Wednesday, November 29, 2017

महात्मा फुले आणि तळेगाव ढमढेरे







14 जून 1887 रोजी महात्मा फुले यांनी तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि.पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून एक ऎतिहासिक सामाजिक लढा दिला होता.
न्हावी,धनगर, कुणबी,महार,मांग भंगी आणि माळी समाजातील महिलांनी शिबूबाई विठोबा भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन नारायण काशिबा कर्‍हेकर या नाभिक बांधवाच्या कन्येचं लग्न सत्यशोधक पद्धतीनं लावलं.
या लग्नांची 5 वैशिष्ट्ये म्हणजे, हुंड्याला नकार, लग्नात अवाजवी खर्च न करणे, मानपानाच्या खर्चात बचत करून ती रक्कम शाळांना देणगी देणं, लग्न कोणत्याही जातीचं असलं तरी गावातल्या महार भगिनीने लग्नमंडपात उपस्थित राहून नवरदेवास ओवाळणे आणि लग्नाला भटजीला न बोलावणे.
त्यामुळे आपली दक्षिणा बुडाली म्हणून तळेगाव, कासारी, तांबूळ ओढा या गावांमधील सीताराम यशवंत भवाळकर आणि लखोबा गोपाळ कुलकर्णी यांनी अशा सत्यशोधक लग्नांना विरोध केला. दुलेराव सटवाजी पिंगळे यांना धमकावण्यात आले. एका देवऋष्याची मदत घेऊन महिलांवर प्रचंड दबाव आणण्यात आला.
अशा वेळी स्वत: महात्मा फुले तेथे गेले आणि त्यांनी सर्व महिला व अलुते, बलुते, दलित यांची एकी घडवून ही लग्नं यशस्वी केली. या भागात सत्यशोधक विवाहांची चळवळ उभी राहिली.
या संघर्षाबाबतचा तपशीलवार वृत्तांत स्वत: महात्मा फुले यांनीच 2 भागात जून आणि जुलै 1887 च्या "दीनबंधू" मध्ये प्रकाशित केला.
महात्मा फुले व सावित्रीबाई तळेगावात एक शाळाही चालवित असत.
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे याच गावचे.
31 वर्षांपुर्वी 1986 साली गावच्या जत्रेत मला कारभारी किसनभाऊ भुजबळ यांनी भाषणाला बोलावले.
माझ्या भाषणात मी हा इतिहास सांगितला. गावात जोतीरावांचे स्मारक करावे अशी विनंती केली.
त्यामुळे गावच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसराचे नामकरण महात्मा फुले परिसर करण्यात आले. आवारात जोतीरावांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.
जत्रेतले तमाशे, कुस्त्या, बैलगाडा शर्यती यातील अफाट खर्चात बचत करून शाळा आणि महाविद्यालयाला मदत दिली जावी, गरिब,हुशार मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाला यातून मदत करावी ह्या सुचनाही अंशत: अमलात आल्या.
गेली 12 वर्षे सोनाई व्याख्यानमालेत राज्यातील नामवंत वक्ते बोलावण्याची प्रथा आपण निर्माण करू शकलो. प्रथमच व्याख्यानमालांची संस्कृती उभी राहू लागली.
पिकतं तिथं विकत नाही अशी म्हण या गावानं चक्क खोटी ठरवली.
माझं भाषण गावात व्हावं म्हणून खुपदा निमंत्रणं आली. पण मी जाऊ शकलो नाही.
यावर्षी 28 नोव्हेंबरला मी आलंच पाहिजे असा ग्रामस्थांचा व कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह होता.
कालच्या व्याख्यानाला तुफान गर्दी लोटली होती.
मुख्य म्हणजे भाषणानंतर तात्काळ त्याचे काही परिणामही दिसले.
महेश बापू ढमढेरे यांनी गावात "शेतकर्‍यांचा आसूड" या महाग्रंथाचे सामुदायिक वाचन करू अशी घोषणा केली तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरतीताई भुजबळ यांनी गावातल्या महिलांना एकत्र आणून गावात दारूबंदी करू अशी घोषणा केली. माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी फुल्यांच्या शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असा शब्द जाहीरपणे दिला.
या कार्यक्रमाला महिला, तरूण आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
31 वर्षांनी का होईना गाव कूस बदलतोय.
शेवटी सामाजिक परिवर्तनाची आपली अशी एक गती असते! वेग असतो.
-प्रा.हरी नरके

Wednesday, November 22, 2017

Dr Rakhmabai Save-Raut Googl's Tributes

Sincere Tributes to Dr. Rukhmabai Raut,
India's first practicing woman Doctor.
Rukhmabai had studied in London School of Medicine in 1889.Today is her 153rd Birth Anniversary.
डॉ. रखमाबाई सावे-राऊत,रूग्णसेवा करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर
यांना 153 व्या जयंतीनिमित्त गुगलची आदरांजली-
जन्म-22नोव्हेंबर1864  - मृत्यू-25डिसेंबर1955

आज बुधवार दि. 22 नोव्हेंबर - डॉ. रखमाबाई यांची 153 वी जयंती
-भारत ज्यांना विसरलेला आहे.
सुमारे 92 वर्षे आयुष्य लाभलेल्या या डॉ. रखमाबाई सावे-राऊत यांनी आयुष्यभर झोकून देऊन समर्पित वृत्तीनं रुग्णसेवा केली.
त्या खुप लहान असताना त्याकाळातील बालविवाहाच्या प्रथेप्रमाणे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं लग्न दादाजींबरोबर झालं.
लग्नानंतर काही वर्षे त्या माहेरीच राहिल्या.
पुढे त्यांनी सासरी नांदायला यावं अशी त्यांच्या नवर्‍यानं मागणी केली.
रखमाला खुप शिकायचं होतं. डॅाक्टर व्हायचं होतं. त्यासाठी परदेशात जावं लागणार होतं. सासरी गेल्यास हे स्वातंत्र्य मिळणार नाही अशी तिला भिती वाटत होती.
त्याकाळात भारतात महिला डॅाक्टर नव्हत्या.
आनंदीबाई जोशी खुप जिद्दीनं शिकल्या. डॅाक्टर झाल्या. परंतु वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या भारतात आल्या त्याच आजारी पडून आणि त्याच आजारात त्या गेल्या. त्या एकही पेशंट तपासू शकल्या नाहीत ही दु:खद गोष्ट.
रखमाबाई नांदायला जात नाहीत म्हणून दादाजीनं त्यांच्यावर खटला भरला. तो जगभर गाजला.
इंग्रज न्यायालयाने हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं रखमाबाईनं नांदायला जावं असा निकाल दिला. न गेल्यास कोर्टाची बेआदबी केल्याबद्दल तुरूंगवास पत्करावा असंही सांगितलं.
बहाद्दर रखमाबाई तुरूंगात जायला तयार झाल्या.
पुढे लोकपुढाकारानं दादाजीबरोबर समझोता झाला नी रखमाबाईला घटस्फोट मिळाला.
वयाच्या 25 व्या वर्षी रखमाबाई इंग्लंडला गेल्या. एम.डी. झाल्या.
मुंबईच्या कामा हास्पीटलमध्ये, सुरतेला आणि राजकोटला त्यांनी आयुष्यभर आरोग्य सेवाकार्य केले. पुढे त्या आजन्म अविवाहीतच राहिल्या.
त्यांचं जीवन हा महिला हक्क चळवळीचा, आरोग्यसेवेचा आणि समर्पित वृत्तीचा धगधगता इतिहास होय. आज भारत त्यांना विसरलेला आहे.
त्यांच्या प्रेरक आणि पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन-
-प्रा.हरी नरके

What an incredible lady


Prerna Tambay - Anandi Gopal Joshi qualify as first Indian lady doctor. However, she never practised medicine due to her premature death just after returning back from America. Rukhmabai Save-Raut was a child bride who wanted to study and she refused to stay with her husband. She was sharply aware that if she went to her in-laws she would not be able to study. Her husband, Dadaji filled petition against her. She agreed to go to jail but refused to give up her dream. At the age of 25 she went to England to do her MD. She practised medicine in Mumbai and in Surat, till the end of her life. What an incredible lady, she deserves her due and loads of respect. Today we celebrate her 153 birth anniversary.- प्रेरणा तांबे-लंडन

Tuesday, November 21, 2017

मी महंमद खान शपथेवर सांगतो की---


महंमद आमिर खान जुन्या दिल्लीतील गरीब कुटुंबातील मुलगा.
दहावीच्या परीक्षेनंतर कराचीत राहणार्‍या आपल्या मोठया बहिणीला भेटायला गेला. दिल्लीतील गुप्तहेर यंत्रणेचे अधिकारी त्याच्यावर पाकिस्तानातून एक पाकीट आणण्याची कामगिरी सोपवतात.
देशप्रेमापोटी अजाणतेपणे तो होकार देतो.
कराचीत तिथल्या पोलीसांच्या भीतीपोटी तो ते पाकीट फेकून देऊन रिकाम्या हातानं दिल्लीला परततो.
दिल्ली पोलीस त्याचं अपहरण करतात.
गुप्तहेर यंत्रणा त्याचा अतोनात छळ करतात.
त्याच्यावर तब्बल 19 खोटे खटले भरले जातात. त्याला अतिरेकी ठरवले जाते.
खोटे साक्षीदार उभे केले जातात. बनावट पुरावे तयार केले जातात.
चौदा वर्षे त्याला कच्च्या कैदेत तुरूंगात काढावे लागतात.
त्याचे वडील कोर्टात हेलपाटे मारून थकतात. मरून जातात. आईही थकते. अर्धांगवायूनं आजारी पडते. मरते.
अखेर त्याची 17 केसेसमधून निर्दोष सुटका होते. दोन खटले अद्यापही रेंगाळलेत.

पुस्तकाच्या शेवटी तो म्हणतो,"मी पुर्णपणे मुक्त नसलो, तरी तुरुंगातही नाहीये. अन्यायाविरूद्ध लढतोय आणि आपल्यापैकी आणखी काही लोक लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या या लढ्यात सहभागी झाले, तर आपण समाज बदलू शकतो."
एक निरपराध तरूणाची वयाच्या अवघ्या 20 वर्षांपासून तुरुंगवासानं सुरू होणारी ही लढत आज पस्तीशीच्या टप्प्यावर पोचलीय.
एक विलक्षण सुन्न करणारं आत्मकथन-
राजहंस प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती सप्टेंबर 2017, पृष्ठे 156,किंमत रू.180/-
-प्रा.हरी नरके

Saturday, November 18, 2017

22 नोव्हेंबर रोजी डॉ.रखमाबाई यांची 153 वी जयंती-


आज बुधवार दि. 22 नोव्हेंबर रोजी डॉ. रखमाबाई यांची 153 वी जयंती- आज भारत त्यांना विसरलेला आहे.
डॉ. रखमाबाई सावे-राऊत रूग्णसेवा करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॅाक्टर
जन्म- 22 नोव्हेंबर, 1864 मृत्यू- 25 डिसेंबर, 1955

सुमारे 92 वर्षे आयुष्य लाभलेल्या या डॉ. रखमाबाई सावे-राऊत यांनी आयुष्यभर झोकून देऊन समर्पित वृत्तीनं रुग्णसेवा केली.
त्या खुप लहान असताना त्याकाळातील बालविवाहाच्या प्रथेप्रमाणे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं लग्न दादाजींबरोबर झालं.
लग्नानंतर काही वर्षे त्या माहेरीच राहिल्या.
पुढे त्यांनी सासरी नांदायला यावं अशी त्यांच्या नवर्‍यानं मागणी केली.
रखमाला खुप शिकायचं होतं. डॅाक्टर व्हायचं होतं. त्यासाठी परदेशात जावं लागणार होतं. सासरी गेल्यास हे स्वातंत्र्य मिळणार नाही अशी तिला भिती वाटत होती.
त्याकाळात भारतात महिला डॅाक्टर नव्हत्या.
आनंदीबाई जोशी खुप जिद्दीनं शिकल्या. डॅाक्टर झाल्या. परंतु वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या भारतात आल्या त्याच आजारी पडून आणि त्याच आजारात त्या गेल्या. त्या एकही पेशंट तपासू शकल्या नाहीत ही दु:खद गोष्ट.
रखमाबाई नांदायला जात नाहीत म्हणून दादाजीनं त्यांच्यावर खटला भरला. तो जगभर गाजला.
इंग्रज न्यायालयाने हिंदू धर्मशास्त्राप्रमाणं रखमाबाईनं नांदायला जावं असा निकाल दिला. न गेल्यास कोर्टाची बेआदबी केल्याबद्दल तुरूंगवास पत्करावा असंही सांगितलं.
बहाद्दर रखमाबाई तुरूंगात जायला तयार झाल्या.
पुढे लोकपुढाकारानं दादाजीबरोबर समझोता झाला नी रखमाबाईला घटस्फोट मिळाला.
वयाच्या 25 व्या वर्षी रखमाबाई इंग्लंडला गेल्या. एम.डी. झाल्या.
मुंबईच्या कामा हास्पीटलमध्ये, सुरतेला आणि राजकोटला त्यांनी आयुष्यभर आरोग्य सेवाकार्य केले. पुढे त्या आजन्म अविवाहीतच राहिल्या.
त्यांचं जीवन हा महिला हक्क चळवळीचा, आरोग्यसेवेचा आणि समर्पित वृत्तीचा धगधगता इतिहास होय. आज भारत त्यांना विसरलेला आहे.
त्यांच्या प्रेरक आणि पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन-
-प्रा.हरी नरके

Friday, November 10, 2017

पोरगं सतत कोंगाड भाषेत बोलतय -



"महाराज, पोरगं सतत कोंगाड भाषेत बोलतय, डोक्यावर कायतरी परीणाम झालेला असणार. जालीम इलाज करा."
माझी आई देवऋषीला सांगत होते.
देवऋषी म्हणाले, "पोराला लागीर झालंया. मसणवट्यातनं जाताना बाधा झालीया."
पाचवीत आम्हाला भानुदास कोंडीबा गाडे नावाचे शिक्षक इंग्रजी विषय शिकवायचे. ते समर्पित शिक्षक होते. ते भान हरपून विषयात आणि मुलांमध्ये रमायचे. ते बारामतीजवळच्या चोपडजचे असल्यानं त्यांची भाषा आम्हा पुणेकरांना थोडी गमतीची वाटायची. आमच्या वर्गात साधना गांधी नावाची एक मुलगी होती. तिचं किराणा मालाचं दुकान होतं. त्या काळात मोठी रॉकेल टंचाई असायची. तर एके दिवशी सर भर वर्गात तिला म्हणाले,"गांधी तुझ्यात रॉकेल अस्तंय काय?" सगळा वर्ग हसला.
ते दररोज 5 नवे इंग्रजी शब्द शिकवायचे आणि जे विद्यार्थी त्या शब्दांचे स्पेलिंग पाठ करून येतील त्यांना स्वखर्चानं पेन, पेन्सील, खोडरबर भेट द्यायचे. दररोज आपल्याला पहिलं बक्षीस मिळावं म्हणून मी घरीदारी सतत धोसरा घेऊन स्पेलिंग पाठांतर मोहीमेवर असायचो.
देवऋषी महाराजांनी सांगितलेली उपाययोजना फारच तापदायक होती. आई दररोज भल्या पहाटे मला उठवायची. डिसेंबरमधली कडक थंडी.
नदीवर जाऊन त्या कडक थंडीत आंघोळ करायची, मग ओलेत्या कपड्यांनी मसणवट्याशेजारच्या पिंपळाला 101 फेर्‍या मारायच्या.
पहिल्या नी शेवटच्या फेरीत पिंपळाला उडीद वहायचे. असं हे सव्वा महिना रोज चालू होतं.
मला खुप राग यायचा. पण आई हातात छडी घेऊन स्वत: सुपरव्हिजन करायची.
तिला मी इंग्रजी स्पेलिंग पाठ करतोय हे पटायचंच नाही.
आमच्या झोपडीशेजारी एकुण तीन स्मशानं होती. त्यातल्या पारशांच्या स्मशानात मी नोकरी करीत असल्यानं मला तिकडची भिती वाटायची नाही. शेजारच्या हिंदू नी बाजूच्या मुस्लीम स्मशानात जाताना मात्र थोडी भिती वाटायची. त्यावर उपाय म्हणुन मी मला येत असलेली सगळी स्तोत्रं म्हणायचो.
शेवटी स्वत: गाडेसरांनी घरी येऊन आईची समजूत घातली. त्यावर आईचं म्हणणं, " गुर्जी, तुम्ही म्हणताय तर ठीकच असंल. पण मी म्हणते, असली कोंगाड कोंगाड भाषा आपण शिकावीच कशाला?"
- प्रा. हरी नरके
फोटो- नातीसोबत आई [प्रमिती]-1993

Thursday, November 9, 2017

फेसबुकमुळे निघाली दुर्मिळ पुस्तकाची नवी आवृत्ती


"डॉ.रखमाबाई : एक आर्त" या पुस्तकाबद्दल दोन महिन्यांपुर्वी मी टाकलेल्या एक पोस्टने बघताबघता ग्रंथ चळवळीचे रूप घेतले नी त्याचे थेट फलित आज वाचकांच्या हातात पडले आहे.
1982 सालचे हे चरित्र गेली तीन दशके उपलब्ध नव्हते. डॉ.रखमाबाई सावे या देशातील पहिल्या महिला डॅाक्टर ज्यांनी वयाच्या 91 वर्षांपर्यंत रूग्णसेवा केली. डॉ.रखमाबाईंपुर्वी आनंदीबाई जोशी डॅाक्टर झाल्या होत्या खर्‍या परंतु त्या भारतात परत आल्या नी आजारी पडल्या व त्यांचे लगेच अकाली निधन झाले.त्या एकही पेशंट तपासू शकल्या नाहीत. त्यांना वैद्यकीय सेवाच करता आली नाही.
वैद्यक क्षेत्रातील आणि विशेषत: महिला डॅाक्टर्सना या पुस्तकामुळे एक नवी उर्जा मिळेल.
पुस्तकाचे मूळ प्रकाशक असलेल्या पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीनं अस्मिता मोहिते फे.बु.पोस्ट वाचून त्वरीत पुढे आल्या नी 350 प्रती आगावू नोंदल्या गेल्यास आपण या ग्रंथाची विशेष आवृत्ती काढू अशी त्यांनी घोषणा केली.
आगावू नोंदणीचे आवाहन करताच कवी अजय कांडर यांनी पहिली प्रत नोंदवली. कमलताई विचारे, विजय मराठे आणि इतर अनेकजण पुढे आले नी प्रत्येकाने 1 ते 100 अशा संख्येने पुस्तकांचे पैसे भरून नोंदणी केली गेली.
ज्यांनी ज्यांनी आगाऊ नोंदणी केलीय त्यांना आजपासून घरपोच प्रती मिळायला सुरूवात झालीय. मूळ 375 रूपये किमतीचे हे पुस्तक पोस्टेज खर्चासह रूपये तीनशेला आगाऊ नोंदणी करणारांना मिळतेय.
काही मोजक्या प्रतीच उपलब्ध आहेत. जे त्वरित पैसे भरतील त्यांना त्या मिळू शकतील.
काही मित्रांनी बॅंकेत पैसे तर भरलेत मात्र प्रकाशन संस्थेचे श्री गोपीनाथ मयेकर यांना आपला नाव - पत्ता कळवलेला नाही, त्यांनी तो त्वरीत कळवावा ही विनंती. म्हणजे त्यांना प्रती घरपोच मिळतील.
-प्रा.हरी नरके
बुकींगसाठी खालील बॅंकखात्यावर आपण एका प्रतीचे पोस्टेजसह 300 रूपये पाठवू शकता.
POPULAR PRAKASHAN PVT. LTD.
Axis Bank, Fort Branch, Mumbai
Current Account number 004010300021933
Type of account : OCC
IFSC : UTIB0000004
पैसे जमा केल्यावर ☎ 022-23530303 / 09029893938 (Contact person : Gopinath Mayekar) वर फोन करून आपला पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर कळवावा म्हणजे प्रती पाठवणं सोईचं होईल.
'पॉप्युलर प्रकाशन प्रा. लि.' नावाने चेकसुद्धा पाठवू शकता.
पत्ता :
पॉप्युलर प्रकाशन प्रा. लि.
३०१ महालक्ष्मी चेंबर्स
२२ भुलाभाई देसाई रोड
मुंबई ४०००२६

आईेनं आयुष्यभराची पुंजी चळवळीला देऊन टाकली -





माझे वडील मी खूप लहान असताना गेले. पुढचं आमचं सगळं आईनंच केलं.
आई आम्हा चिल्यापिल्यांसाठी रात्रंदिवस राबायची. मोलमजुरी करायची, ती निरक्षर होती.
कष्टाला वाघीण, तापट स्वभावाची, व्यसनांबद्दल कमालीची चिड असणारी.
एकदा मोठ्या भावानं मित्रांच्या संगतीत दोन घोट घेतले.
आईला कळल्यावर ती इतकी संतापली की तिनं सलग दहा दिवस अन्नसत्त्याग्रह केला.
परिणामी आम्हा भावंडांना आयुष्यात कसलंही व्यसन जडलं नाही.
त्या दिवसांची आठवण म्हणून पुढं दरवर्षी ती दहा दिवस उपास करायची.
निळूभाऊ फुले खलनायकाची कामं करतात म्हणून त्यांच्यावर तिचा फार राग होता. ते पहिल्यांदा आमच्या घरी आले तेव्हा ती त्यांच्यावर फार भडकली होती. त्यांना चिडून बोलली होती.
एकदा स्वत: भाऊंनीच तिला शुटींग पाहायला नेलं नी ते कसं खोटं असतं, नाटक असतं याची तिची खात्री पटवली. मग ती भाऊंची फॅन झाली.
हातपाय धट्टेकट्टे असताना आपल्याला मृत्यू यावा अशी तिची प्रबळ इच्छा होती आणि ती वयाच्या 85 व्या वर्षी गेली तीही चालताबोलतानाच.
तिला जाऊन 12 वर्षे झाली.

जाताना ती तिची शेवटची इच्छा सांगून गेली, मोलकरणीचं काम करून, मोलमजुरी करून तिनं आयुष्यभरात काही छोटेछोटे दागिने केले होते, ते मोडा, नी महाराष्ट्रातल्या 10 सामाजिक नी शैक्षणिक संस्थाना ती रक्कम भेट द्या. निळूभाऊंच्या हस्ते हा कार्यक्रम करावा अशी तिची  इच्छा होती.
निळूभाऊ त्यासाठी आमच्या गावी तळेगाव ढमढेरेला आले.
हजारो लोकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम झाला.
आम्ही भावंडांनी तिच्या नावानं गावात एक व्याख्यानमाला सुरू केलीय. आजवर अनेक नामवंत त्या व्याख्यानमालेला आवर्जून आलेत.
त्याच कार्यालयात परवा [सोमवार, दि.13 रोजी,] या सोनाई व्याख्यानमालेत लेखक, समीक्षक नी विचारवंत संजय भास्कर जोशींचं व्याख्यान होईल.
ती गेली तेव्हा मी नेहमीप्रमाणे एका सामाजिक कार्यक्रमाला विदर्भात गेलोतो.
कळल्यावर आलो तोवर अंत्यसंस्कार झालेले होते. येताना रस्त्यात सतत डोळे भरून यायचे.
माझे अतिशय आवडते लेखक चारूता सागर यांची वाट ही कथा मला अतिशय भावलेली.
आजारी आईच्या शेवटच्या भेटीला निघालेल्या लेकीची परवड चित्रित करणारी. चटका लावणारी. डोळ्यातून पाणी काढणारी.
ते पुस्तक एका मित्रानं माझ्याकडून वाचायला नेलं नी हरवलं. त्या कथासंग्रहाचं नावच काही केल्या मला आठवत नव्हतं. जणू मेमरी इरेझ झालेली.
आईच्या अंत्यविधीला निघालो असताना प्रवासात ती कथा मला आठवली आणि अनेक वर्षे विस्मृतीत गेलेलं कथासंग्रहाचं नाव अचानक आठवलं. "नागीण"
माझा मित्र भीमराव गोपनारायण याची "सर्वा" या कवितासंग्रहातली एक दोनोळी माझ्या आईचीच भावना सांगते जणू.
"असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती
माझी आई म्हणते चार भिंतींचं घर मी एकटी चालवते."
- प्रा.हरी नरके

Tuesday, November 7, 2017

नोटाबाणी








इंदोर, दि. 8 नोव्हेंबर 2016 -
सायंकाळी बातम्या बघण्या-ऎकण्यासाठी हॉटेलच्या रूममधला टिव्ही लावला तर सुतकी चेहर्‍याने घातलेली मित्रो, अशी हाक ऎकू आली. आता भारत-पाक युद्ध घोषित होणार म्हणून काळजी वाटायला लागली. पोटात धडकीच भरली ना!
बघतो तर काय? झाली ना नोटाबंदीची घोषणा.
प्रवासात मोजकेच पैसे बरोबर आणलेले. तेही ठेवायला सोयीचं व्हावं म्हणून 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये. आता काय करायचं?
आधल्याच दिवशी इंदोरच्या पुस्तक दुकानात जाऊन बरीच हिंदी पुस्तकं घेण्यासाठी ऑर्डर दिलेली. उद्या दुकानाला सुट्टीय. परवा या. आणून ठेवतो असं दुकानदार म्हणालेला. मनासारखी पुस्तक मिळणार म्हणून आनंद झालेला.
दुसर्‍या दिवशी गेलो तर दुकानदारानं सगळी पुस्तकं आणलेली होती. पण तो म्हणाला, 1000, 500 च्या नोटा "महज एक कागज का टुकडा" असल्यानं चालणार नाहीत.
त्यामुळे हातातोंडाशी असलेली पुस्तकं न घेताच परत फिरावं लागलं.
संगिताला इंदोरमध्ये महेश्वरी साड्या, कपडे, नमकीन, मिठाई अशी कायकाय खरेदी करायची होती, कागज का तुकडा काय कामाचा? सबब खरेदी कॅन्सल.
इंदोरला जाऊनसुद्धा काहीही न घेता आम्ही हात हलवत परत आलो.
मेहरबानी परतीच्या तिकीटांचं रिझर्वेशन आधीच झालं होतं म्हणून परत तरी येता आलं. नाही तर राहावं लागलं असतं इंदोरातच.
एकच आनंद होता की आता भारतात सुवर्णयुग येणार. अमीर लोकांची चैन की निंद हराम की होणार. गरीबाची मात्र चांदी होणार.
आणि तसंच झालं. सगळ्यांचे अच्छे दिन सुरू झाले.
बघता बघता गरीब मालामाल झाले.
श्रीमंत पार भिकारी झाले.
लाखो - करोडोंचा काळा पैसा बाहेर आला.
भारताचा जीडीपी दोन हजार वर्षात प्रथमच 25% वर गेला.
नवे रोजगार इतके जास्त निर्माण झाले की स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी संपुर्ण बेरोजगारी प्रथमच दूर झाली.
100 टक्के भारतीय श्रीमंत झाले.सारा भारत एका रात्रीत डिजीटल झाल्यानं कार्ड पेमेंटवर कमिशन कमावता येऊ लागले. कामधंदा न करता पैसे कमावण्याचा घरबसल्या नवा मार्ग उपलब्ध झाला. अगदी सरकारी कंपन्याही [महा.विद्युत निर्मिती आणि पारेशन] कार्ड पेमेंट केले तर आजही त्या रकमेवर कमिशन घेतात. धन्य धन्य सरकार.
दुसर्‍या दिवसापासून ए.टी.एम. वर हवे तेव्हढे पैसे सहज उपलब्ध होऊ लागले.
देशात रांगा म्हणून कुठेच नाहीत.
बॅंक कर्मचार्‍यांना तर कामच शिल्लक राहिलं नाही.
सगळा काळा पैसा संपल्यानं देशभर आनंदी आनंद पसरलेला.
असा महान राज्यकर्ता या आधीच आम्हाला का मिळाला नाही असं जो तो एक दुसर्‍यांना विचारू लागला.
पाडवा, दिवाळी, दसरा, आणखी कायकाय एकदमच साजरं करू लागला.120 जणांना रांगेतून मोक्ष मिळाला. आणीबाणीमुळे इंदिराबाईंना जावे लागले होते तसे या नोटाबाणीसाठी कोणाला घालवणार?
तर मित्रो, आजच्या दिवशी वर्षश्राद्ध घालायचं तर काय करता येईल?
आपण तमाम भारतीय आजच्या आपल्या राष्ट्रीय पुण्यतिथीदिनी
सामुदायिक आत्महत्त्या केल्याची आठवण म्हणून
सर्व मिळून दोन मिनिटं उभं राहून स्वत:लाच श्रद्धांजली वाहू या का?
-प्रा. हरी नरके
...........................