Sunday, March 5, 2017

शून्य मते

1995 साली मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला उभा होतो. परभणीच्या साहित्य संमेलनात आमच्या मतदार संघातील एका मोठ्या समीक्षकांचा मला पाठींबा /आशिर्वाद असावेत म्हणून मी त्यांना विनंती केली. त्यांनी आनंदाने मला पाठींबा दिला. मत देण्याचा शब्दही दिला. प्राचार्य म.द. हातकणंगलेकरसरांच्या समोर हे सारे घडले. मी उमेदवारी अर्ज भरला आणि एका परिषदेला दिल्लीला निघून गेलो. आल्यावर पाहतो तो काय, ज्यांनी मला शब्द दिला होता त्यांनीच माझ्याविरूद्ध उमेदवारी अर्ज भरला होता. मी माझ्या जवळच्या सर्व पत्रकार, साहित्यिक,कवी मिंत्रांना घेऊन त्यांच्या घरी गेलो. आम्हाला बघून ते दचकले. खरं तर ते एक उत्तम समीक्षक होते. भला माणूस होते. त्यांच्याबद्दल मला आदर होता. माघार घेण्याचा दिवस निघून गेलेला होता. मी म्हटलं, "सर, तुम्ही साहित्य परिषदेचे मतदार आहात. माझं तुमच्याशी परभणीला बोलणं झालंलं होतं. तुम्ही मला मत देण्याचा शब्द दिला होता, तेव्हढा पाळावा एव्हढीच विनंती करायला आलोय." ते म्हणाले, "असं कसं मी तुम्हाला मत देणार? मी स्वत:च उभा आहे." मी म्हटलं, " काहीच हरकत नाही. तुम्ही अवश्य उभे राहा. तुमचे मत मात्र मला द्या. साहित्य परिषदेच्या विद्यमान घटनेप्रमाणे स्वत:चे मत स्वत:लाच द्यायला हवे असे बंधन नाही." माझ्यासोबत अनेक साहित्यिक मित्र होते. तेही सरांशी हसतखेळत गप्पा मारत होते. सरांचा तणाव निवळला. सर, म्हणाले, "माझा अगदीच नाईलाज झाला, विद्यमान पदाधिकार्‍यांनी मला फारच गळ घातली. इ.इ." मी म्हटलं, "सर, तुम्ही का उभे राहिलात हे आम्ही विचारलेलेच नाही. तुमचा तो हक्कच आहे. फक्त तुमचं मत मात्र मला द्या. बाकी उत्तमच आहे." आमचा मतदारसंघ फार मोठा म्हणजे अख्खा पुणे जिल्हा होता. तो सगळा फिरणं त्यांना वयोमानानुसार शक्य नव्हतं. मी त्यांना शुभेच्छा देताना म्हणालो,"सर, मी मत तुम्हाला देऊ शकत नाही, पण काही कारणाने जे मला मत देणार नसतील त्यांना तुम्हाला मत द्यायला मी नक्की सांगीन. तुम्ही प्रतिनिधीपदाऎवजी परिषदेचे उपाध्यक्ष व्हायला हवे असे मला वाटते. मी निवडून आल्यावर तुमचे नाव नक्की सुचविन." ते म्हणाले, "नाही मी उपाध्यक्षपद स्विकारणार नाही. कारण ते अप्रत्यक्ष निवडणुकीने म्हणजे नियुक्तीने मिळते. मला मागच्या दाराने यायचे नाही." निघताना माझा एक नाटककार मित्र सरांना आदराने म्हणाला, "सर, मनाची तयारी असू द्या, पराभवासाठी. कदाचित तुमचे डिपोझिटही जाऊ शकेल." आणि सगळे मित्र अटीतटीने कामाला लागले.सगळा जिल्हा पिंजून काढला.त्यातले आज कितीतरी नामवंत आहेत. अरूण जाखडे, अरूण खोरे, संजय पवार, प्रमोद मांडे, रामनाथ चव्हाण, शिवाजी चाळके, अतुल देशमुख, आनंद लाटकर, उपेंद्र खरे, डा. रामचंद्र देखणे, उद्धव कानडे आणि अनेक मित्रांनी अपार मेहनत घेतली. त्यावेळी कधी त्यांच्या स्कूटरवरून तर कधी माझ्या ते सारे सोबत प्रचार करीत फिरले. मतदारांपैकी 90% मतदार एका विशिष्ट जातीचे असल्याने आपणच निवडून येऊ असे सरांनी व आमच्या पदाधिकार्‍यांनीही गृहीत धरले होते.निवडणुक अधिकारी आणि यंत्रणा माझ्याशी फटकून होती. मी एकुण एक मतदारांशी बोललो. त्यांचा पाठींबा घेतला. मला मतदार जातपात न बघता मतदान करतील असा विश्वास होता. एक मोठे सुसंस्कृत आणि ग्रंथप्रेमी राजकारणी आमचे मतदार होते. त्यांनी मला लेखी पाठींबा दिला. स्वत:हून एका खासदारांना मला काही मदत लागली तर करायला सांगितली. खासदार पैलवान होते. ते मला म्हणाले, "मला मतदारांची यादी द्या. त्यातल्या कोणाकोणाला उचलायचे ते सांगा. महाबळेश्वर, चिखलदरा, ताडोबा, भंडारदरा, तोरणमाळ अशा ठिकाणी बंदोबस्तात त्यांना ठेवतो. तुम्ही काहीही काळजी करू नका." मी "ही निवडणुक त्यातली नसते, तसे केले तर मी नक्की आपटेन, तुम्ही असं काहीही करू नका" अशी त्यांना कळकळीची विनवणी केली. राजकीय नेत्यांच्या गावचा एक उमेदवार उभा होता. तो त्यांना भेटला आणि त्याने पाठींबा मागितला. नेते म्हणाले, " अरे, तू उशीर केलास. मला आधी सांगितलं असतस तर मी कशाला हरीला पाठींबा दिला असता? शेवटी तू माझा गाववाला म्हणून जवळचा.पण आता माझा शब्द गेलाय." निवडणुकीचा निकाल आला. मला सुमारे 95% मते पडली होती. मान्यवर समीक्षकांची मात्र अनामत जप्त झाली होती. राजकीय नेत्यांच्या गावच्या उमेदवराला शून्य मते पडली होती. हा चमत्कार कसा घडला ते काही मला उमगले नाही. बोलल्याप्रमाणे पहिल्या बैठकीत मी समीक्षकांचे नाव उपाध्यक्ष पदासाठी सुचवले. त्यांच्या बाजूचे पदाधिकारी चक्रावले. ते विरोध कसा करणार? एकमताने समीक्षकांची साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. पदाधिकारी म्हणाले," आता तुम्हीच त्यांना फोन करून बोलवून घ्या. त्यांचं स्वागत करा." मी त्यांना फोन केला, अभिनंदन केले.परिषदेवर बोलावले. ते आले. मी त्यांना हार घातला. पेढे दिले. चहा पिताना ते मला म्हणाले, "माफ करा, मी माझा शब्द पाळू शकलो नाही. पण तुम्ही मात्र शब्दाला जागलात." त्या उमेदवाराला शून्य मते कशी मिळाली ते मात्र कधीच कळले नाही. ..................

No comments:

Post a Comment