Thursday, November 9, 2017

आईेनं आयुष्यभराची पुंजी चळवळीला देऊन टाकली -





माझे वडील मी खूप लहान असताना गेले. पुढचं आमचं सगळं आईनंच केलं.
आई आम्हा चिल्यापिल्यांसाठी रात्रंदिवस राबायची. मोलमजुरी करायची, ती निरक्षर होती.
कष्टाला वाघीण, तापट स्वभावाची, व्यसनांबद्दल कमालीची चिड असणारी.
एकदा मोठ्या भावानं मित्रांच्या संगतीत दोन घोट घेतले.
आईला कळल्यावर ती इतकी संतापली की तिनं सलग दहा दिवस अन्नसत्त्याग्रह केला.
परिणामी आम्हा भावंडांना आयुष्यात कसलंही व्यसन जडलं नाही.
त्या दिवसांची आठवण म्हणून पुढं दरवर्षी ती दहा दिवस उपास करायची.
निळूभाऊ फुले खलनायकाची कामं करतात म्हणून त्यांच्यावर तिचा फार राग होता. ते पहिल्यांदा आमच्या घरी आले तेव्हा ती त्यांच्यावर फार भडकली होती. त्यांना चिडून बोलली होती.
एकदा स्वत: भाऊंनीच तिला शुटींग पाहायला नेलं नी ते कसं खोटं असतं, नाटक असतं याची तिची खात्री पटवली. मग ती भाऊंची फॅन झाली.
हातपाय धट्टेकट्टे असताना आपल्याला मृत्यू यावा अशी तिची प्रबळ इच्छा होती आणि ती वयाच्या 85 व्या वर्षी गेली तीही चालताबोलतानाच.
तिला जाऊन 12 वर्षे झाली.

जाताना ती तिची शेवटची इच्छा सांगून गेली, मोलकरणीचं काम करून, मोलमजुरी करून तिनं आयुष्यभरात काही छोटेछोटे दागिने केले होते, ते मोडा, नी महाराष्ट्रातल्या 10 सामाजिक नी शैक्षणिक संस्थाना ती रक्कम भेट द्या. निळूभाऊंच्या हस्ते हा कार्यक्रम करावा अशी तिची  इच्छा होती.
निळूभाऊ त्यासाठी आमच्या गावी तळेगाव ढमढेरेला आले.
हजारो लोकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम झाला.
आम्ही भावंडांनी तिच्या नावानं गावात एक व्याख्यानमाला सुरू केलीय. आजवर अनेक नामवंत त्या व्याख्यानमालेला आवर्जून आलेत.
त्याच कार्यालयात परवा [सोमवार, दि.13 रोजी,] या सोनाई व्याख्यानमालेत लेखक, समीक्षक नी विचारवंत संजय भास्कर जोशींचं व्याख्यान होईल.
ती गेली तेव्हा मी नेहमीप्रमाणे एका सामाजिक कार्यक्रमाला विदर्भात गेलोतो.
कळल्यावर आलो तोवर अंत्यसंस्कार झालेले होते. येताना रस्त्यात सतत डोळे भरून यायचे.
माझे अतिशय आवडते लेखक चारूता सागर यांची वाट ही कथा मला अतिशय भावलेली.
आजारी आईच्या शेवटच्या भेटीला निघालेल्या लेकीची परवड चित्रित करणारी. चटका लावणारी. डोळ्यातून पाणी काढणारी.
ते पुस्तक एका मित्रानं माझ्याकडून वाचायला नेलं नी हरवलं. त्या कथासंग्रहाचं नावच काही केल्या मला आठवत नव्हतं. जणू मेमरी इरेझ झालेली.
आईच्या अंत्यविधीला निघालो असताना प्रवासात ती कथा मला आठवली आणि अनेक वर्षे विस्मृतीत गेलेलं कथासंग्रहाचं नाव अचानक आठवलं. "नागीण"
माझा मित्र भीमराव गोपनारायण याची "सर्वा" या कवितासंग्रहातली एक दोनोळी माझ्या आईचीच भावना सांगते जणू.
"असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती
माझी आई म्हणते चार भिंतींचं घर मी एकटी चालवते."
- प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment