Thursday, April 20, 2017

मौनाचा कट?

समाजाच्या संवेदना आरपार बधीर झाल्यात काय?
शीतल वायळनं बापाकडं हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्त्या केली. प्रसार माध्यमांनी थोडी चर्चा केली. नवे विषय पुढे येताच हा विषय मागे पडला.
मध्यंतरी म्हैसाळच्या घटनेत मुलींची गर्भातच अवैध हत्त्या करण्याचा विषय पुढे आला, थोडी चर्चा झाली, मग तोही मागे पडला.
खरा प्रश्नाय तो हा की अशावेळी लोकमानस का हलत नाही? का ढवळत नाही?
स्त्रीप्रश्न, [लिंगभाव] वर्ग, जात, पर्यावरण, कुटुंबनियोजन अशा अनेक बाबतीत समाजमन बधीर का?
या मुद्द्यांवर प्रमुख राजकारणी, जाणते नेते, त्यांचे चेलेचपाटे साधी प्रतिक्रियासुद्धा देत नाहीत. राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर असे विषय नसतातच. यावर काम करणारांना कसलीही राजकीय प्रतिष्ठा नाही असं परवा डॉ. नीलम गोर्‍हे या शिवसेनेच्या प्रवक्त्या एका वाहिनीवर जाहीरपणे म्हणाल्या.
कोपर्डीची घटना निषेधार्ह आणि संतापजनक होती. धिक्कारार्हच होती. त्याबाबत समाजमन चवताळून उठलं, हे योग्यच झालं, पण मग सोनई, खर्डा, निमखेडी, मलकापूर, बुलडाणा, मनिषा हिंगणे अशी हत्त्याकांडं नी शीतल वायाळ आत्महत्त्या झाली तेव्हा समाज का संतापत नाही?
कुटुंब नियोजन, आर्थिक विषमता, हुंडा, सोकॉल्ड ऑनर किलींग, पर्यावरणाचे प्रश्न यावर बहुजन मौन बाळगतात आणि जात, लिंगभाव, वर्गीय विषमता यात बुद्धीवाद्यांना रस नाही.
अशा प्रश्नांवर बोलायचीही त्यांची तयारी नसेल तर अवघड आहे. हा आप्पलपोटेपणाय की सोयिस्कर स्विकारलेला शहामृगी पवित्राय?
अवघा समाज एव्हढा बथ्थड का बरं झाला असावा?
@ प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment