Thursday, October 19, 2017

धृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर का केलं?


आम्हाला शाळेत गोखलेसर गीता शिकवायचे.एकदा ते म्हणाले, मुलांनो सांगा, संजय उवाच नं सुरू होणारी गीता संजयानं आपलं प्रतिकूल मत देताच का संपली?
आम्हाला कोणालाच उत्तर देता आलं नाही.

सर म्हणाले, गीता कुठे संपते? संजय म्हणाला, "तर धृतराष्ट्रा, ज्या बाजूला श्रीकृष्ण आहे, ती बाजू [पांडवांची बाजू] जिंकणार असं माझं मत आहे."

मग काय झालं?

धृतराष्ट्रानं संजयाला नोकरीतून फायर केलं.
" लेका, मीठ खातोस कौरवांचं नी विजय चिंततोस पांडवांना?"
त्याचा दुसरा भयंकर गुन्हा म्हणजे धृतराष्ट्रानं संजयाला ड्युटी काय सांगितली होती, तर तिकडे रणांगणावर काय चाललंय ते तेव्हढं सांगायचं. हा लेकाचा स्वत:ची मतं सांगायला लागला. तेव्हा गीता संपताना काय धडा शिकवते मुलांनो? आपण नोकरीत असताना, आपल्या मालकानं विचारलेलं नसताना, आपलं मत सांगू नये, अनाहुत सल्ला देऊ नये, खरं असलं तरी मालकाविरूद्ध बोलू नये! मात्र लगे हात उदात्तीकरण करीत राहावं."

गीतेच्या या शिकवणुकीचा फायदा आजचे सगळेच लोक्स अगदी कौरव पांडवही घेत असतात.

राज्याच्या उभारणीत त्यांचं योगदान मोलाचंच आहे. पण त्याचा दामदुप्पट परतावाही त्यांना जनतेनं एकहाती 50 वर्षे सत्ता देऊन केलेला आहे. मुद्दा एव्हढाच आहे की यशाचे मानकरी आपण असलात तर दुर्गतीचे अपश्रेयही तुम्हालाच घ्यावे लागेल ना? तुमच्या यांव केलं नी त्यांव केलं ह्या मार्केटिंगचा उबग आलाय. 80 टक्के समाजकारण नी 20% राजकारण हा तुमचा दावा. प्रत्यक्षात मात्र तुम्ही 24 बाय 365 केलंत ते  फक्त 200 टक्के राजकारण. तुमची दुसरी बाजूही कळू द्या ना जनतेला!
नरूभाऊ दाभोळकरांची अमाणूस हत्त्या झाली. तुम्ही पुण्यावर लादलेला पोळ गुन्ह्याचा तपास करायचं सोडून प्लॅंचेट लावत बसला होता. सलग 15 वर्षे गृहखाते तुमच्या हातात असूनही गुन्हेगार तुम्ही शोधलेच नाहीत. परिणामी आणखी तीन हत्त्या झाल्या.

मालक, कोणाकोणाची जात सार्वजनिक व्यासपीठावर उद्धरतात, प्राचीन साहित्य नी संशोधन संस्था जाळणारांचं औरंगाबादच्या अ.भा.म.साहित्य संमेलनात जाहीर समर्थन करतात, एखाद्याचं इतिहासलेखन पटत नसेल तर त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारून त्यांना मिळालेल्या राज्य पुरस्काराचे आपल्या चंपकांमार्फत वाभाडॆ काढतात, केव्हढी ही सहिष्णुता! केव्हढं हे निकोप अभिव्यक्तीचं प्रेम.

टिकाकार आणि विरोधकांकडे बघायची मालकांची दृष्टी इतकी व्यापक की अग्रलेख लिहिला म्हणून कुमार केतकरांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या जिवलग स्वपक्षीयांना ह्यांनी शब्दानं किरकोळ विरोध करीत पण कृतीनं मात्र पक्षात बढती दिली, यालाच म्हणतात लेखन स्वातंत्र्याबद्दलचा आदर!

एका शाळकरी मुलीनं एका नेत्याबद्दल फेसबुकवर काय लिहिलं तर यांच्याच राज्यात तिला ताबडतोब अटक करण्यात आली, तिच्या मदतीसाठी यांनी सेल काढला होता काय? ती स्वजातीय-स्वचाकरीतली असती तर विचार केलाही असता म्हणा.

एक संपुर्ण समाज दंगली घडवून जाळून किंवा कापून मारा असं पुस्तक लिहिणारांचे सत्कार हे मालक स्विकारतात आणि त्यांनीच आजवर खरा इतिहास महाराष्ट्राला शिकवला असा ताम्रपटही त्यांना  बहाल करतात, किती ही वैचारिक सहिष्णुता!

हजारो निरपराध्यांचं धार्मिक हत्त्याकांड करणारांना यांनी आपली सत्ता वापरून संरक्षण पुरवलं असा आरोप यांच्यावर अनेकदा झालाय. त्याची गुरूदक्षिणा ते खातायत.

यांची सेक्युलरनिष्ठा इतकी पक्की की निवडणुकीचे निकालही लागले नव्हते तर हे सच्च्या "सेक्युलरांना!" सत्तेसाठी पाठींबा देऊन मोकळे झाले.

अशा साक्षात दंतकथाच असलेल्या इतिहासपुरूषांचं जे उदात्तीकरण करणार नाहीत ते केवळ B/W चित्रण करणारेच म्हटले पाहिजेत. हाच आवाज आहे अवघ्या महाराष्ट्राचा!
- प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment