Sunday, April 30, 2017

"मुक्ता"फळं --

1. देशासाठी सैनिक सीमेवर एव्हढा त्रास सोसतात आणि हे देशप्रेमी भारतात आरक्षण आहे म्हणून विदेशात जातात. किती अव्वल दर्जाची देशभक्ती! लोकमान्य टिळक इंग्रजांना म्हणाले होते, तुम्ही कितीही गुणवान असाल, बुद्धीमानही असाल पण आम्हाला सुराज्य नको तर "स्व"राज्य हवे आहे आणि "स्वराज्यात" सर्वांना प्रतिनिधित्व द्यायचे तर आरक्षण आणखी काही काळासाठी तरी आवश्यक आहे. ज्या घटनापरिषदेने सर्वप्रथम आरक्षण दिले त्या परिषदेत 90 टक्के लोक उच्चवर्णीय होते.
2. जे कोणी उच्चशिक्षण किंवा चांगल्या करियरसाठी परदेशात गेले, स्वत:ची प्रगती करण्यासाठी गेले त्यांना माझा विरोध नाही. ही पोस्ट त्यांच्याविरोधात नाही.
3. मात्र जे लोक आम्ही आरक्षणामुळे देश सोडला असं सांगतात त्यांच्या गुणवत्तेचे परदेशात कोणते दिवे लागलेत? असे जे परदेशात गेलेत त्या "स्वयंघोषित बुद्धीमानांनी" कोणते नवे शोध लावलेत? त्यांनी जगाला नवे काय दिलेय? कोणती क्रांती केलीय? त्यांच्यापैकी कितींना नोबेल पुरस्कार मिळालेत?
4. हे लोक महागडे उच्च शिक्षण भारतात फुकटात घेऊन मग परदेशात जातात. असल्या आप्पलपोट्यांची काळजी आपल्याला कशाला हवी?
मुळात हे लोक बुद्धीमान असतात याला पुरावा काय? असे कोणते कौशल्य यांच्याजवळ असते किंवा कोणते ज्ञानार्जनाचे, ज्ञाननिर्मितीचे झेंडे यांनी फडकवलेत? नाचता येईना तर म्हणे अंगण वाकडे!
5. आपण अणुबॉम्ब बनवला. औद्योगिक क्रांती केली. आज आपण जगातली तिसरी सत्ता बनण्याच्या मार्गावर आहोत. आपले यांच्यावाचून काय अडलेय? या पोटार्थी लोकांची भारताला खरंच गरज आहे काय?
6. भारत सरकारच्या NSSO नुसार देशात 40 कोटी रोजगार आहेत आणि त्यातले असंघटित क्षेत्रात [ हमाल, ड्रायव्हर, शेतमजूर इ. ] सुमारे 37 कोटी लोक आहेत आणि त्यात आरक्षण नाही.
7. उर्वरित तीन कोटींपैकी एक कोटी रोजगार केंद्र व राज्य सरकारांकडे असून त्यातल्या निम्म्या म्हणजे 50 लक्ष जागा आरक्षित आहेत. खाजगी क्षेत्रात 2 कोटी रोजगार असून त्यात आरक्षण नाही. सैन्यातही आरक्षण नाही.
8. ओबीसी आरक्षणातील सात लाख सरकारी जागा रिक्त आहेत. [ भारत सरकारच्या डी.ओ.पी.टी. नुसार] अनु. जाती, अनु. जमातीच्या काही लाख जागाही भरलेल्या नाहीत. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील हे "बुद्धीमान लोक" भ्रष्टाचार, दहशतवाद, कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, जातीयवाद, महागाई, बेरोजगारी, महिला अत्त्याचार यामुळे हा देश सोडत नाहीत. मात्र अवघ्या एक ते सव्वा टक्के [ 40 कोटी रोजगारातील अर्धा कोटी] जागा राखीव असल्याने देश सोडतात?
9. या सन्माननीय भगिनी महिला आरक्षणातूनच पुण्याच्या महापौर झाल्या ना? त्यांनी आधी या आरक्षित पदाचा राजीनामा द्यावा आणि मगच ही मुक्ताफळं ऎकवावीत.
10. गुणवत्तेच्या शिखरावर असलेले नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अमर्त्य सेन, संपर्क क्रांतीचे जनक डॉ. सॅम पित्रोदा, परममहासंगणक बनवणारे डॉ. विजय भटकर, आधारचे जनक डॉ. नंदन निलेकणी, इन्फोसिसचे डॉ. नारायण मुर्ती, उद्योगाचे एव्हरेस्ट जेआरडी टाटा, भारतीय जागतिकीकरणाचे जनक डॉ. मनमोहन सिंग, जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, खगोलशास्त्रातले विश्वमान्य संशोधक डॉ. जयंत नारळीकर, मिसाईलमॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कुणीही आरक्षणाला विरोध केलेला नाही - प्रा. हरी नरके Prof. Hari Narke

No comments:

Post a Comment