Thursday, April 20, 2017

अजानचे भोंगे, महाआरत्या आणि धार्मिक उत्सवाचे डिजे -

सध्या देशभर उष्णतेच्या लाटांनी तापदायक हवामान निर्माण केलेलं असतानाच सोनू निगमच्या अजानच्या भोंग्याविषयीच्या ट्विटनं वातावरण आणखीच तापलंय.
सोनूचं काय चुकलं? आणि त्याला हे आत्ताच का सुचलं असे दोन्हीबाजूनं प्रश्न विचारले जात आहेत आणि ते स्वाभाविकही आहेत.
वरवर पाहता हा खुपच निरागस आणि निष्पाप मुद्दा त्यानं उपस्थित केलाय असं वाटतं. कायदे आणि नियम निमुटपणे पाळणारे मध्यम व उच्च मध्यमवर्गीय लोक म्हणतील त्याचं बरोबरच आहे.
1. ध्वनी प्रदुषणानं उच्चतम पातळी गाठलेली असताना आणि मा.सर्वोच्च न्यायालयानं याबाबत आदेश दिलेला असताना तो का पाळायचा नाही अशी एक बाजूय.
2. यात धर्माचा प्रश्न न आणता एक आरोग्यविषयक बाब म्हणून याच्याकडं  का पाहू नये?
3. सर्वच धर्माच्या धांगडधिंगा करणार्‍या मिरवणुका, लग्नाच्या वराती, जयंत्या, आरत्या, महाआरत्या, गणपती, नवरात्री, गरबा, अजान आणि इतर धार्मिक उत्सव आणि राजकीय सभांमध्ये लाऊडस्पीकर, डि.जे. व फटाके वाजवून ध्वनीप्रदुषण करायला बंदी असावी.  यात कोणालाच सूट द्यायचं कारण नाही.
4. सोनूची ही सुचना आत्ताच का आली? त्याच्यामागं कोण आहेत? म्हणजे त्याचे बोलवते धनी कोण आहेत? यामागच्या राजकारणाचं काय? त्याचा हा प्रश्न पाॅलीटिकली करेक्ट आहे की नाही यातही मला रस नाही.
5. आपण अनेकदा साध्यासरळ आरोग्य आणि पर्यावरण विषयक बाबींना जात, धर्म, संस्कृती, श्रद्धा, परंपरा, रितीरिवाज असं वळण देऊन ते प्रश्न अवघड करून टाकतो.
6. जात, धर्म, लिंगभाव, वर्ग, वंश, प्रांत आदींची विविधता असलेल्या आपल्या भारतीय समाजात काही बाबी शिक्षण, संवाद, शिस्त, कठोर नियम आणि कायदे यांच्या माध्यमातूनच निपटाव्या लागतील.
7. अशावेळी सर्वांचे [विशेषत: कट्टरतावाद्यांचे ] समाधान करण्याच्या नादात किंवा अनुनयात भयानक समस्या किंवा दुखणी तयार होतात.
8. फक्त आणि फक्त पर्यावरणाचा आणि सामाजिक सलोख्याचा विचार करून न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सन्मान करायलाच हवा.
@ प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment