Sunday, October 22, 2017

तुम्ही समुद्रातच उडी मारली असती-

सर, एक वाईट बातमी आहे. तुमच्या मुंबईच्या बहिणीला अपघात झालाय. त्यांची तब्बेत गंभीर आहे. तुम्हाला मुंबईला घेऊन जायला आमचं हेलीकॉप्टर आलेलं आहे. तुम्हाला तातडीनं निघायला हवं.
अरे बापरे. काय सांगताय? ती माझी एकुलती एक आणि लाडकी बहीण आहे. तुम्हाला ही बातमी कशी आणि कधी कळली?
2 तासापुर्वी दिल्लीच्या आमच्या मुख्यालयातून आम्हाला मेसेज आला. कुणीतरी तुमच्या दिल्ली ऑफिसला कळवलं. त्यांनी तो निरोप आमच्या कार्यालयाला दिला.
अरे, पण तुम्हाला दोन तासांपुर्वी कळलेली बातमी तुम्ही मला लगेच का सांगितली नाहीत?
सर, आपण, दूर समुद्रात आहोत. हेलीकॉप्टर इथे पोचायला दोन तास लागतात. बातमी कळल्याबरोबर आम्ही वरिष्ठांच्या अनुमतीनं तुमच्यासाठी हेलीकॉप्टरची व्यवस्था केली.
हेलीकॉप्टर यायच्या आधी तुम्हाला बातमी सांगितली असती तर तुम्ही समुद्रातच उडी मारली असती.
ओ, थॅंक्स.
मी मुंबईला पोचलो आणि तिथून टॅक्सी करून त्वरीत पुण्याच्या रुबी हॉस्पीटलला आलोय. आता मधुची तब्बेत कशीय? डॅाक्टर काय म्हणताहेत? विजय मला विचारत होता.
चला आपण डॅाक्टरांनाच विचारू या.
सिरियस हेड ईंज्युरी आहे. त्या सध्या कोमात आहेत. सर्व ट्रीटमेंट चालूय. 48 ते 72 तास आपल्याला वेट करावं लागेल. त्यानंतरच काही सांगता येईल. लेट्स होप फॉर गुड.
मधुचा भाऊ विजय माझे आभार मानत होता. तो टाइम्स ऑफ इंडीयाच्या दिल्ली कार्यालयात पॉलिटिकल एडीटर होता.
संरक्षण मंत्र्यांनी देशातल्या आम्हा निवडक पत्रकारांना एक सिक्रेट मिशन दाखवण्यासाठी समुद्रात नेलं होतं.
हा अपघात नेमका झाला कसा?
खरंतर मलाही नीट माहित नाही. काल रात्री 2 वाजता मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, अपुर्व आणि मधुला लोणावळ्याजवळ गंभीर अपघात झालाय असा मला पोलीस कंट्रोल रूमचा फोन आला होता. पोलीस त्यांना घेऊन ससूनला निघालेत. माझा ड्रायव्हर नेमका आज गावी गेलाय. तू तुझी स्कूटर घेऊन लगेच आलास तर आपण ससूनला जाऊ.
मी येतो. मला पिंपरीहून तुझ्याकडे पोचायला अर्धा तास लागेल. तू तयार राहा.
मरणाची थंडी होती. गडबडीत मी स्वेटर घालायला विसरलो. स्कूटरवर गार वारा भनान लागत होता. नाकाडोळ्यातून पाणी येत होतं.
मी अर्ध्या तासात तिच्या बंगल्यावर पोचलो. ती तयारच होती. आम्ही ससूनला गेलो. अपुर्वला किरकोळ जखमा होत्या. मधू मात्र कोमात होती. ससूनचा व्हेंटीलेअर नेहमीप्रमाणेच बंद होता.
आम्ही त्यांना ससूनमधून रूबीला शिफ्ट करायचं ठरवलं. अ‍ॅंब्युलन्स तयारच होती. व्हीआयपी केस असल्यानं पोलीस अधिकारी जातीनं राबत होते. अपुर्व मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातला. तो त्यांचा ओएसडी होता. पुर्वी सामाजिक चळवळीतून आलेला, नव्या दमाचा लेखक पण सध्या राजकारणात सक्रीय असलेला.
आयसीयुमध्ये डॅाक्टर साठे भेटल्या. त्या माझ्या ओळखीच्या होत्या. त्यांनी तातडीनं ट्रीटमेंट सुरू केली.
काही वेळानं आम्ही तिघं बाहेर आलो. अपुर्वनं सिगारेट पेटवली.
अपुर्व, अपघात कसा झाला? आम्ही विचारलं.
आम्ही तुझ्याकडून जेवून निघालो तेव्हा रात्रीचे 12 वाजलेले. आमचा दोघांचा डोळा लागला होता. हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकवर आमची वेगात असलेली कार धडकली असावी. सुदैवानं ड्रायव्हर शुद्धीत होता. त्यानं गाडीतल्या वायरलेसवरून पोलीस कंट्रोलला कळवून अ‍ॅंब्युलन्स मागवली. एव्हढ्या रात्री कोणाला कळवणार? म्हणून तुलाच फोन केला. बरं झालं, तुम्ही दोघं लगेच आलात, अपुर्व म्हणाला.
तो ट्रॉमामध्ये होता. बर्‍याच वेळानं तो सावरला. मला म्हणाला, हरी, प्लीज एक काम कर. वर्षावर फोन करून सीएमना कळव.
मी म्हटलं, अरे इतक्या रात्री ते झोपलेले असतील. झोपमोड केली म्हणुन चिडतील.
नाही चिडणार. अरे एव्हढे दिवस त्यांच्यासाठी मिडीया आणि पॉलिटिकल मॅनेजमेंट करतोय. रात्रंदिवस राबतोय. तू बिनधास्त फोन कर.
मी घाबरत घाबरत पीसीओवरून वर्षा बंगल्यावर फोन केला. पहिल्याच रिंगला उचलला गेला.
जयहिंद, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरून ड्युटी ऑफिसर कामठे बोलतोय.
मी काम सांगितलं. ते म्हणाले, सर, सीएम झोपलेत. पण बघतो.
स्वत: सीएम दोनच मिनिटात लाईनवर आले. अपुर्वला अपघात झालाय? कसाय तो?
सर, तो बराय. पण त्याच्यासोबतची महिला पत्रकार मधु गंभीर जखमी आहे.
काही काळजी करू नका. दहा मिनिटात पुण्याचे जिल्हाधिकारी तिथे पोचतील. डॅाक्टरांना सांगा, पैशांची चिंता करू नका. बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट द्या.
खरंच 10 मिनिटात कलेक्टर आले. ते मला ओळखत होते. त्यांनी आल्याआल्या सुत्रं हातात घेतली. पोलीस अधिकार्‍यांना सांगून सिक्युरिटी वाढवली. अपुर्वने दिलेल्या सर्व फोननंबरवर निरोप पोचवले.
तासाभरात एका इंग्रजी आणि एका हिंदी पेपरचे संपादकही दस्तुरखुद्द पोचले. सकाळी सीएमचे पुतणे भेटायला आले. संध्याकळी साहेब येतील असा त्यांनी निरोप दिला.
36 तासांनी मधू शुद्धीवर आली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.एव्हाना मधुचे इतर नातेवाईकही पोचले होते. अपुर्वची पत्नीही आली.
वर्तमानपत्रात या अपघाताच्या मिठमसाला लावलेल्या उलटसुलट बातम्या यायला लागल्या तेव्हा अपुर्वची पत्नी रडायला लागली.
तरी मी त्याला सांगत होते, तिच्या नादाला लागू नकोस. पण तो ऎकेल तर ना? ती माझ्यापेक्षा जास्त तरूण आहे ना!
माझ्या माहितीप्रमाणे अपुर्व चांगला माणूस होता. निदान माझ्या मैत्रिणीचं तरी तसं खात्रीलायक म्हणणं होतं. ती महिला चळवळीत सक्रीय होती.
मंत्रालय वार्ताहर संघाचे सदस्य मात्र मला भेटून खोदूनखोदून माहिती विचारीत होते. मी माझ्याकडच्या अपुर्व माहितीच्या आधारे किल्ला लढवत होतो.
अपुर्वही स्व:ता दूर राहून सगळ्या तोफेच्या तोंडी मलाच देत होता.
सलग 48 तास मी झोपलो नव्हतो. आंघोळ नाही, झोप नाही, धड जेवनही नाही यामुळं खुप थकवा आलेला होता. एके दिवशी रुबी हॉस्पिटलवर पोलीसांची धावपळ वाढली. अपुर्वला भेटायला विरोधी पक्षातले सर्वोच्च नेते आलेले.
ते म्हणाले, " अरे काय हे अपुर्व? सीएमसोबत राहतोस नी चुकीच्या ठिकाणी धडका मारतोस. तुझा सीएम बघ, सावज टप्प्यात आल्याशिवाय कधीच चाप दाबत  नाही. धडक कधी आणि कुठे मारायची ते त्याच्याकडून शिकून घे. अरे, व्यंगचित्रात काय किंवा चित्रात काय ब्रश चुकीच्या ठिकाणी सटकला तर चित्राची माती होते. अचुक नेम महत्वाचा. तुझा सीएम तसा भला माणूस आहे. पण दिल्लीला असलेलं मैद्याचं पोतं त्याला या खुर्चीवर जास्त दिवस टिकू देणार नाही बघ." मी त्या ग्लॅमर असलेल्या, करिष्मा असलेल्या विरोधी पक्षातल्या सर्वोच्च राजकीय नेत्यांच्या शेजारी उभा राहून त्यांचं हे बोलणं ऎकत होतो.
फार भारावून गेलो होतो. अपुर्वमुळं ते इतक्या जवळून आपल्याला बघायला मिळाले. एकुण अपुर्व हा तंतोतंत भला माणूस म्हणायचा.
मधुचा भाऊ नी मुंबईच्या हिंदी पेपरचे संपादक मात्र मला एका बाजूला घेऊन सांगत होते, हरी, अपुर्व चांगला माणूस नाहीय. लबाड आहे. सीएमची सगळी टेबलाखालची डिल्स तोच सांभाळतो. पेट्या आणि खोकी यांची रसद मिडीया आणि राजकीय नेत्यांना पोचवतो. त्यानं मधुला जाळ्यात पकडलंय. ती लहान आहे. तिला याची, त्याच्या बोलण्याची, चित्रांची, कवितांची भुरळ पडलीय. तू याच्यापासून दूर राहा.
मला कळत नव्हतं, कोणाचं खरं मानावं?
मधु-अपुर्वसोबत मी आठ दिवस हॉस्पीटलमध्येच होतो.
माझी महिला चळवळीतली मैत्रिण मात्र येऊन जाऊन असायची.
त्या दोघांना डिस्चार्ज मिळाला. अपुर्वची बायको, माझ्याशी शेकहॅंड करीत म्हणाली, हरी, तू खुप धावपळ केलीस. थॅंक्स. मुंबैला आलास तर आमच्या घरी चेंबूरला नक्की ये.
माझ्या कामात मी ते निमंत्रण विसरूनही गेलो.
मुंबईचे पत्रकार मात्र हा अपघातच होता की मधुला मारण्याचा प्लॅन होता, मधू गरोदर आहे काय? याचा छडा लावण्यासाठी अधून मधून
मला फोन करायचे. मी मला माहित असलेल्या गोष्टी त्यांना सांगत त्यांच्याशी वाद घालायचो.
वाटायचं, एखाद्या सज्जन माणसाला किती छळतात हे पत्रकार!
एकदा मंत्रालयात गेलो असताना, सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाशेजारी अपुर्वच्या नावाचा बोर्ड दिसला. त्याच्या तब्बेतीची चौकशी करावी म्हणून आत गेलो.
पीए म्हणाला, बसा, विचारतो.
त्यानं इंटरकॉंमवरून मी भेटायला आल्याची माहिती अपुर्वला दिली.
मला म्हणाला, साह्यबांनी तुम्हाला बसायला सांगितलय.
मी अर्धा तास बसलो तरी आतनं बोलावणं येईना.
आत कसली मिटींग चालूय का?
नाही. साहेब एकटेच बसलेत. साह्यबांना लोणावळ्याला अपघात झाला तेव्हा नरकेसर, तुम्हीच हॉस्पीटलमध्ये सगळी धावपळ करीत होता ना? मी ओळखलं तुम्हाला. जा तुम्ही आत, मात्र मी सांगितलं, असं सांगू नका.
मी दरवाजावर टकटक केलं. परवानगी विचारून आत गेलो.
अपुर्वच्या कपाळावर आठ्या होत्या. तो नाराजीनं म्हणाला, काय काम होतं?
मी म्हटलं, इकडे आलो होतो, तुमचा बोर्ड बघितला. म्हटलं, तब्बेतीचं विचारावं, म्हणून सहजच आलोतो.
कामाचं बोला हो, कामाशिवाय कोणीही असं येत नसतं.
मी म्हटलं खरंच काही काम नव्हतं.
तो म्हणाला, ठीकय. निघा मग. मी खुप बिझी आहे.
-प्रा.हरी नरके
काही व्यक्तींची नावं बदललेली आहेत. बाकी पात्रे,घटना,प्रसंग,प्रवृत्ती काल्पनिक वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा.

No comments:

Post a Comment