Thursday, February 9, 2017

शेवटी कोणीही असो, पण विसर्जन हे ठरलेले


माझे ज्येष्ठ स्नेही दिवंगत वरूणराज भिडे नेहमी आपल्या मानवी स्वभावावर प्रकाश टाकणारा एक किस्सा सांगायचे. ते म्हणायचे, माध्यमे आणि नवमध्यमवर्ग या सगळ्यांना नेहमी पुजायला एक गणपती हवा असतो. अगदी वाजतगाजत त्याला डोक्यावरून मिरवत ते घरी आणतात. दहा दिवस मनोभावे पुजतात...आणि त्यानंतर त्याचे सांग्रसंगित विसर्जन करतात!
शेवटी कोणीही असो, पण विसर्जन हे ठरलेले.
मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना आणि पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा ते या माध्यमे आणि नवमध्यम वर्गाचे किती डार्लिंग होते. त्यांच्या धोरणांचा खरा लाभार्थी वर्ग हाच. पण लवकरच त्यांना मनमोहन सिंग खुपायला लागले. अर्थात मनमोहन सिंग यांच्या राजकारणाची, त्यांच्या सार्वजनिक जीवनाची चिकित्सा करण्याचा,प्रसंगी त्यावर प्रखर टिका करण्याचा अधिकार सर्वांना आहेच. पण सूर चिकित्सेऎवजी जेव्हा हेटाळाणीचा लागतो, तेव्हा सवाल निर्माण होतो.
नरेंद्रभाई मोदी आले तेव्हा ते नवमध्यमवर्गाचे आणि मिडीयाचे किती सोयरे होते! पण आता त्यांची घसरण सुरू झालीय का? ही शेवटाची सुरूवात आहे का? नमोंचे चाहते एका कल्पनादारिद्र्य, एको [ प्रतिध्वनी ] आणि Copy च्या सापळ्यात अडकलेत का?
"नरेंद्र मोदींवर लोक जेव्हा टिका करीत होते, तेव्हा तुम्ही का गप्प होतात," असा प्रश्न सर्वच मोदीसमर्थक एका आवाजात विचारित आहेत. मला गंमत वाटते ती याची की हे सगळेच एका तालासुरात, अगदी कानामात्रावेलांटीही वेगळी नाही इतके एकच पालुपद का लावतात? यांच्या प्रश्नांमध्ये विविधता का नाही? यांचे सगळ्यांचे मेंदू एकच एक शब्द किंवा प्रश्न कसे प्रसवतो? या सगळ्यांचे प्रश्न/मुद्दे एकच पेपरसेटरकडून आल्यासारखे का वाटतात? यांना सर्वांना ही नवनीतची झेराक्स कोण वाटत असेल बरे?
हे कल्पनादारिद्र्य आहे का? सगळेच एकमेकांचे एको [ प्रतिध्वनी ] किंवा Copy मारणारे कसे?
ही नक्की माणसेच आहेत की रोबो?
अफाट मानवी बुद्धीची उंची अशी सपाट करू नका मित्रांनो... साच्यांमधून घडवल्या जाणार्‍या मुर्ती कितीही देखण्या असल्या तरी त्यांना अजिंठा वेरूळच्या शिल्पांची सर येऊ शकत नाही. का अवमुल्यन करताय स्वत:चे आणि आपल्या प्रतिभेचे?
विविधता जपा.
ही फार मोलाची देणगी आहे निसर्गाकडून माणसाला मिळालेली..

No comments:

Post a Comment