समिती रा. स्व.संघाच्या ताब्यात गेल्याचे म्हटले आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/…/25122018/0/5/
दिव्य मराठी, नाशिक, मंगळवार, दि. २५ डिसेंबर २०१८,पृ.५ Published on 25 Dec-2018 
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/…/25122018/0/5/

Monday, December 24, 2018

ब्रिलियंट कॉंमेडी, रापचिक म्युझिकल आणि जळजळीत वास्तवाची अनोखी सफर




काल बालगंधर्वला तोडी मिल फॅंटसी चा शुभारंभाचा प्रयोग बघितला. ह्या ब्रिलियंट कॉंमेडी आणि हटके म्युझिकल असलेल्या, तनमनाला प्रसन्न झिणझिण्या आणणार्‍या,गारूड करणार्‍या  अनुभवातून मला अद्यापही बाहेर येता आलेलं नाहीय. आज मराठी रंगभुमीवर पाचकळ विनोदी आणि कृत्रिम मध्यवर्गीय जाणिवांच्या नाटकांची चलती आहे. मात्र खरा विनोद किती धमाल असतो, तो किती खळखळून हसवतो, हसताहसता डोळ्यातून पाणीही काढतो याचा अस्सल अनुभव घ्यायचा असेल तर मग तुम्ही "तोडी मिल फॅंटसी" हे नवं नाटक बघायलाच हवं. यातलं रापचिक म्युझिक तुम्हाला भन्नाट जगात घेऊन जातं. यातली आजच्या तरूणाईची बोली आणि प्रमाण भाषेचं देखणं मिश्रण करणारी जिवंत भाषा आरपार भिडते. ही सगळीच टीम अवघ्या पंचविशीतली आहे. कलेच्या जगात आज नविन काहीच घडत नाही, सगळं कसं शिळंशिळं आणि घिसंपिटं असतं, आजकालची तरूण मुलं फारशी गंभीर नाहीत असली टिका करणारांनी तर हे नाटक आजिबात चुकवता कामा नये. आजच्या भाकड मालिकांच्या, निर्बुद्ध करमणूकीच्या आणि नटव्या बॉलीवूडच्या जगात अडकलेल्या प्रेक्षकांना इतका पॉवरफुल कंटेट व सादरीकरण आणि अस्सल अभिनय रंगभुमीवर फार क्वचितच पाहायला मिळेल.

हे नाटक जिथे घडतं ती जागा युनिक आहे. आजवर कोणत्याही सिनेमा-नाटकात या स्थळावर नाटक घडताना मी तरी बघितलेलं नाही. मुळात तिथं नाटक घडू शकतं असा विचारच एकदम भारीय. तो सादर करताना त्यातलं नाट्य कमालतर विकसित केलंय. त्यासाठी वापरलेलं नेपथ्य, लाईट्स, म्युझिक सारंच कल्पक, अस्सल नी अफलातून आहे. मुलत: आजच्या बदलत्या जगावरचं ते एक व्यंग आहे. त्यातला जळजळीत उपरोध आणि जादूई वास्तववाद काळजाला भिडणारा आहे. आजच्या पिढीचं आजचं नाटक. एकदम हटके.

आजची ही पंचविशीतली महानगरी क्रियेटिव्ह तरूणाई स्टार्टअप इंडीयाची बघत असलेली स्वप्नं, त्यांचा ओरिजिनल असा धगधगता जिवनानुभव फॅंटसीच्या अंगाने आपल्या अंगावर अक्षरश: कोसळतो.

मुंबईच्या कापडगिरण्या गेल्या आणि त्या जागांवर प्रचंड मोठे टॅावर्स उभे राहिले. चाळी तोडून, झोपडपट्ट्या हटवून प्रचंड माँल्स उभे राहिले. स्काय वॉकवर झोपणारा पण टुरिझम बिझनेसची टोलेजंग स्वप्नं बघणारा नायक "घंट्या" हा जेव्हा हाय प्रोफाईल जगातल्या मॉडेलला भेटतो, तेव्हा नेमकी कोणती फॅंटसी घडते हा सस्पेन्स तसाच राहायला हवा. ती प्रत्यक्ष बघण्यात जी मजा आहे ती सांगण्यात नाही.


या नाटकाचा लेखक सुजय सुरेश जाधव हा प्रतिभावान मुलगा आहे. जयंत पवार यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, या अकादमी विजेत्या कलाकृतीची आठवण करून देणारी पण कॉपी नसलेली एकदम ओरिजिनल आयडिया आणि तिचा स्वाभाविक विकास आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. विनायक प्रभात कोळवणकर हा अफाट ताकदीचा अतिशय गुणी दिग्दर्शक आहे. ब्रिलियंट. जब्बार पटेल, चंद्रकांत कुलकर्णी, अतुल पेठे आणि नागराज मंजुळे यांच्या झेप, उर्जा आणि प्रतिभेच्या जगातला. पण या कुणाचीही नक्कल न करणारा, अस्सल जीवनानुभव आपल्या चिमटीत पकडून ताकदीने मांडणारा. संपुर्ण ओरिजिनल. त्याची नाटकं प्रायोगिकतेच्या दुर्बोध चौकटीत न अडकता नवं, प्रवाही, सहज संवादी, अस्सल देणारी आणि मनाला आरपार भिडणारी. सतत नव्याच्या शोधात असलेला. संहिता, सादरीकरण, जाहीरातीपासून याची प्रत्येक गोष्ट वेगळी आणि स्वत:ची मुद्रा असलेली .

तोडी मिल फॅंटसी ची रंगमंच आपल्या खांद्यावर सहज पेलणारी कलाकार, संगितकार आणि बॅकस्टेजची टीमही एकदम तगडी आहे. झपाटलेली. काहीतरी वेगळं, भन्नाट करून दाखवणारी.

या नाटकातला दणकट, कधी हळुवार तर कधी स्वप्नरंजनात रमलेला सर्व टिमचा म्युझिकल आणि अभिजात अभिनय एकदम पॉवरफुल. जब्राटच. शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके,कपिल रेडेकर,सुरज कोकरे, जयदीप मराठे यांचा परफॉर्मन्स केवळ अफलातून. ही पोरं अफाट क्षमता आणि स्वत:ची झेप असलेली तगडी मुलंयत. आजउद्याची रंगभुमी आपल्या दणकट खांद्यांवर पेलण्याची अपार गुणवत्ता त्यांच्यात आहे. चैतन्य देशपांडे, अनामिका डांगरे, अगस्ती परब,प्रज्वल खेडेकर, अमेय अडिवरेकर, आशिष मंडलू यांनीही उत्तम साथ दिलीय.

नाटकात असं सगळंच रसायन जमून येणं ही फार दुर्मिळ चीज. थिएटर फ्लेमिंगो आणि भारत कला केंद्र निर्मित तोडी मिल फॅंटसी हे स्वत:चा रिदम सापडलेलं, कलदार मुद्रा उमटवणारं नाटक तुफान गाजणार. जबरदस्त चालणार असा मला विश्वास वाटतो.
अभिनंदन आणि शुभेच्छा टीम तोडी मिल फॅंटसी. #तोडीमिलफँटसी #TodiMillFantasy #natak #drama#theatre #marathitheatre Music : @desiriff_official @kapil_redekar Theatre Flamingo आणि @desiriff_official निर्मित 'तोडी मिल Fantasy'

-प्रा.हरी नरके, २४ डिसेंबर २०१८

Friday, December 21, 2018

सर्वांचेच आरक्षण रद्द करा- सराटेंची याचिका






अ] SC,ST, OBC, VJNT, SBC, मराठे या सर्वांचेच आरक्षण रद्द करा, त्याऎवजी आर्थिक निकषांवर सवलती द्या, मंडल आयोगाचा अहवाल १९८०, जो मा.केंद्र सरकार व मा.सर्वोच्च न्यायालयाने स्विकारलाय तो रद्द करावा असे श्री सराटे उच्च न्यायालयाला सांगताहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ७ न्यायाधिशांच्या घटनापिठाने दिलेला आदेश उच्च न्यायालय बदलू शकते काय? मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधल्या शेतकर्‍यांच्या आक्रोशात ज्यांची सरकारे वाहून गेली, तेच शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे गांभिर्य कमी करण्यासाठी व शेतकरी ऎक्य मोडीत काढण्यासाठी श्री. बाळासाहेब सराटेंच्या काठीने जातीयुद्ध भडकावित आहेत काय? सध्याचे राज्य व केंद्रीय मागास वर्ग आयोग मा. सराटेंना मान्य नाहीत. त्यांना तिसरीच शक्ती हवीय.

ब] मराठ्यांचीही नॉन क्रिमी लेयरची वार्षिक मर्यादा रू. ८ लाखाहून वार्षिक रू. ६० हजारपर्यंत इतकी कमी करणे आवश्यक आहे अशी त्यांची मागणी आहे.

क] मा.सराटे मराठ्यांचेही आरक्षण का रद्द करायला सांगताहेत?

ड ] SC,ST, OBC, VJNT, SBC, या सर्वांचेच आरक्षण काढून घ्यायला ते का सांगताहेत?

इ] मा.सराटेंचा बोलवता धनी कोण आहे?

सध्याची आरक्षण पद्धत म्हणजे लोकशाहीची हत्त्या असल्याचा मा.सराटेंचा दावा आहे.

मा. सराटेंच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत -

१. राज्य शासनाचा १८ मे १९५९ चा आर्थिक दृष्ट्या मागासलेपणावर आधारित आरक्षण देण्याचा आदेश पुन्हा लागू करावा,

२. पुढील सर्व कायदे, शासन आदेश रद्द करावेत,
अ] शासन आदेश ९ एप्रिल १९६५, च्या आदेशाने सरकारी नोकरीत आरक्षण देण्यात आले.
ब] शासन आदेश १३ ऑक्टोबर १९६७, १८० ओबीसी जातींना व विजाभज यांना १४% आरक्षण देण्यात आले.
क] शासन आदेश १३ एप्रिल १९६८,
ड] शासन आदेश २३ मार्च १९९४,
ई] महाराष्ट्र राज्य आरक्षण अधिनियम २००४, सरकारी नोकरीतले आरक्षण रद्द करावे,
फ] महाराष्ट्र राज्य आरक्षण अधिनियम २००६, उच्च शिक्षणातले आरक्षण रद्द करावे,

वरील सामाजिक न्यायाचे सर्व शासनादेश व कायदे लोकशाहीची हत्त्या करणारे आहेत असे श्री.सराटे याचिकेत म्हणतात.
ते म्हणतात, नॉन क्रिमी लेयरची वार्षिक मर्यादा रू. ८ लाखाहून वार्षिक रू. ६० हजारपर्यंत इतकी कमी करावी.

आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, ही सराटे करीत असलेली मागणी कोणाची आहे?

- प्रा.हरी नरके, २१ डिसेंबर २०१८

Wednesday, December 19, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ समिती रा.स्व.संघाच्या ताब्यात-









डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी साहित्य हे आंबेडकरी चळवळीचा जीव की प्राण.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे" यांचे २२ खंड प्रकाशित करणारी राज्य शासनाची ग्रंथ समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपुर्ण कब्ज्यात गेलेली आहे.
या समितीचे सदस्य सचिव प्रा.अविनाश डोळस यांना त्यांच्या अकाली दु:खद निधनापुर्वी ११ दिवस आधीच समितीवरून हटवण्यात आलेले होते. स्मृतीशेष प्रा.अविनाश डोळस यांच्यासह प्रकाश आंबेडकर, प्रा. जनार्दन वाघमारे, प्रा. आ.ह.साळुंखे, बाबा आढाव, जनार्दन चांदूरकर, प्रा. जयसिंगराव पवार,प्रा. रमेश जाधव, प्रा. रावसाहेब कसबे, प्रा.दत्ता भगत, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, नितीन राऊत यांनाही समितीवरून कमी करण्यात आले.

डोळस यांच्या जागेवर सुधाकर बोकेफोडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
रा.स्व.संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते, रमेश पांडव, सुनिल भंडगे, वैजनाथ सुरनर, शामराव अत्रे, मिलिंद कांबळे, प्रविण रणसुरे, ईश्वर नंदापुरे, श्यामा घोणसे, संजय साळवे, पी.जी.जोगदंड यांची नवे आंबेडकरी तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. साहित्यिक नामदेव कांबळे, शरणकुमार लिंबाळे व राजन गवस यांनाही या समितीवर नेमलेले आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे हे समितीचे अध्यक्ष आहेत.

ही समिती ४० वर्षांपुर्वी स्थापन करण्यात आली असून या समितीवर स्मृतीशेष वसंत मून, प्रा.हरी नरके, प्रा.दत्ता भगत आदींनी संपादक तथा सदस्य सचिव म्हणून १९७८ ते २०१० या काळात काम केले होते.
२०१० ते ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत प्रा.डोळस समितीवर काम करीत होते. ११ नोव्हेंबर २०१८ ला त्यांचे अकाली निधन झाले.

रा.स्व.संघाच्या या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांची पुस्तके चाळलेली वा वाचलेली असणार असे मी गृहीत धरतो. यापुढे ते बाबासाहेबांचे साहित्य अधिक जोमाने व प्रामाणिकपणे प्रकाशित करतील अशी अपेक्षा आहे. या नव आंबेडकरी तज्ज्ञांना हार्दीक शुभेच्छा.


प्रा.हरी नरके, १९ डिसेंबर २०१८

Friday, December 7, 2018

माळी व तेली यांची बदनामी




माळी व तेली यांची बदनामी- फॅसिस्ट संघटनेच्या एका प्रचारकाकडून गोबेल्सनितीचा वापर - प्रा.हरी नरके
ही तर राज्यघटना, राज्य सरकार, केंद्र सरकार, लोकशाही राज्यपद्धती आणि मा.सर्वोच्च न्यायलयाची बदनामी आहे.


गेले काही दिवस एका नवमागासवर्गीय समाजाच्या प्रचारकाकडून गोबेल्सनितीचा वापर करीत माळी व तेलीव इतर ओबीसी समाजांची बदनामी चालू आहे. हे गृहस्थ आयुष्यभर एका फॅसिस्ट संघटनेचे प्रचारक होते.

ती फॅसिस्ट संघटना मी सोडली आहे असे सांगून ते बहुजन समाजातील माळी, तेली व इतर शेतकरी जातींमध्ये कलागती लावण्याचा धंदा करीत आहेत. हे भांडखोर गृहस्थ अतिशय आक्रमकपणे आणि सराईतपणे वाहीन्यांवर रेटुन खोटे बोलत असतात. हा नवगोबेल्स इसम राज्यात बहुजनातील जातीजातींना भडकावून दंगली घडवण्याच्या कटात सहभागी असावा असा समग्र ओबीसींना संशय आहे....

*** जन्मजात गोबेल्सनितीचा वापर करीत या इसमाने एक अफवा सोडली की माळी व तेली या जाती अवैधरित्या ओबीसीत घुसवण्यात आलेल्या आहेत. या जातींसाठी कोणतेही आयोग नेमलेले नव्हते, त्यांना ओबीसीतून बाहेर हुसका.

*** गोबेल्स महोदय, माळी व तेली यांचा ओबीसीत समावेश ५० वर्षांपुर्वी झालाय, कालपरवा नाही. मा.सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर १६ नोव्हेंबर १९९२ ला शिक्कामोर्तबही केलेय.
*** तुम्हाला जर आक्षेप होता तर वैधानिक आयोगाकडे किंवा न्यायालयांकडे आपण गेल्या ५० वर्षात का गेला नाहीत?

तुम्हाला द्वेशबुद्धीने फक्त बदनामीची राळ उडवायची असल्याने, बहुजनांचा बुद्धीभेद करायचा असल्याने ही बदनामीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.

या मोहीमेतून राज्यातील शांतता व सामाजिक सलोखा यांना बाधा येत आहे.

१. मा.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी न्या. बी.डी.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. त्यांनी विस्तृत पाहणी व अभ्यास करून राज्यात ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देण्याची शिफारस केली.

ती शिफारस स्विकारून राज्य सरकारने ओबीसी प्रवर्ग निर्माण केला व त्याला १०% आरक्षण दिले.
त्यानुसार राज्यात १८३ बलुतेदार, अलुतेदार, कारू, नारू जातींचा समावेश ओबीसीत करण्यात आला.

२. पुढे मा.राष्ट्रपतींनी राज्यघटनेच्या कलम ३४० अन्वये कमिशन्स अ‍ॅक्ट अंतर्गत नेमलेल्या दुसर्‍या राष्ट्रीय मागासवर्ग [ मंडल ] आयोगाने माळी, तेली यांच्यासह २०१ ओबीसी जातींना राष्ट्रीय पातळीवरील ओबीसींच्या यादीत समाविष्ट केले.

३. १३ आगष्ट १९९० रोजी मा. पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या व केंद्रात ओबीसी जातींना २७% आरक्षण दिले.

४. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ७ न्यायाधिशांच्या घटनापिठाने मंडल आयोगाला मान्यता दिली. या न्यायमुर्तींमध्ये महाराष्ट्रातले थोर विचारवंत न्या.पी.बी.सावंत यांचा समावेश होता.

५. महाराष्ट्रातल्या २०१ जातींना मंडल आयोगाने व राज्य सरकारने ओबीसीत घेतलेले असल्याने या २०१ जातींचा समावेश मा.सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मकरित्या ओबीसीत केलेला आहे.

६. या २०१ जातींमध्ये माळी व तेली या दोन्ही जातींचा समावेश होता.

७. मा.शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना २३ एप्रिल १९९४ रोजी राज्याच्या प्रमाणीत यादीत या २०१ जाती आल्या.

८. सर्वोच्च न्यायालयाने मंडल जजमेंट[ इंद्र साहनी केस ] मध्ये दिलेल्या आदेशान्वये या २०१ जातींच्या व्यतिरिक्त कोणत्याही इतर जातीला ओबीसीत घालण्याचे तोवर राज्य व केंद्र सरकारला असलेले अधिकार राज्य व केंद्र सरकारकडून १६ नोव्हेंबर १९९२ रोजी काढून घेतले.

*** इंद्र साहनी खटल्यत मा.सर्वोच्च न्यायालयाने २७% ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली. राज्यात १९५० पासून ४% विजाभज आरक्षण होते. २% आरक्षण गोवारी हत्त्याकांडानंतर वाढले. अशाप्रकारे राज्यात घटनात्मकरित्या ३२% आरक्षण झाले.


९. ते आधिकार आयोगाकडे देण्यात आले. त्यानुसार राज्य सरकारने १९९३ पासून आजवर मा.न्या.खत्री आयोग, मा.न्या. बापट आयोग, मा.न्या.सराफ आयोग, मा.न्या.भाटीया आयोग, मा.न्या.म्हसे आयोग, मा.न्या.गायकवाड आयोग यांची नियुक्ती केली. या आयोगांनी केलेल्या शिफारशींनुसार आजवर सुमारे ४१० जातींचा समावेश राज्याच्या ओबीसीत [इ.मा.व, वि.जा.भ.ज, विमाप्र.] करण्यात आलेला आहे.

१०. यातल्या मा.न्या.गायकवाड आयोगाने राज्यातल्या एका प्रबळ आणि गेली अनेक शतके सत्ताधारी राहिलेल्या जातीला ओबीसीत घालण्याची शिफारस नुकतीच केली. ती शासनाने विनाचर्चा ताबडतोब स्विकारली.

११. या जातीला ओबीसीत घालायला आजवर मंडल आयोग, १९८०, राष्ट्रीय ओबीसी आयोग, २०००, मा.न्या.खत्री राज्य आयोग २००४, मा.न्या.बापट राज्य आयोग २००८, या चार घटनात्मक आयोगांनी नकार दिलेला होता.

१२. या जातीला संघटित आणि आक्रमक बनवण्यासाठी माळी,तेली व इतर सर्व ओबीसी जातींच्या द्वेषाचा, त्यांच्या बदनामीचा कार्यक्रम या नवगोबेल्स इसमाने हातात घेतलेला आहे.

१३. कोणत्याही नविन जातींला ओबीसीत समाविष्ट करताना त्यांनी आयोगाकडे जावे, त्यांचा सर्व्हे व अभ्यास आयोगाने करावा असा आदेश मा.सर्वोच्च न्यायालयाने १६ नोव्हेंबर १९९२ ला दिल्याने त्यानंतरच्या प्रत्येक जातीला या विहीत कार्यपद्धतीला सामोरे जावे लागले. ही कार्यपद्धती वापरून राज्यात आजवर १५० जाती ओबीसीत आलेल्या आहेत.

१४. फक्त एकाच विशिष्ट जातीला हा न्याय लावला गेला ही माहिती धादांत खोटी आहे.

१५. देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मा.सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपुर्वी एक प्रवेश परिक्षा पास होणे बंधनकारक केले.

१६. त्यापुर्वी डॉक्टर होण्यासाठी अशी प्रवेश परीक्षा द्यावी लागत नव्हती.

१७. त्याचप्रकारे १६.११.१९९२ च्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या मंडल निकालाने आयोगाकडे जाणे बंधनकारक केले. त्यापुर्वी ते अधिकार सरकारला होते.

१८. उद्या जर एखादा कांगावेखोर गोबेल्स इसम असे म्हणू लागला की प्रवेश परीक्षा न देता जेव्हढे लोक डॉक्टर झाले ते सगळे अवैध आहेत, तर ती ज्याप्रमाणे लबाडी असेल तशीच लबाडी १९९२ पुर्वीच्या राज्य शासनाने समाविष्ट केलेल्या ओबीसी जाती आयोगाकडे न जाता ओबीसी झाल्या असे त्या ५० वर्षांपुर्वी ओबीसी झालेल्या जातींना चिडवणे ही राज्यघटना, राज्य सरकार,केंद्र सरकार, लोकशाही राज्यपद्धती आणि मा.सर्वोच्च न्यायलयाची बदनामी आहे.

-प्रा.हरी नरके, ७ डिसेंबर २०१८

Did gangster Haji Mastan start the tradition of #BhimaKoregaon commemoration?







Did gangster Haji Mastan start the tradition of #BhimaKoregaon commemoration?
That’s what riots accused Milind Ekbote seems to claim in his affidavit, though Mastan would have been 10 months old at the time.

Countering this, noted historian Hari Narke says, “As a student of history, there is important evidence which clearly states that Dr Ambedkar visited the victory memorial for the first time in 1927, and started celebrating the festival of Koregaon-Bhima battle in that year. That same year, he started the Mahad revolution for Dalits who were not allowed to drink water from the lakes in Mahad region of Raigad district.”

Narke adds, "The year Dr Ambedkar visited [that] victory memorial at Koregaon-Bhima on January 1, 1927, Haji Mastan was around nine or 10 months old as he was born in March 1926.”

Narke published a biography of Dr Ambedkar which was commissioned by the government of Maharashtra. He says, “Volume 22 of the book Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches is a photobiography and an official government publication. In this book, this evidence is noted and you can see his photograph along with others while he visited the victory memorial at Koregaon-Bhima on January 1st, 1927. There is a pictorial and written evidence of this incidence." The photo accompanying this story is one such example.

Newslaundry repeatedly tried to contact Milind Ekbote. However, he was unavailable for comment.

Newslaundry also contacted V Palnitkar, secretary of the Koregaon-Bhima Judicial Commission for comment. Palnitkar said, “We have just collected the affidavits from many people, and are going to examine them one by one. We are also going to examine the claims made by Milind Ekbote in his affidavit.” Nearly 365 affidavits have been filed by the state government, individuals and organisations till date in the case.
- By Prateek Goyal | Dec 6, 2018
..............................

On the 62nd death anniversary of Dr BR Ambedkar, certain claims from an affidavit have come to light. The affidavit was filed by Milind Ekbote, who has been accused by Dalit organisations for inciting the riots at Koregaon-Bhima village on January 1 this year, during the 200th commemoration of the battle of Koregaon-Bhima.

According to Ekbote’s affidavit, submitted to the Koregaon-Bhima Judicial Commission on June 9, 2018, it was the smuggler and gangster Haji Mastan in 1980 who started the commemoration of the Koregaon-Bhima battle.

Interestingly, as per records, it was about five decades ago in 1927 that Dr BR Ambedkar first visited the site to commemorate the event at a time when Haji Mastan was less than one year old.

Ekbote, the leader of the Samast Hindu Aghadi, was made accused in the riots after a woman identified as Anita Sawale, member of the Bahujan Republican Socialist Party, registered a complaint against him and Sambhaji Bhide, leader of the Shiv Pratishthan Hindustan, for rioting at Koregaon-Bhima on January 1st, 2018. Ekbote and Bhide have been charged under Sections 307 (attempt to murder), 147 (punishment for rioting), 148 (rioting, armed with deadly weapon), 149 (unlawful assembly), 295A (deliberate and malicious acts, intended to outrage religious feelings or any class by insulting its religion or religious beliefs), 436 (mischief by fire or explosive substance with intent to destroy house, etc.), and 435 (mischief by destroying or moving, etc., a landmark fixed by public authority mischief by fire or explosive substance with intent to cause damage) of the Indian Penal Code and relevant sections of the Arms Act and the Scheduled Caste and Scheduled Tribe (Prevention of Atrocities) Act.

In the affidavit, Ekbote said, “It was the infamous smuggler Haji Mastan who started the commemoration of Koregaon-Bhima battle near Vijay Stambh (Victory Memorial) in 1980 and not Dr BR Ambedkar … I have studied the biography of Dr Babasaheb Ambedkar and according to what I have studied, fighting from British side (referring to the Battle of Koregaon-Bhima fought between the forces of Peshwa and British in 1818) was never a matter of pride for him. The commemoration of the battle at Vijay Stambh was started by Haji Mastan and not Dr Ambedkar. Because of the encouragement given by Haji Mastan to this commemoration, it gradually became a big event. This commemoration was done to create a divide in the society. Now the participation of Naxals have also increased in this program.”

A section of Ekbote's affidavit.

Ekbote further said in his affidavit that some “Naxalites and Leftists” who didn't have public support started a “Prerna march” (Prerna march yatra) from December 23, 2017, to mobilise people for the celebration of the 200th anniversary of the battle. He said while that was the declared intention, it was actually used to create a divide on the basis of caste lines in Maharashtra. He claimed the entire event of Elgar Parishad at Shaniwarwada was organised by “Urban Naxals” and no Ambedkarite was involved in it.

Countering this, noted historian Hari Narke says, “As a student of history, there is important evidence which clearly states that Dr Ambedkar visited the victory memorial for the first time in 1927, and started celebrating the festival of Koregaon-Bhima battle in that year. That same year, he started the Mahad revolution for Dalits who were not allowed to drink water from the lakes in Mahad region of Raigad district.”

Narke adds, "The year Dr Ambedkar visited [that] victory memorial at Koregaon-Bhima on January 1, 1927, Haji Mastan was around nine or 10 months old as he was born in March 1926.”

Narke published a biography of Dr Ambedkar which was commissioned by the government of Maharashtra. He says, “Volume 22 of the book Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches is a photobiography and an official government publication. In this book, this evidence is noted and you can see his photograph along with others while he visited the victory memorial at Koregaon-Bhima on January 1st, 1927. There is a pictorial and written evidence of this incidence." The photo accompanying this story is one such example.

Newslaundry repeatedly tried to contact Milind Ekbote. However, he was unavailable for comment.

Newslaundry also contacted V Palnitkar, secretary of the Koregaon-Bhima Judicial Commission for comment. Palnitkar said, “We have just collected the affidavits from many people, and are going to examine them one by one. We are also going to examine the claims made by Milind Ekbote in his affidavit.” Nearly 365 affidavits have been filed by the state government, individuals and organisations till date in the case.
.............................................
https://www.newslaundry.com/2018/12/06/did-gangster-haji-mastan-start-the-tradition-of-bhimakoregaon-commemoration
FEATURED REPORTS
By Prateek Goyal | Dec 6, 2018 

संतती नियमनाच्या लोक चळवळीचे पहिले प्रवर्तक




देशाच्या खांद्यावर लोकसंख्येचे अवजड ओझे - एकाच अपत्यावर थांबा असे डॉ. बाबासाहेबांनी 1938 मध्येच सांगितले होते.
आज रोजी भारताची लोकसंख्या 135 कोटी 42 लक्ष 94 हजार 272 आहे. जगातली अवघी 2 टक्के भुमी असलेल्या भारतात जगातली 18 टक्के लोकसंख्या राहते. हे असेच चालू राहिले तर हा देश नजिकच्या भविष्यात कोलमडून पडेल. 1930 च्या दशकात लोकसंख्येच्या विस्फोटाचा हा धोका ओळखून संतती नियमनाची लोक चळवळ देशात सर्वप्रथम उभी करणारे पहिले नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.
1937 सालच्या ब्रिटीश भारतातील "स्वतंत्र मजूर पक्षाच्या" निवडणुक जाहीरनाम्यात बाबासाहेबांनी संतती नियमनाच्या कायद्याचे अभिवचन दिले होते.
ते त्यांनी 10 नोव्हेंबर 1938 रोजी पुर्ण केले. त्यांच्या पक्षाच्या वतीने मुंबई विधीमंडळाच्या अधिवेशनात संतती नियमन विधेयक सादर करण्यात आले.
[ पाहा- मुंबई विधीमंडळ चर्चा, खंड, 4, भाग 3, पृ.4024 ते 38 ]
स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार पी.जे.रोहम यांनी सादर केलेले हे विधेयक डॉ. बाबासाहेबांनी तयार करून दिलेले होते. रोहम यांनी केलेले भाषण मराठीत होते.
जन्मदर महत्वाचा नसून पोषणदर महत्वाचा आहे.
पुरस्कार आणि शिक्षा पद्धतीद्वारे कुटूंब नियोजन मोहीम चालवा,
सरकारतर्फे सर्व विवाहीतांना कुटुंब नियोजनाची साधने मोफत पुरवा,
शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहन द्या,
मुलं किती असावीत आणि कधी होऊ द्यावीत याचा निर्णय पत्नीला घेऊ द्या,
स्त्रियांच्या आणि बालकांच्या आरोग्याची हमी द्या,
प्रगत देशांच्या तुलनेत भारत खूप मागे असताना, याच वेगाने लोकसंख्या वाढली तर भारत संकटात सापडेल.
गुणवत्तापुर्ण शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, निवारा, घरं, रोजगार आणि आनंदी जीवनमान प्रत्येक मुलामुलीला मिळणं हा त्यांचा हक्क आहे.
भारतात जास्त मुलं जन्माला घालणं हा राष्ट्रीय गुन्हा ठरवला पाहिजे,
हे बाबासाहेबांचे द्रष्टे विचार आजही कालसुसंगत नी मार्गदर्शक आहेत.
प्रगत देशातील दरडोई Consumption आणि भारतातली अपुरी उपलब्धता सांगताना डॉ. बाबासाहेब, दूध, मटण, फळं, साखर, गहू, भाजीपाला, यांची सरळ आकडेवारीच देतात.
दुर्दैवाने त्यावेळच्या हिंदू महासभा, मुस्लीम लिग, काँग्रेस, अगदी कम्युनिष्ट या सार्‍यांनीच या बिलाला विरोध केला.
परिणामी ते फेटाळले गेले.
80 वर्षांपुर्वी या बिलाचे स्वागत करणारे फक्त दोघेच द्रष्टे लोक भारतात होते.
समाजस्वास्थकार प्रा.र.धो.कर्वे आणि जे.आर.डी. टाटा. कर्व्यांनी समाजस्वास्थमधून या विषयावर जागृती चालवली होती. त्यांच्यावर सनातन्यांनी अश्लीलतेच्या नावाखाली खटले भरले तेव्हा त्यांचे वकीलपत्र घेऊन बॅरिस्टर बाबासाहेब त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.
कुंटुंब नियोजन बिल फेटाळले गेले तरी 10 डिसेंबरला [1938] डॉ. बाबासाहेबांनी मुंबईत युवक परिषद घेऊन एकाच अपत्यावर थांबा असा सल्ला युवकांना दिला.
1952 सालच्या निवडणुकीतही आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात त्यांनी कुटूंब नियोजनाचे वचन दिलेले होते.
डॉ.बाबासाहेब : शेतकर्‍यांचे सच्चे मित्र
शंभर वर्षांपुर्वी म्हणजे १९१८ साली डॉ. बाबासाहेबांनी शेतीवर "स्माल होल्डींग्ज इन इंडीया" हा शोधग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला होता.
1. शेतकरी निरक्षरता व अन्य कारणांनी कुटुंबनियोजन करीत नाहीत त्यामुळं होणारी जास्त मुलं आणि मग शेतीचे होणारे वाटे म्हणजे तुकडे यातून उभे राहणारे अनेक प्रश्न यांची चर्चा त्यांनी केली होती. तुकडेबंदीचा मार्ग सांगुन त्यांनी अशी शेतं एकत्र करून शेतकर्‍याला एका ठिकाणी दिल्यास शेती करणं सोयीचं होईल असं सुचवलं. पुढं स्वतंत्र भारतात असा जमीन एकत्रीकरणाचा कार्यक्रम राबवला गेला.
2. बाबासाहेब म्हणतात, मुख्य समस्या आहे शेतीवर वाढणार्‍या बोजाची. शेतीवर ज्याकाळात 80 टक्के लोक अवलंबून होते तेव्हा ते म्हणतात यातले 60 टके लोक इतर क्षेत्रात हलवले पाहिजेत. शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार, उद्योग, शिक्षण, सेवा क्षेत्रात घातले पाहिजे.
3. शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा ही त्यांची मुख्य शिफारस आहे. त्यामुळं उद्योगाला जशी शासकीय मदत मिळते तशी शेतीला मिळेल.
4. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत यासाठी शासकीय धोरणं आखली जावीत.
5. शेतीला 24 तास आणि 365 दिवस सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते म्हणतात.
6. शेती आधुनिक पद्धतीनं करायला हवी. शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग, दुध, अंडी, लोकर आदींची जोड द्यायला हवी.
असें झालं नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणं मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी 100 वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते. आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. बाबासाहेब 100 वर्षांपुर्वी जणू काही हा इशाराच देत होते.
त्यांनी कुलाबा [आताचा रायगड] जिल्ह्यात शेतकरी समुदायाची आंदोलनं संघटित केली. विधीमंडळावर शेतकर्‍यांचे मोर्चे काढले.
त्यांच्या "स्वतंत्र मजूर पक्षातर्फे" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारलं होतं. त्या चळवळीमुळंच पुढं कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली. शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला. दामोदर, महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले.
देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले.
आज राज्यात जेव्हा भीषण दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते, अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचं बघणारा आवाका चकीत करून जातो.
डॉ. बाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचं प्रतिक बनलेले आहेत. खरंतर ते सच्चे शेतकरी मित्र होते आणि सर्वांना कसायला जमीनी मिळायला हव्यात अशी त्यांची भुमिका होती. त्यासाठी खाजगी जमीनमालकी रद्द करून सर्व जमीनी सरकारच्या मालकीच्या कराव्यात असा त्यांचा आग्रह होता.
- प्रा.हरी नरके
युवा किसान, गुरूवार दि. ६ डिसेंबर २०१८

Sunday, November 18, 2018

महात्मा फुलेंचे क्रांतिदर्शी समग्र वाङ्मय-



'महात्मा फुले समग्र वाङ्मय' हा संपादक प्रा हरि नरके यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात गेला पाहिजे अशा तोलामोलाचा आहे...

'महात्मा फुले समग्र वाङ्मय' हा संपादक प्रा. हरि नरके यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात गेला पाहिजे अशा तोलामोलाचा आहे. आज २१व्या शतकात सोशल मीडिया जोरदार चालू असताना, मतामतांचा गलबला वाढलेला असताना हा ग्रंथ 'मूळ साधनांच्या अभ्यासाचे' महत्त्व अधोरेखित करतो. सध्या 'जो जे वांछिल तो ते लाहो' अशा काळात महात्मा फुले आणि त्यांचे समग्र वाङ्मय आपल्यासाठी एक कसोटीचा दगड ठरू शकते. यामुळेच हा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात जाण्याची गरज आहे.

या समग्र वाङ्मयाचे सुरुवातीचे संपादक धनंजय कीर, स. गं. मालशे आणि य. दि. फडके होते. 'मूळ प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ' होते. नवी समिती २०१३ मध्ये अस्तित्वात आली. त्यांनी ही नवी आवृत्ती अलीकडेच प्रकाशित केली आहे. या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे 'आद्य फुले चरित्र - यशवंत जोतीराव फुले' या भागाचा समावेश. खंडाला प्रा. हरि नरके यांची ३९ पृष्ठांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. या खंडाची मध्यवर्ती कल्पना म्हणजे 'स्त्री-पुरुष समानता, ज्ञानार्जन आणि अंधश्रद्धा निर्मूलन' यांचा पुरस्कार करणे. यासाठी कार्यरत असणाऱ्या, झटणाऱ्या लोकांसाठी हा खंड म्हणजे अक्षय्य ऊर्जा केंद्र आहे.

महात्मा फुले कोण होते? त्यांचे योगदान काय? असे अज्ञ किंवा उर्मट प्रश्न विचारण्याचे धाडस काही जण दबक्या आवाजात करीत असतात. अशांना संपादकीय प्रस्तावनेत जोरदार उत्तर नरके यांनी दिले आहे. शिक्षणतज्ञ, कृषितज्ञ, अर्थतज्ञ, आधुनिक नाटककार, निबंधकार, आद्य शिवचरित्रकार, आधुनिक मराठी क वितेचे जनक, पुण्याचे आयुक्त, पुणे कमर्शियल अॅण्ड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक आणि प्रकाशक एवढ्या साऱ्या भूमिका त्यांनी एकाच आयुष्यात बजावल्या.

१८७३ मध्ये 'गुलामगिरी' ग्रंथ निग्रो चळवळीला अर्पण करणे, शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक करणे या गोष्टी महात्मा फुले यांच्या दूरदर्शित्वाच्या निदर्शक होत. संपादकीयात नरके यांनी पुढील शब्दात फुलेंच्या साहित्याबद्दल लिहिले आहे- 'त्यांचे समग्र साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा जाहीरनामाच होय. हा श्रेष्ठ ग्रंथ हे परिवर्तनाचे ऊर्जाकेंद्र आणि समताधिष्ठित समाजाचे संकल्पचित्र असल्याने त्यांचे जागतिक साहित्यात आगळेवेगळे स्थान आहे.' संपादकांनी योग्य आणि अचूक शब्दात साहित्याचे मर्म ओळखले आहे. संपादकीयात त्यांनी ज्या चार पायऱ्या दिलेल्या आहेत त्यांची यथार्थता आजही कमी झालेली नाही.

सामाजिक न्यायासाठी राखीव जागांची मागणी भारतात सर्वप्रथम महात्मा फुले यांनी केली. त्यांच्या विचारांचा आधार घेऊन सत्तेवर आलेली मंडळी 'समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय विसरून सत्तेवाचून सकळ कळा, झाल्या अवकळा', यावर दृढ विश्वास ठेवून चालत आहेत.

या ग्रंथाचा गाभा आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणविषयक कार्य आणि विचार. विचारांची मांडणी खूप जण करतात. कृती मात्र थोड्यांनाच जमते. 'शिक्षण हा स्त्रियांचा मानवी अधिकार आहे आणि समग्र देशाची उन्नती स्त्रीशिक्षणाविना शक्य नाही' असा विचार १९व्या शतकात नुसता मांडायचा नाही तर स्वत: अस्तित्वात आणायचा. हे अवघड काम उभयतांनी केले. त्याचा पुरावा २९ मे १८५२च्या 'पुना ऑब्झर्वर' वृत्तपत्रातील पत्रात आहे. वाचकांच्या पत्रात एका विद्यार्थ्याचे पत्र आहे. तो लिहितो - 'जोतीरावांच्या शाळातील मुलींची पटसंख्या सरकारी शाळातील मुलांपेक्षा दहापटीने मोठी आहे. त्याचे कारण मुलींना शिकविण्याची जी व्यवस्था आहे ती मुलांच्या शासकीय शाळांतील व्यवस्थेपेक्षा अनेकपटींनी श्रेष्ठ आहे.'

महात्मा फुले यांचा आणखी एक दुर्मीळ पैलू या ग्रंथातून समोर येतो. एखादा लेखक क्वचितच दुसऱ्या लेखकाची स्तुती करतो किंवा पाठराखण करतो. १८८२ मध्ये ताराबाई शिंदे यांच्या 'स्त्री-पुरुष तुलना' पुस्तकाने खळबळ उडवून दिली. पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेतून या पुस्तकावर टीका होताच 'सत्सार' या नियतकालिकातून महात्मा फुले यांनी ताराबाईंची पाठराखण केली. स्त्रीदु:खाचा कढ जितका समर्थपणे स्त्रियाच व्यक्त करू शकतात, तितका तो पुरुषांकडून प्रगट होणे शक्य नाही याची जोतीराव प्रांजळ कबुली देतात. आजही किती जणांना हे जमेल?

अभिनव कल्पना लढविण्यात या पती-पत्नींचा हात कोणी धरू शकत नव्हता. १८५२ मध्ये पहिले भारतीय शालेय ग्रंथालय उभारणे, मुलामुलींना पहिलीपासून इंग्रजी, शेतीशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण देणे, विद्यार्थी गळतीचा प्रश्न सोडविण्यासाठी गरीब मुलामुलींना पगार देणे, मुलामुलींच्या आई-वडिलांसाठी रात्रशाळा काढणे, शिकायला चला सांगणारे 'तृतीय रत्न' नाटक लिहिणे या सगळ्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे सेंद्रिय विचारवंत कसे होते हे समजते.

इतिहासाच्या पुनर्निमितीचा खरं म्हणजे पुनर्लेखनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक तथ्ये मोडतोड न करता सामाजिक शहाणपणाचा अवलंब करून कशी मांडता येतात आणि त्यासाठी तारतम्य कसे वापरावे हे आपणास जोतीरावांच्या पोवाड्यातून समजते.

जगातील धर्मग्रंथांसंदर्भात महात्मा फुले यांचे जे निरीक्षण आहे त्याचे आश्चर्य वाटते. जगभराच्या धर्मग्रंथांनी कमी-अधिक प्रमाणात स्त्रियांवर अन्याय केला. हे धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिल्याने त्यांनी स्वार्थासाठी पक्षपात केल्याचेही निरीक्षण जोतीरावांनी नोंदविले आहे. काळाचा विचार करता जोतीरावांचे द्रष्टेपणच जणू आपणास दिसते. या सखोल अभ्यासातूनच त्यांना पर्यायी संस्कृतीचे वेध लागल्याचे दिसते. पुढे 'पर्यायी संस्कृतीचे जनक' म्हणून महात्मा फुले यांची जी प्रतिमा पुढे आली त्याची पाळेमुळे आपणास येथे दिसतात.

शेतकरी संघटनेच्या अधिवेशनास महिला उपस्थित होत्या हा इतिहास पाठ्यपुस्तकात आला आहे. १९२५ मध्ये वर्धा येथे सत्यशोधक महिला परिषदेला पाच हजार महिला उपस्थित राहतात हा भाग आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कधी येणार? सत्यशोधक विवाहपद्धती, भाऊपणा व बहीणपणा, सामाजिक संघटन, पाणी अडवा पाणी जिरवा, उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव, नेशन बिल्डिंगसाठी नेशन बिल्डरची भूमिका, शेती आणि अर्थव्यवहारांसंबंधी त्यांची भूमिका या गोष्टी पाठ्यपुस्तकातून किंवा सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांसमोर मांडण्याची गरज आहे. समाज विनाकारण कोणालाही महात्मा पदवी अर्पण करीत नाही.

आद्य फुले चरित्र ही ग्रंथाची जमेची बाजू आहे. नऊ परिशिष्टे अत्यंत महत्त्वाची आहेत. संदर्भ टीपा, निवडक शब्दांचा कोश, निवडक संदर्भ सूचीने ग्रंथाचे मोल वाढविले आहे. संपादकीयातील काही पॅरेग्राफ चुकून दोनदा छापले गेले आहेत ते पुढील आवृत्तीत दुरुस्त करता येतील. सरकारने मनावर घेतल्यास ग्रंथाची स्वस्त जनआवृत्ती काढता येईल.

महात्मा फुले समग्र वाङ्मय,संपादक : प्रा. हरि नरके,
प्रकाशक : फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन,
पृष्ठं : ८६२, किंमत : ३२० रु.
म.टा. रविवार, दि. १८ नोव्हेंबर २०१८, संवाद, पृ. ६
https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/#
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/mahatma-fulles-revolutionary-composite-class/articleshow/66662150.cms
डॉ गणेश राऊत- मटा ऑनलाइन | Updated:Nov 18, 2018, 04:00AM IST

Sunday, November 11, 2018

प्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचे विद्यमान सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याची बातमी आत्ताच एका मित्राने दिली. खूप सारी वेदना आणि हळहळ वाटली. एक मस्त दोस्त असा मधेच निघून गेला.
अविनाश हा हसतमुख, सौजन्यशील आणि जगमित्र माणूस होता. त्यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली म्हणुन अलिकडेच मित्रमंडळीने त्यांचा एक गौरवग्रंथ प्रकाशित केला होता. नुकतेच भेटलो तेव्हा त्यांनी जेवायचा खूप आग्रह केला. माझे जेवन झालेले होते. तरीही केवळ अविनाशच्या अतिव आग्रहापोटी त्याच्याच ताटात मी परत थोडं जेवलो. आमचे दोघांचे कार्यालय एकच असल्याने आम्ही नियमितपणे भेटत असू. मनमुराद गप्पांची मैफिल सजत असे. आंबेडकरी चळवळीत आयुष्य गेलेला अविनाश तसा अनाग्रही आणि सौम्य प्रकृतीचा होता. ३० वर्षांपुर्वी माझे महात्मा फुल्यांवरचे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा अविनाशचे पत्र आले. औरंगाबादला एका कार्यक्रमासाठी गेलेलो असताना अविनाश येऊन भेटला. त्याच्या स्कूटरवर मागे बसवून त्याच्या महाविद्यालयात मला घेऊन गेला. त्याने तिथे माझे भाषण आयोजित केलेले. त्यानंतर मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचा पाहुणचार, अगत्य आणि दोस्ताना कायमचा होऊन गेला. अनेकदा भेटीगाठी होत. मालेगावच्या मित्रांनी एकदा आम्हा दोघांची एकत्रित भाषणे ठेवली होती. खूप गर्दी होती. एका शाळेच्या मैदानावर कार्यक्रम होता. तो वहिनींना घेऊन आला होता. खूप मनापासून बोलला तो. त्याचे भाषण ऎन रंगात आलेले असताना संयोजकांनी भाषण आवरते घ्या अशी त्याला चिठ्ठी दिली. अविनाश तसा कधीही न रागावणारा पण त्या चिठ्ठीने तो भडकला. संयोजकांचीही चूकच झालेली होती. त्यात त्यांचा आगाऊपणा म्हणजे " फार वेळ झालाय, आम्हाला अजून हरी नरकेंचे भाषण ऎकायचेय" असे म्हणे त्यांनी चिठ्ठीत लिहिलेले. " मग मला कशाला बोलावले?" असे अविनाशने त्यांना झापले. गेली आठ नऊ वर्षे अविनाश डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचा सदस्य सचिव म्हणून काम बघत होता. प्रा.दत्ता भगत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर अविनाशला नेमावे यासाठी मी सचिवांकडे शिफारस केली.आग्रह धरून पाठपुरावा केला. आमचे अधिकारी मित्र शुद्धोधन आहेर यांनी शासनादेश काढण्यासाठी खूप मदत केली. तेव्हा आमचे कार्यालय मंत्रालयासमोरच्या बॅरॅक्समध्ये होते. कार्यालयाचे नूतनीकरण चालू असताना अविनाशने त्याच्या केबिनसाठी दुप्पटीहून जास्त जागा घेतली. माझ्या केबिनमध्ये जेमतेम दोन खुर्च्या बसतील एव्हढीच जागा ठेवली. मी त्याला विचारायला गेलो तर अविनाश असा पठठ्या की मला म्हणाला, "अरे तो इंजिनियर मूर्ख होता. त्याला मी बोललो होतो की माझी [ म्हणजे अविनाशची ] केबिन आणखी मोठी कर. माझ्याकडे कार्यकर्ते येतात. तर त्या गाढवाने तुझीच केबिन मोठी करून ठेवली." मी रागवायचे विसरलो आणि हसू लागलो. अविनाश श्री. प्रकाश आंबेडकरांचा विश्वासू सहकारी होता. मा. बाळासाहेबांचा तो निस्सिम भक्त होता. तेव्हढा विषय आला की त्याचे विचार करायचे इंद्रीय तो बंद करायचा आणि निष्ठावंत अनुयायी या भुमिकेत जायचा. तो बाळसाहेबांच्या प्रत्येकच कृतीचे समर्थन करायचा. एरवी चिकित्सक असलेला अविनाश बाळासाहेबांच्या बाबतीत मात्र फक्त "भक्त" असायचा. दत्ता भगतसर, शुद्धोधन, संजू हिंगे आणि मी २०१० साली बाबासाहेबांचा फोटो आल्बम प्रकाशित केला. तो सिंगापूरहून छापून आणलेला होता. त्याच्या दहा हजार प्रती एका आठवड्यात संपल्या. खूप कौतुक झाले. अर्थात नेहमीप्रमाणे काही विघ्नसंतोषी लोकांनी चढ्या सूरात थातूरमातूर मुद्दे काढून विरोधी कोल्हेकुई केलीच. ही खेकडावृत्तीच चळवळीची कायम हानी करीत आलीय. अविनाशने या खंडाची अलिकडेच सुधारित आवृत्ती काढली. संशोधनाची शिस्त धाब्यावर बसवून त्याने पहिल्या आवृत्तीच्या आम्हा सर्वांचीच नावे गाळून टाकली. वाईट वाटले. चळवळीतही टोकाचा अविश्वास, असूया आणि जातीयवाद आहे. अविनाश कधीही तसा नव्हता. पण त्याच्यावर त्याच्या सहकार्‍यांचा, नेत्यांचा दबाव असेल. मी त्यानंतर अनेकदा भेटलो,पण त्याने तो विषय टाळला. मीही स्वत:हून त्या अप्रिय विषयावर बोलणे टाळले. बाकी आमच्या गप्पा होत राहिल्या. आमच्या दोस्तान्यात अंतर पडले नाही. आणि आज अविनाश असा तडकाफडकी निघून गेला. अविनाश, मित्रा असे अचानक नी अकाली जाणे हे मात्र तुझे चुकलेच. प्रा. हरी नरके, ११ नोव्हेंबर २०१८

Saturday, November 10, 2018

श्रेष्ठ प्रतिभेचे धनी प्रा. रंगनाथ पठारे






प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, दणकट कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीसेक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. ताम्रपट ह्या महाकादंबरीने ते पहिल्या श्रेणीचे कादंबरीकार बनले. अरूण साधू यांच्यामते काळाचा अफाट अवाका असलेली, ग्रामजीवनाचे अस्सल चित्रण करणारी, ताम्रपटच्या तोडीची दुसरी कादंबरीच मराठीत नाही.

"सातपाटील कुलवृत्तांत" ही सुमारे आठशे वर्षांचा महाकाय पट चितारणारी, मराठा योद्धे आणि समाज जीवनाचा सबाल्टर्न हिस्ट्रीच्या अंगाने वेध घेणारी महामहाकादंबरी ते सध्या लिहित आहेत. असे मजबूत आणि चिरेबंदी काम मराठीत आजवर झालेलेच नाही.


पठारेसर मूळचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक. ते उत्तम खेळाडू आणि निसर्गप्रेमी आहेत. दुबळ्यांबद्दल अपार कणव, मराठा असूनही सरंजामशाहीचा तिटकारा आणि ज्ञाननिर्मितीबद्दल जिव्हाळा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये. अतिशय नम्र, मातीशी घट्ट नाते आणि तुफान वाचन-चिंतन.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळूच शकत नाही असे ज्या काळात बहुतेक सगळे दिग्गज म्हणत होते तेव्हा सरांनी एकदा मला फोन केला आणि प्रदीर्घ चर्चा केली. मराठी भाषेबद्दल ममत्व आणि तिच्या भल्याची आस असल्यानं सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताबडतोब कामाला लागलो आणि म्हणता म्हणता एक महाकाय अहवाल तयार झाला. पठारे समितीचा हा अहवाल केंद्र सरकारने भाषा तज्ज्ञांकडे पाठवला. त्यांनी त्याची छाननी करून मराठीला हा दर्जा द्यावा अशी एकमुखी शिफारस केली.

या काळात सरांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला. त्यांचा उमदा स्वभाव, सलगपणे १६ ते १८ तास काम करण्याची क्षमता, शिस्त आणि सखोल संशोधनाची वृत्ती यांनी मी प्रभावित झालो.

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, सरांचे संगमनेरचे घर, माझे पुण्यातले घर, यशदा आणि शासकिय विश्रामधाम येथे आम्ही सलगपणे असंख्य बैठका घेतल्या नी महिनोन महिने काम केले. सरांमुळे एक मजबूत काम कसे उभे राहाते याचा साक्षात अनुभव मला घेता आला.

आणीबाणीच्या पार्श्वभुमीवरील " दिवे गेलेले दिवस" आणि  " अनुभव विकणे आहे" या पुस्तकांनी सरांनी कादंबरी व कथा लेखनाला प्रारंभ केला. त्यानंतर गेली ४० वर्षे सर अव्याहतपणे लिहित आहेत. अखंडपणे आलेल्या रथ, हारण, चक्रव्यूह, टोकदार सावलीचे वर्तमान, ताम्रपट, त्रिधा, कुंठेचा लोलक, दु:खाचे श्वापद, भर चौकातील अरण्यरूदन, एका आरंभाचे प्रास्ताविक, चोषक फलोद्यान या त्यांच्या एकाहून सरस एक अशा महत्वाच्या कादंबर्‍या.

सर मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळ्याचे. त्यांच्या आणि माझ्या तालुक्यांना जोडणारी घोडनदी. या परिसरात बोलली जाणारी मराठी अचूकपणे त्यांच्या कादंबर्‍यामधून, कथांमधून येते. आमच्या भागातल्या या गावरान मराठीला पठारेसरांनी आपल्या साहित्यातून अजरामर केले. गावगाड्याची जी आरपार समज त्यांना आहे तशी आणि तितकी क्वचितच अन्य कोणा मराठी साहित्यिकाला असेल. हिंदीमध्ये जे काम फनिश्वरनाथ रेणूंनी केलेय त्यातोडीचे काम पठारेसर आज मराठीत करीत आहेत. आज नेमाडेसरांनंतर ज्ञानपीठ मिळायला हवे असे नाव म्हणजे रंगनाथ पठारेसर. घरात लेखनाचा कोणताही वारसा नसताना एकाच पिढीत त्यांनी किती मोठी भरारी घेतलीय! केवळ अभिमानास्पद!

गाव, गोत, कुळ, समकालीन आर्थिक-राजकीय वास्तव, परंपरा व परिवर्तनाची नाळ, जातीय तेढ, अहंकार आणि वर्चस्ववादी मानसिकता यांचे समाजशास्त्रीय दस्तावेजीकरण म्हणजे सरांचे ग्रंथ होत.

त्यांच्या सार्‍याच पुस्तकांवर मी विस्ताराने लिहिणार आहे.

तळेगाव ढमढेरे हे गाव ऎतिहासिक गाव आहे. नुक्ताच ८०० वर्षांपूर्वींचा एक शिलालेख गावात एका वाड्याच्या उत्खननात मिळालाय. हडाप्पा, मोहेनजोदाडो पूर्वकालीन वस्तीचे पुरावे उत्खननात मिळालेले इनामगाव तळेगावपासून जवळच आहे.

महात्मा फुले तळेगावात आल्याचे व एक ऎतिहासिक सामाजिक संघर्ष त्यांनी इथे केल्याचे पुरावे खुद्द जोतीरावांनीच लिहून ठेवलेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत शहीद झालेले हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे तळेगावचेच.

बृहद पुणे शहराच्या सीमा आता तळेगावपर्यंत विस्तारल्या आहेत. विकासाचा फार मोठा डोलारा या भागात उभा राहतोय. गेली १३ वर्षे आपण या गावात सोनाई नरके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोनाई व्याख्यानमाला चालवतो. पुण्याचे बौद्धिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वैभव या भागाला मिळावे यासाठी, या परिसराचे नितांत गोमटे व्हावे यासाठी ही व्याख्यानमाला महत्वाची पाऊलवाट तयार करते आहे.

निळू फुले, डॉ. आ. ह.साळुंखे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. रामचंद्र देखणे, संजय आवटे, संजय सोनवणी, संजय भास्कर जोशी आदींची भाषणे खूप गाजली. लोक वर्षभर या व्याख्यानमालेची वाट बघतात. पंचक्रोशीतून उदंड प्रतिसाद मिळतो.

सोनाई व्याख्यानमाला, २०१८, यावर्षीचे वक्ते आहेत- प्रा.रंगनाथ पठारे,

सोमवार दि. १२ नोव्हेंबर, सायं. ६ वाजता,

स्थळ- सावता महाराज मंगल कार्यालय, तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर, जि.पुणे.

नक्की यायचं!


प्रा. हरी नरके, ११ नोव्हेंबर २०१८

Thursday, November 8, 2018

पु.ल.देशपांडे






१९८८ साली बाळ गांगल या संस्कृत व इतिहासात २ पीएच.डी. मिळवलेल्या सनातनी इसमाने महात्मा फुले यांच्यावर अतिशय गलिच्छ २ लेख लिहिले होते. साप्ताहिक सोबतमध्ये ग.वा.बेहरे यांनी ते छापले होते. तेव्हा मी एम.फिल. करीत होतो. सामाजिक चळवळीच्या सत्संगाने महात्मा फुले यांचे साहित्य शाळकरी वयातच वाचलेले होते. एम.फिल. ला महात्मा फुले यांचे साहित्य अभ्यासाला होते. गांगलांच्या लेखांचे सप्रमाण खंडन करणारे लेख मी सकाळ, म.टा., लोकसत्ता आदींमधून लिहिले. लेख वाचून पु.ल. देशपांडे यांचे मला पत्र आले. तू यावर पुस्तक लिही असं त्यांनी मला कळवलं. पंधरा दिवसात मी त्यावर पुस्तक लिहिलं. "महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन" चं चंद्रपूरला पुलंच्या हस्ते प्रकाशन झालं. पुल त्या पुस्तकावर भरभरून बोलले. परिणामी कार्यक्रमातच पुस्तकाच्या ५०० प्रती लगेच संपल्या.

शाळेत असताना पुलंची पुस्तकं मला खूप आवडायची.

८ नोव्हेंबर हा पुलंचा वाढदिवस. मी चौथीत असताना पुल राहात ती रूपाली इमारत शोधून काढली. त्यांच्या वाढदिवशी एक पुस्तक घेऊन त्यांना भेटायला गेलो. दहाएक किलोमीटर सायकल चालवल्याने मी घामानं निथळलेला होतो. पुल आणि सुनिताबाई अतिशय आपुलकीनं बोलले. मी त्यांना वर्तमानपत्रात बांधलेलं, भेट दिलेलं पुस्तक त्यांनी उघडून बघितलं. मी हेच पुस्तक का निवडलं असं त्यांनी मला विचारलं. मी संकोचलो. खरं सांगितलेलं त्यांना आवडणार नाही अशी मला भिती वाटली. त्यामुळं मी सांगायचं टाळत होतो. पण ते पुन्हापुन्हा विचारत राहिले. मी म्हटलं, "गड आला पण सिंह गेला" ही हरी नारायण आपटे यांची ही कादंबरी माझी आवडती आहे. पुस्तकांच्या दुकानात बारा आण्याला मिळणारं हेच एकमेव पुस्तक होतं. माझा सफाई कामगार म्हणून पगार महिन्याला दहा रूपये होता. सगळा पगार आईला द्यावा लागायचा. त्यातला फक्त एक रूपया आई मला पुस्तकांसाठी द्यायची."
पुल आणि सुनिताबाई या पहिल्या भेटीतच जणू सख्खे मित्र असल्यासारखे वागले. पुलंचा मोठेपणा असा की चौथीत असताना हे पुस्तक वाचून त्यावर आयुष्यातली पहिली एकांकिका
त्यांनी लिहिली होती असं त्यांनी मला सांगितलं. मी तर हूरळूनच गेलो. बहुदा मला बरं वाटावं म्हणून त्यांनी हे सांगितलं असावं असं आता वाटतं.

पुढे प्रत्येक भेटीत पुल त्यांचं एकतरी पुस्तक मला भेट द्यायचे. अमूक पुस्तक वाच, तमूक वाच असं आवर्जून सांगायचे. माझ्या लग्नात त्यांनी घेतलेला पुढाकार याबद्दल मी फेबुवर लिहिलेच होते. २५ वर्षांपुर्वी पुलंच्या अमृत महोत्सवी वर्षी मी लोकमतमध्ये पुलंबद्दल लेख लिहिला होता. त्या सगळ्या आठवणी पुन्हा लिहित नाही. तो लेखच शोधून फेबुवर टाकीन.
पुलंच्या लेखनाने खूप आनंद दिला. जणू पंचवीस-तीस प्रतिभावंत लोकांचं काम पुल एकहाती करायचे. विनोदकार, नाटककार, वक्ते, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, गायक, संगीतकार, दर्दी रसिक ही त्यांची असंख्य रुपं विलोभनीय होती. त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचा मी ऋणी आहे. जन्मशताब्धीनिमित्त पुलंच्या स्मृतीस वंदन.

-प्रा. हरी नरके, ८ नोव्हेंबर २०१८

Tuesday, November 6, 2018

सर्वोत्कृष्ठ कथा २०१८




रमाकांत एक खोल विवर - जयंत पवार, विशाखा दिवाळी अंक, सर्वोत्कृष्ठ कथा २०१८ - प्रा. हरी नरके

श्री जयंत पवार हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार आहेत. त्यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर आणि वरणभात लोण्चा.... ह्या दोन्ही कथासंग्रहांना
जाणकारांची पसंती मिळालेली आहे. त्यांच्याकडून वाचकांच्या फार अपेक्षा आहेत.
यंदाच्या विशाखा दिवाळी अंकात त्यांची "रमाकांत एक खोल विवर" ही कथा प्रकाशित झालेली आहे.
गेल्या पंधरा दिवसात मी बरेच दिवाळी अंक वाचले.
काही चाळले.
त्यातल्या कथांशी तुलना करता पवारांची ही कथा यावर्षीची सर्वोत्कृष्ठ कथा ठरावी अशी दणकट कथा आहे.

मुंबईतल्या रमाकांत साठे आणि अनघाची खूप स्वप्नं असतात. स्वतंत्र खोली मिळाल्यावरच लग्न करायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं. रमाचे वडील मुंबई महापालिकेत सफाई कामगार असतात. त्यांना एका गाडीने ठोकल्यामुळे ते अंथरूणाला खिळलेले असतात. आई, दोन धाकट्या बहिणी आणि अपघातात अपंग झालेले वडील हे सारे रमाकडे आशेनं बघत असतात.

रमा पदवीनंतर अ‍ॅनिमेशनचा कोर्स करीत असतो. या क्षेत्रात करियर करायचं, काहीही झालं तरी वडलांसारखं गटारं साफ करण्याचं काम करायचं नाही असा त्याचा पक्का निर्धार असतो.
वडीलांच्या जागी अनुकंपा तत्वावर सफाई कामगाराची नोकरी मिळत असतानाही रमा ती निर्धाराने नाकारतो.

अनघाच्या घरून लग्नाची घाई केली जाते. त्यामुळे तो अ‍ॅनिमेशन जगतात नोकरीचा शोध घेऊ लागतो.

आणि इतक्यात केंद्र सरकार नोटाबंदी जाहीर करतं.....

काय होतं रमाचं? अनघाचं? त्यांच्या प्रेमाचं? त्यांच्या कुटुंबांचं?

श्रेष्ठ कथाकार बाबूराव बागूल यांच्या स्मृतीला पवारांनी ही कथा अर्पण केलेली आहे.

प्रचंड अस्वस्थ करणारी, अंतर्मुख करणारी, महानगरी मुंबईतील सफाई कामगारांचं आणि त्यांच्या नव्या पिढीचं जगणं विलक्षण सामर्थ्यानं टिपणारी महान कथा.
प्रत्येकाने आवर्जून वाचायलाच हवी अशी, क्वचितच लिहिली जाणारी तगडी कथा.

-प्रा.हरी नरके, ५ नोव्हेंबर २०१८

Wednesday, October 31, 2018

ऋतुरंग- वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार दिवाळी अंक




ऋतुरंग हा दिवाळी अंक सर्वोत्तम दिवाळी अंकापैकी एक मानला जातो. सातत्याने आणि सलगपणे दर्जा टिकवून ठेवणे ही फार अवघड गोष्ट आहे. ऋतुरंगचे हे २६ वे वर्ष आहे. "बीज अंकुरे अंकुरे" या एका संकल्पनेवरचे २९ लेख असलेला या वर्षीचा हा अंक वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार दिवाळी अंक ठरला आहे. ख्यातनाम कवी आणि संपादक अरूण शेवते यांनी सलग २६ वा अंक दणकट आणि संग्राह्य बनवलेला आहे.

शेवते या अंकासाठी वर्षभर काम करतात. प्रत्येक लेख लिहिला जात असताना आणि तो संपादित करताना ते व्यक्तीश: परिश्रम घेतात. त्यामुळे अंक तर हातोहात संपतोच पण नंतर त्याचे पुस्तक प्रकाशित होते. त्यांच्या २५ वर्षांच्या २५ दिवाळी अंकांची आजवर ५० पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ही कामगिरी असाधारण म्हटली पाहिजे.

या वर्षीच्या अंकात गिरिश कुबेर, मेघना गुलजार, दीपिका पदुकोण, अंबरिश मिश्र, जनार्दन वाघमारे, नागराज मंजुळे, कल्पना दुधाळ, केदार वैद्य, आनंद नाडकर्णी, हेरंब कुलकर्णी, प्राजक्त देशमुख, नितीन चव्हाण यांचे लेख भन्नाट आहेत. वाचलेच पाहिजेत असे. दीर्घकाळ मनात रेंगाळणारे.

राजेंद्र ओंबासे, सु.वा.कुलकर्णी आणि रमेश राठिवडेकर ही पुस्तक विक्रीच्या क्षेत्रातील तीन तालेवार नावं. पण या तिघांनी फूटपाथवर रद्दी विकणं, दुसर्‍यांच्या दुकानांमध्ये नोकर म्हणून अतिशय हलकी कामं करणं अशी सुरूवात करून अफाट मेहनतीच्या आणि कर्तबगारीच्या जोरावर जी उत्तुंग भरारी घेतलीय ती वाचताना त्यांचा अभिमान वाटतो.आज देशात लाखोच काय कोट्यावधी युवक बेकार-बेरोजगार आहेत. त्यांनी या यशोगाथा वाचाव्यात आणि प्रेरणा घ्यावी.

वाफसा ह्या कल्पना दुधाळ यांच्या लेखाचा विशेष उल्लेख करायला हवा. ह्या कवयित्रीने कवितेच्या प्रातांत जोरदार मुसंडी मारलेली आहे. त्या मुळात शेतकरी आहेत. माहेरहून आजीने दिलेल्या भोपळ्याच्या बिया त्यांनी आपल्या सासरी पेरल्या तेव्हा झालेली चेष्टा, निगुतीनं घेतलेली काळजी आणि मग आलेलं चवदार भोपळ्यांचं मुबलक पिक, गोड मक्याच्या पिकाच्या आठवणी आणि पोतंभर बडीशेप पिकवली त्याची गोष्ट त्या ज्या जिव्हाळ्यानं सांगतात त्यानं हा लेख सरस बनत जातो. अस्सल मातीचा सुगंध असलेलं रसदार लेखन. स्वप्नपुर्ती,  श्री पी.डी.पाटील आणि अमृत, निळकंठराव जगदाळे यांचे यशोगाथात्मक लेखही जमून आलेत. पुर्णब्रह्म-जयंती कठाळे, मानसी होळेहुन्नूर, जांभूळ-तात्यासाहेब आर.ओ.पाटील, रवींद्र पांढरे,  या यशोगाथा प्रेरणादायी आहेत. उर्जादायी आहेत.

मुकेश माचकर, जुई कुलकर्णी, दिनेश गुणे, प्रशांत गडाख, प्रदीप म्हापसेकर, दगडू माळी आणि विजय पाडळकर यांचे लेखही उल्लेखनीय.

शेवतेंच्या प्रत्येक अंकात गुलजार असतातच. याही अंकात त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथातील मस्त कविता आहेत. अनुवादासाठी किशोर मेढेंना धन्यवाद.

आज मराठीत उणेपुरे ३५० ते ४०० दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यातले ५ ते १० टक्के दर्जेदार, ३५% चांगले, ४०% ठीक-बरे आणि १५ ते २०% कचरा असतात.

२२४ पृष्ठांच्या ऋतुरंगमधली मजकूर असलेली बहुतेक सगळीच पानं वाचनीय असणं ही कामगिरी सोपी नाही. याही अंकात काही मजकूर बरा किंवा ठीक म्हणता येईल असा आहे, मात्र त्याचं प्रमाण १०% पेक्षाही कमी आहे. उर्वरित ९०% मजकूर उत्तम, भिडणारा आणि  वाचनानंद देणाराय.

ऋतुरंगला  अ++  श्रेणी द्यावी लागेल.

अप्रतिम मुखपृष्ठापासून, रेखाटनं, छायाचित्रं, मजकूराचा टाईप, अंकाची मांडणी या सार्‍यांमुळे ऋतुरंग २०१८ हा अंक खरोखरच मजबूत आणि संग्राह्य बनलेला आहे. अरूणराव शेवते आणि टिमचं हार्दीक अभिनंदन.

-प्रा. हरी नरके, ३१ ऑक्टोबर २०१८

Monday, October 29, 2018

सरदार पटेल, पंडीत नेहरू आणि परस्परपूरकता



१. काँग्रेस पक्षसंघटनेवर सरदार पटेलांची मजबूत पकड होती. पक्षाची बांधणी, शिस्त, पक्षनिधी, दैनंदिन कामकाज यावर पटेलांचे बारीक लक्ष असे.घटना सभेवर निवडून आलेल्यांपैकी ७० ते ७५ टक्के प्रतिनिधी हे पटेलांना मानणारे होते. त्यातल्या बहुतेकांची सरदारांनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा होती. त्यांचे म्होरके पटेलांना भेटले व नेहरूंऎवजी तुम्ही पीएम व्हा असा आग्रह करू लागले.
पटेलांनी त्यांची समजूत घातली. "नेहरू प्रचंड लोकप्रिय नेते आहेत. तुम्ही जरी माझ्याशी एकनिष्ठ असलात तरी लोकशाहीत सर्वात महत्वाची असते ती जनता. आणि आपल्या पक्षाला भरभरून मतं देणारी जनता नेहरूंकडे बघून तुम्हाला मला मतं देत असते. तेव्हा नेहरूंनीच पंतप्रधान होणं लोकशाहीसाठी सर्वोत्तम आहे."
२. काँग्रेस पक्षातर्फे संविधान परिषदेवर निवडून आलेल्यांमध्ये १०० जण बॅरिस्टर होते. स्वत: नेहरू, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद आणि पटेल बॅरिस्टर होते. महात्मा गांधी घटना परिषदेचे सदस्य नसले तरी ते पक्षाचे सर्वोच्च नेते होते आणि तेही बॅरिस्टर होते.
एकदा पक्षातले काही बॅरिस्टर्स पटेलांकडे तक्रार घेऊन गेले. आपल्या पक्षात इतके घटनातज्ञ बॅरिस्टर्स असताना त्यांच्यावर अन्याय करून तुम्ही पक्षाबाहेरच्या एका बॅरिस्टरला देशाचे कायदामंत्रीपद, घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद आणि मसुदा छाननी समितीचे अध्यक्षपद दिले हा निष्ठावंतावार "अन्याव" असल्याचा त्यांचा दावा होता.
पटेलांनी त्यांना सांगितले, "तुम्ही बॅरिस्टर्स आहात, घटनातज्ञ आहात म्हणूनच तुम्हाला आम्ही घटनासभेवर घेतलेले आहे. तुमच्या ज्ञानाचा उपयोग देशाला झाला पाहिजे. आपल्या सरकारचे मंत्रीमंडळ सर्वोत्तम आणि प्रातिनिधिक असायला हवे म्हणूनच आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, श्री बॅनर्जी या पक्षाबाहेरच्या मान्यवरांना निमंत्रित केलेले आहे. फाळणीची जीवघेणी जखम आणि राष्ट्रीय एकात्मतेची सध्या देशाला असलेली सर्वोच्च आवश्यकता यासाठी आपल्याला समावेशक आणि समंजस राहायला हवे. आडमुठेपणा आणि हेकेखोर वृत्ती देशाला घातक ठरेल. आपण लोकशाही समाजाची पायाभरणी करतो आहोत. पक्षहितापेक्षा देशहिताला सर्वोपरी महत्व द्यायला शिका. आपल्या पक्षाबाहेरचे हे लोक जागतिक पातळीवरचे एक्सपर्ट आहेत. त्यांची देशाला गरज आहे.म्हणूनच आम्ही सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे."
तरिही बॅरिस्टर्स लोकांची नाराजी काही गेली नाही. काही जण बंडाची भाषा करू लागले.
तेव्हा पटेलांनी त्यांना शांतपणे पण जरबेच्या भाषेत सांगितले, "राजकारणात उतावळेपणाने नुकसान होते. गडबड कराल तर तुम्हाला माहितच आहे की तुमच्या पक्षाचे आम्ही पाचही श्रेष्ठी
बॅरिस्टर्सच आहोत. तुमची वकीली उत्तम चालते म्हणून भविष्यातला मजबूत, एकात्म व समृद्ध भारत घडवण्यासाठी द्रष्टी राज्यघटना लिहिण्याची क्षमता तुमच्याकडे आहे असा भ्रम बाळगू नका. या दोन बाबींची गल्लत करू नका. माझी मू्ठ झाकलेली आहे, ती तशीच राहू द्या."

-प्रा.हरी नरके, २९ ऑक्टोबर २०१८

Saturday, October 27, 2018

पुरस्कार




[१] १९४० सालची घटना. राज्य पातळीवरची एक कादंबरी लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. त्याकाळात ५०० रूपयांचा प्रथम पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली होती. अनेक नव्या जुन्या साहित्यिकांनी स्पर्धेत भाग घेतलेला होता.
स्पर्धेचा निकाल घोषित झाला.
आज ज्या कादंबरीला मराठीतील श्रेष्ठ आणि अभिजात कलाकृती मानली जाते त्या रणांगणला हा पुरस्कार विभागून मिळाला होता. कादंबरीकार विश्राम बेडेकर काहीसे खट्टू झाले. त्यांनी परिक्षक कोण होते अशी संयोजकांकडे चौकशी केली.
नाव कळले- साहित्यसम्राट न.चिं.केळकर आणि वि.सी.गुर्जर हे परिक्षक होते.
बेडेकर काय बोलणार?
पुरस्कार जिला विभागून मिळालेला होता ती दुसरी कादंबरी होती, पाणकळा, र.वा. दिघे यांची. हीही आज मराठीतील श्रेष्ठ आणि अभिजात कादंबरी ठरलेली आहे.

र.वा.दिघेंचे नाव तेव्हा अगदीच नवखे होते. त्यांना फारसे कोणी ओळखतही नव्हते. जमखिंडीच्या साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार होते. रेल्वेत आणि बसमध्ये काही नामवंत साहित्यिक मंडळी दिघे आणि पाणकळा यांची यथेच्छ टिंगलटवाळी करीत होते. दिघे मात्र शांतपणे ही निंदानालस्ती ऎकत होते.
या टिंगलखोरांचे नेतृत्व करीत होते, वि.स.खांडेकर.
त्यावेळी आपण पाणकळाला कमी लेखले हे आपले चुकलेच असे खांडेकरांनी पुढे जाहीरपणे कबूलही केले.

२. अनंत काणेकर हे नामवंत आणि पट्टीचे व्याख्याते होते.
ते झेवियर्स कॉलेजात शिकत असताना महाविद्यालयाने वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. रू.२५ चा पहिला आणि रू.२० चा दुसरा पुरस्कार देण्यात येणार होता.
तथापि या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.
तेव्हा काणेकर आणि त्यांचे मित्र मोतिराम कर्णिक अशा दोघांनीच आपली नावे स्पर्धेत दाखल केली.

त्यांनी आपापसात ठरवून घेतले होते की पहिला आणि दुसरा क्रमांक कोणालाही मिळो पुरस्काराची रक्कम मात्र रूपये २२.५०/- अशी आपण समसमान वाटून घ्यायची.
आणि तसेच झाले.
-प्रा.हरी नरके, २५ ऑक्टोबर २०१८

Friday, October 26, 2018

महाविद्यालयीन जीवनातली काळी करडी युवागाथा





श्री प्रणव सखदेव हे नव्या पिढीतले महत्वाचे लेखक आहेत. त्यांची या आठवड्यात प्रकाशित झालेली "काळे करडे स्ट्रोक्स" ही मजबूत कादंबरी आहे. सखदेव यांची लेखनकळा प्रवाही, चित्रशैलीतली आणि वाचकांशी गप्पा मारणारी आहे. मुंबईच्या रूईया महाविद्यालयात शिकणार्‍या तीन युवक युवतींची उत्तर आधुनिक काळातली चटका लावणारी गोष्ट या कादंबरीतून उलगडत जाते. समीर, सानिका आणि सलोनी या तिघांची वाचकांशी दोस्ती होऊन जाते. अरण्या उर्फ अरूण आणि दादूकाका ही भन्नाट अवलियांची जोडी तर काळजातच घुसते. रूईया महाविद्यालयाचा परिसर, दडकर कट्टा, दादर, फाइव्ह गार्डन, मुंबई लोकलचा व्हीडीयो कोच आणि हिमाचल प्रदेश मधलं मॅकलीओडगंज ही नुसती स्थळं न राहता या कादंबरीतली अफलातून पात्रं बनुन आपल्याला भेटतात. मुंबईचा पाऊस, विशेषत: २६ जुलैचा महाप्रलय, २६ अकराचा अतिरेकी हल्ला हे केवळ नेपथ्य न राहता या गोष्टीचा आलेख उंचावत नेणारं कलात्मक शक्तीस्थळ बनत जातं.

सखदेवांनी समकालीन युवकांची घुसमट अतिशय प्रभावीपणे चितारलेली आहे. प्रत्येक महानगरी माणूस हा आपापल्या ओझ्यांनी, अपार दु:खांनी गांजलेला असतो. जनरेशन गॅप, सामाजिक - सांस्कृतिक गोची आणि विस्कटलेली, पोकळीत जगणारी युवापिढी यांची ही सिंफनी मूळातून अनुभवायला हवी. आपल्या आजुबाजूच्या पर्यावरणातला समकालीन कोलाहल सखदेव भेदक पद्धतीनं टिपत जातात. सोनेरी युवावस्था आणि परिस्थितीचे काळे ढग यांची करडी काळी पोकळी वाचकाला तुफान घेरून सोडते. थेट दंशच करते.

मासकॉंम करणार्‍या समीरला चित्रपट दिग्दर्शक बनायचं असतं. सलोनीला तिच्या आजारावरच्या अत्त्याधुनिक उपचारांसाठी न्यूझीलंडला जायचं असतं. सानिकाला डेथविश असते.. काय होतं त्यांचं?
समीरला विलास सारंग आणि तारकोव्हस्की आवडत असतात. भन्नाट आयुष्य जगणार्‍या अरूणलाही.
अवघ्या २१९ पृष्ठांमध्ये सखदेव फार मोठा ऎवज आपल्यापुढे चितारत जातात. कथेतली पात्रं गोलगोल न फिरता सतत विकसित होत जातात. त्यांची मानसिक आंदोलनं आपल्याला जखमी करत जातात. छळतात. तरूण पिढीचा टिपलेला जिवघेणा संघर्ष, औदासिन्य, व्यसनं, सेक्स, हलकल्लोळ,कोलाहल,पोकळी आणि आरपार भिडत जाणारा रक्ताळलेला प्रवास यामुळे ही कादंबरी महत्वाची ठरते.

मरण काय असतं
जगण्याचा एक भाग बनून
अचानक फणा काढतं
आणि जातं डसून

इथून सुरू झालेली ही चित्तरकथा

उदासी
चमकत्या अंधाराच्या दिवसांची
जिच्या फण्यावर
हिंदळतोय
तुझ्या-माझ्या नात्याचा आस....

इथवर घेऊन जाते. कादंबरी संपली तरी तिच्या अनुभवातनं आलेली अस्वस्थता चिरत राहते.

रोहन प्रकाशनाची ही दर्जेदार ग्रंथनिर्मिती असून साजेसं मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांचं आहे. अनुजा जगतापांनी ग्रंथ संपादन केलंय तर प्रकल्प समन्वयक आहेत रोहन चंपानेरकर

टिम रोहन आणि प्रणव सखदेव तुम्ही लय भारी काम केलेलं आहे.

-प्रा.हरी नरके, २५ ऑक्टोबर २०१८

काळे करडे स्ट्रोक्स, प्रणव सखदेव, रोहन प्रकाशन, पुणे, १८ ऑक्टोबर २०१८, दसरा, युथ एडिशन, रू. १९९/-, पृष्ठे २१९