Friday, November 27, 2015

द्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले


महात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग? किती वर्षे आम्ही केवळ आरत्याच ओवाळायच्या? संभाजी ब्रिगेड, बामसेफ यासारख्या स्वत:ला फुले -आंबेडकरवादी म्हणऊन घेणार्‍या संघटना फुले ब्राह्मणद्वेष्टे होते असा सरसकट प्रचार करीत असतात. काही चतुर राजकारणी नित्यनेमाने फुले -आंबेडकरांचा महाराष्ट्र असा जयघोष करून जातीच्या मतब्यांका मजबूत करीत असतात. संभाजी भिडे, सनातनचे जयंत आठवले, सोबतचे बाळ गांगल आदी लोक तर फुले राष्ट्रविरोधी होते असे सांगत, लिहीत असतात.
खरेच फुले होते तरी नेमके कोण?

जोतीरावांनी १८४८ मध्ये स्त्रीशिक्षण आणि दलितांच्या शिक्षणाची सर्वप्रथम व्यवस्था उभारली. घरातला हौद दलितांसाठी खुला केला. बालविवाहविरोध, विधवाविवाहाला प्रोत्साहन आणि सतीप्रथेला विरोध केला इत्यादी गोष्टी आपण वाचलेल्या असतात. पण आज हे सारे प्रश्न तर सुटलेले आहेत, अशावेळी फुल्यांची प्रस्तुतता काय? असा प्रश्न पडणेही स्वाभाविक होय.

जोतीरावांनी सर्वांना शिक्षण, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन,संसाधनांचे फेरवाटप, ज्ञाननिर्मिती,धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम केले. ख्यातनाम विचारवंत डा. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे. डा.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुल्यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानाने सांगायचे. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी  म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा थे."  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे.

जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या बारा वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक असले तरी त्यांनाही काळाच्या मर्यादा होत्याच. आज त्यांच्याकडे बघताना त्यांचा स्वभाव, सवयी आणि पिंड यांच्यामुळे निर्माण झालेल्या तत्कालीन काही बाबींवर भर द्यायचा की त्यांचा कालातीत वारसा शोधायचा याचा विवेक करायला हवा. आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही फुल्यांकडून आपल्याला मिळण्याची शक्यता आहे काय? असल्यास किती आणि कोणत्या याचा विचार करायला हवा.

नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुल्यांनी १८७३ साली  [१४२ वर्षांपुर्वी ] लिहिलेल्या "गुलामगिरी" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुल्यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्याने दिडशे वर्षांपुर्वी विचारांचे जागतिकीकरण केलेले होते.
भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून घटना दुरूस्ती करून शिक्षण हक्काचा कायदा २००९ साली केला. जो आपल्याकडे २०१० साली लागू करण्यात आला. मात्र ज्याची पुरेशी अंमलबजावणी अद्यापही होत नसल्याच्या तक्रारी येत असतात. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक करावे अशी मागणी जोतीरावांनी हंटर शिक्षण आयोगासमोर १९ आक्टोबर १८८२ रोजी लेखी स्वरूपात केलेली होती.
अशी मागणी करणारे ते केवळ देशातीलच नव्हे तर आशिया खंडातीलही पहिले शिक्षणतज्ञ होते. त्यांनी १८५० च्या काळात आपल्या सर्व शाळांमध्ये औद्योगिक शिक्षण आणि शेती शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली होती अशी माहिती ब्रिटीश सरकारच्या शिक्षण खात्याच्या अहवालात सापडली आहे. " Industrial Department should be attached to the schools in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently." तंत्रशिक्षण आणि शेती शिक्षण सर्व शाळांमध्ये मुलांमुलींना वयाच्या ६ व्या वर्षापासून सक्तीचे करण्यात यावे अशी मागणी त्यांनी अनेकवार केल्याचे दिसते. ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती आणि कौशल्याधारीत शिक्षण दिले तरच नवी पिढी स्वत:च्या पायावर स्वतंत्रपणे उभी राहील आणि मजेत व आनंदाने जगू असे प्रतिपादन त्यांनी सरकारकडे केल्याचे आढळून येते.
शैक्षणिक गळतीचा प्रश्न कसा सोडवायचा याची मांडणी करताना १८५४ साली त्यांनी प्रौढ स्त्री - पुरूषांचे साक्षरता अभियान सुरू केलेले होते. उपस्थिती भत्ता, पोषण आहार, विद्यावेतन या योजना त्यांनी राबवलेल्या होत्या. जोतीराव - सावित्रीबाईंच्या चौथीच्या वर्गातली मुक्ता साळवे मांगामहारांच्या दु:खाविषयी जो १८५५ साली निबंध लिहिते त्यातून दलित साहित्याची पायाभरणी होते. त्यांची विद्यार्थिनी ताराबाई शिंदे, "स्त्रीपुरूष तुलना" हा ग्रंथ लिहून स्त्रीवादी साहित्याचे जागतिक दालन सुरू करते. तान्हुबाई बिर्जे ही पुढे [ १९०६ ते १९१२ या काळात ] पहिली भारतीय महिला संपादक बनते. सावित्रीबाई आणि जोतीराव हे त्यांच्या भिडे, वाळवेकर, गोवंडे, परांजपे, लहुजी साळवे, राणबा महार, गणू शिवाजी मांग, धुराजी अप्पाजी चांभार, उस्मान व फातिमा शेख आदी सहकार्‍यांसोबत दोन शिक्षण संस्था स्थापन करून अठरा शाळांमधून ज्ञानसत्तेच्या क्षेत्रात जे काम करीत होते ते समजाऊन घेतले तर आजच्या दुषित शैक्षणिक पर्यावरणाला उर्जा मिळू शकेल इतके मुलभूत काम होते ते.

जोतीराव प्रगतीशील शेतकरी होते. शेतीमालाला उत्पादनखर्च भरून येईल आणि किमान १५ ते २० टक्के नफा मिळेल एव्हढा  बाजारभाव मिळाला पाहिजे, शेतकर्‍यांना पिकांसाठी पुरेसे आणि बारमाही पाणी सिंचनासाठी मिळाले पाहिजे, ते वाया जाऊ नये म्हणून नळाद्वारे देण्यात यावे, आधुनिक पद्धतीच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी शेतकर्‍यांना सरकारने परदेशात पाठवावे यासारख्या त्यांनी  ’शेतकर्‍याचा असूड’ या ग्रंथात १८८३ साली केलेल्या सुचना आजही मार्गदर्शक आहेत. शेतकरी सुखी व्हायचा असेल तर त्याची त्रिसूत्री फुले मांडून दाखवतात.
१) उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव शेतीमालाला मिळाला पाहिजे.
२) शेती आधुनिक पद्धतीनेच केली पाहिजे. शेतीला नळाद्वारे (ठिबक सिंचनाचे बीजरूप) पाणी पुरवठा केला पाहिजे. त्यासाठी धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत.
३) शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक ऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. ‘शेतक ऱ्याचा असूड’ या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात. शेतकरी सुखी व्हायचा असेल धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत. शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक ऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. ‘शेतक ऱ्याचा असूड’ या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात. या घरातून त्यांनी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील लक्षणीय कामगिरी केली. शेती परवडत नाही म्हणून आजवर देशातील लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केलेल्या आहेत. १३० वर्षांपुर्वी त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही असे "शेतकर्‍याचा असूड" मध्ये सांगून या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले होते. आधुनिक पद्धतीची शेती करणे, तलावतळी,धरणे बांधून शेतीला "नळाद्वारे" पाण्याचा पुरवठा करणे, शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता. अशाप्रकारे आजच्या ठिबक सिंचनचे बीजरूपच जणू ते दाखवित होते.
 त्यांच्या शाळांमध्ये मुलामुलींना वयाच्या ६व्या वर्षापासून शेती आणि उद्योगाचे शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले होते.त्यांनीच पहिल्यांदा त्रिभाषा सुत्र सुचवले. शैक्षणिक गळतीच्या प्रश्नाचे मूळ शोधून त्यावर गरिब मुलांना विद्यावेतन {पगार} देण्याचा उपाय त्यांनी अमलात आणलेला होता.त्यांनी दाखवलेल्या याबाबतच्या इतर १५ कारणांचा आणि उपायांचा  अभ्यास आजही मार्गदर्शक ठरावा.

जोतीरावांनी लिंगभाव, जात आणि वर्ग या पक्षपाताच्या/शोषणाच्या तिन्ही केंद्रावर मारा करणारे क्रांतिकारी लेखन केले. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळी उभारल्या.

जोतीरावांची सामाजिक न्यायाची पंचसुत्रे आजही मार्गदर्शक आहेत. १.जातीनिर्मुलनासाठी आंतरजातीय  विवाह, २.सर्वांना ज्ञानसत्तेची कवाडे खुली करणे, ३. स्त्री-पुरूष समता, ४. संसाधनांचे [जमीन,पाणी, हवा, उर्जा, जंगल ] फेरवाटप करणे, ५. धर्मचिकित्सा.

१८६९ साली त्यांनी सर्वप्रथम मागासांसाठी जातनिहाय आरक्षण मागितले. सत्यशोधक पद्धतीच्या विवाहामध्ये हुंडा, मानपान, डामडौल यांना फाटा देऊन वाचवलेले पैसे शिक्षण संस्थाना दान देण्याची पद्धत पाडली. मंगलाष्टकामध्ये नवरी मुलगी स्वातंत्र्य,समता आणि न्यायाची मागणी करते तेव्हा नवरा मुलगा तिला सर्वांसमोर वचन देतो की, " स्थापाया अधिकार या बायकांचे झटतसे मी सदा, अर्पाया न भी मी सर्वस्व माझे कदा."
बायकांचे मानवी अधिकार या विषयावर आपल्याकडे मौलिक चर्चा आणि कृती झालेली असली तरी जोतीराव - सावित्रीबाईंनी या क्षेत्रात केलेले कार्य आजही पथदर्शक ठरणारे आहे.

शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिले जाते. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली जोतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत. रायगडावर जाऊन तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत चाफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८० साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत.
१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरे जावे लागले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन टिळक आगरकरांच्या जामिनासाठी मुंबईला पाठविले. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र ‘केसरी’मध्ये छापून आले. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुराभिलेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणे, तिचे सुशोभिकरण करणे आणि शिवजयंती उत्सव सुरू करणे, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.

डा. जी.एस.घुर्ये आणि एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचे विशेषत: जातीव्यवस्थेचे ज्या पद्धतीने शास्त्रीय विश्लेषण केले होते ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात. त्यांचे हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे.
आपल्याकडे विचारवंत आणि सक्रीय कार्यकर्ते अशी विभागणी झालेली आहे.जोतीराव सक्रीय कार्यकर्ते होतेच पण ते विद्वानही होते. त्यांनी लोकशाही विचारांचा पाया घातला. आज अनेक जपानी, फ्रेंच आणि जर्मन विचारवंत जोतीरावांचा अभ्यास करीत आहेत. देशातील ६ हजार जातींच्या अस्मिता कुरवाळत न बसता त्यांच्या काचातून समाज बाहेर यावा यासाठी त्यांनी सत्यशोधक चळवळ केली. आज देश संकटातून जात असताना आणि १५-२० वर्षांनी आपला देश कुठे असेल याचा विचार करताना थरकाप उडतो. माओ आणि महात्मा गांधी यांच्या विचारातील अनेक मौलिक सुत्रे आपल्याला शतकभर आधीच जोतीराव देऊन गेले होते.

पुण्यातील त्यावेळच्या जुन्या गंज पेठेतील फुलेवाडा सुमारे ५० वर्षे सामाजिक चळवळींना रसद पुरवित होता. पूर्व पुण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण संमिश्र आणि विविधतेने नटलेले आहे. १८४८मध्ये त्यांनी देशातील मुलींची पहिली भारतीय शाळा सहकाऱ्यांच्या मदतीने भिडे वाड्यात सुरू केली, तेव्हा सावित्रीबाई  घराचा उंबरठा ओलांडून सार्वजनिक जीवनात पहिले पाऊल टाकत्या झाल्या. भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक जीवन अशा रीतीने सुरू झाले. भारतातील प्रौढ साक्षरता अभियान १८५४ मध्ये याच वाड्यात सुरू झाले. रात्रीच्या स्त्री-पुरुषांच्या दोन पहिल्या शाळा याच वाड्यात सुरू झाल्या. विधवांच्या बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि देशातील पहिला भारतीय माणसांनी चालवलेला अनाथाश्रम (बालहत्या प्रतिबंधक गृह) येथेच सुरू झाला. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला पाण्याचा हक्क देणारा पहिला हौद याच वाड्यात आहे. १८७३ साली याच घरात स्थापन करण्यात आलेला सत्यशोधक समाज देशातील सर्वदूर ग्रामीण भारतात पसरलेले पहिले जनआंदोलन ठरले. येथेच जोतिरावांनी १८५५ मध्ये मराठीतील पहिले आधुनिक नाटक 'तृतीय रत्न' लिहिले. १८६९ साली शिवरायांचा पोवाडामय चरित्रपट येथेच निर्माण झाला. 'शेतकऱ्यांचा असूड' आणि ’सार्वजनिक सत्यधर्माच” क्रांतिकारक तत्त्वज्ञान येथेच साकारले.

जोतिराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केले. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणे, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामे केली. जोतीरावांच्या  उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलाने जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केले. ‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थाने प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्याने तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत,भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेले आहे. जोतीरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामे त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली. जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचेही काम केले जाई.  बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केले. या कंपनीचे पुस्तकविक्री केंद्र होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे. अशी कितीतरी कामे या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.

जोतीरावांनी शेयर मार्केटवर अनेक कविता लिहिलेल्या आहेत. त्यातून या धंद्यात काय खबरदारी घ्यावी लागते, हा धंदा करताना कोणकोणती कौशल्ये असायला हवीत अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन केलेले आहे. पुणे शहराचे शासननियुक्त आयुक्त म्हणून त्यांनी १८७६ ते १८८३ अशी सात वर्षे काम केले. शहराला बंद नळाद्वारे पाणी मिळावे, रस्ते, बागा, ग्रंथालये, शाळा, दवाखाने उभारले जावेत यासाठी ते झटले. शहराचे आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण यावर त्यांनी भर दिल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. गव्हर्नर जनरलच्या पुणे भेटीच्या काळात रोषनाई व हारतुरे यावर अवास्तव खर्च न करता तो पैसा शाळा उभारण्यासाठी खर्च करावा असा बाणेदारपणा त्यांनी दाखवलेला होता. दारू विक्रीचे परवाने द्यायला त्यांचा विरोध होता.ते लिहितात,  "थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा. तोच पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचताना मनी शोध करा. देऊ नका थारा वैरभावा." दीडशे वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.

उद्योगामध्ये सचोटी आणि साधनसुचिता फार महत्त्वाची असते, असा विचार ते आपल्या कवितेतून मांडतात.
‘सत्य उद्योगाने रोग लया जाती, प्रकृती होती बळकट!
उल्हसित मन झटे उद्योगास, भोगी संपत्तीस सर्व काळ!
सदाचार सौख्य त्यांची सेवा करी, शांतता ती बरी आवडीने!
नित्य यश देई त्यांच्या उद्योगास, सुख सर्वत्रांस जोती म्हणे!
सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता, बाळपणी कित्ता मुलीमुला!
तरूणपणात दुर्गुणी संसारी, वृद्धपणी करी हाय हाय!
उद्योगा सोडून कलाल बनती, शिव्याशाप देती जणामाजी!
आळशास सुख कधीच होईना, शांतता पावेना जोती म्हणे!
आळशांचा धंदा उद्योग करीती, दुकान मांडीती सोरटीचे!
नावनिशी नाही पैसा देई त्यांची, आदा आढाव्याची देत नाही!
उचल्याचे परी मूढास नाडीती, तमाशा दावीती उद्योगास!
अशा आळशाची शेवटी फजिती, धूळमाती खाती जोती म्हणे!

कोणत्याही प्रकारची हातचलाखी आणि अनीती ही माणसाला शेवटी धुळीला मिळवत असते. जुगार, मटका, लॉटरी या विनाकष्टांच्या गोष्टींचा ते निषेध करतात. हे सारे खिसा कापण्याचे उद्योग आहेत, असे फुले म्हणतात.
रोजगारासाठी पैसा नये गाठी ! अज्ञान्यास गाठी नफा हल!
शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी! पावतीत सारी जडीबुटी!
पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद! सुका आशीर्वाद भटासाठी!
उचल्याच्या परी खिसे कातरिती ! तोंड लपविती जोती म्हणे!
‘महापराक्रमी’ हर्षद मेहता याने बँकेच्या पावत्यांमध्ये गडबड करून फार मोठा आर्थिक घोटाळा केला होता. पावती हीच खरी जडीबुटी म्हणजे जतन करण्याची, लक्ष ठेवण्याची जागा आहे याचा इशारा जोतीरावांनी १२५ वर्षांपूर्वी दिला होता.
शेअर धंदा करताना जोतीराव काही पथ्ये सांगतात :
शेअर्स काढून उद्योग करणे! हिशोब ठेवणे रोजकीर्द!
खतावणी सर्व बिनचूक ठेवी ! नफा तोटा दावी शोधी त्यांस!
जामीन देऊन नितीने वर्तावे ! सर्वा वाचवावे अब्रूमध्ये!
शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा! जगा दाखवावा जोती म्हणे!

लबाडी आणि फसवणूक यांचा निषेध करताना असले उद्योग जळोत असा थेट हल्ला ते करतात.
शेअर्स मार्केटात खप कागदाचा, नफा दलालाचा बूड धन्य!
शेअर्स कागदास पाहून रडती ! शिव्याशाप देती योजी त्यास!
शेअर्स व्यापाराचा जळो तो उद्योग ! होऊन नि:संग मूढा लुटी!
आळशाचा खरा नित्य हाच धंदा! दुरूनच वंदा जोती म्हणे!
लुटीचा कोणताही धंदा जोतीरावांच्या सत्शील वृत्तीला मानवणे शक्यच नव्हते.
त्यांचा भर सातत्याने प्रामाणिकपणे उद्योग, व्यापार आणि शेती करण्यावर असायचा, त्याचेच मोल त्यांनी आपल्या कवितेतून आणि कृतीतून उलगडवून दाखविले.
उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील जोतीरावांची ही लक्षणीय कामगिरी बघितली की त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही अधिक उजळून निघते.  

फुले हे लेखक, कवी, आद्य नाटककार तर होतेच पण ते मोठे प्रकाशकही होते. तुकाराम तात्या पडवळ यांच्या ’जातीभेद विवेकसार ’ ह्या ग्रंथासह कितीतरी महत्वाचे त्यांनी प्रकाशित केले होते. त्यांची पुण्यात पुस्तकविक्री, फळे, भाजीपाला, सोन्याचे दागिने बनवण्यासाठीच्या मुशी आदींची दुकाने होती.

भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतीरावांचेच प्रोत्साहन होते.टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यातही तेच दोघे पुढे होते.१८६९ साली जोतीरावांनी शिवचरित्र लिहिले. १८८५ साली  त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडवरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणुन लोकमाणसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत.

१८७६ ते १८८३ याकाळात ते पुण्याचे आयुक्त {कमिशनर} होते. घरोघरी बंद नळाद्वारे पाणी पुरविण्याची योजना यशस्वी करण्यासाठी ते झटले.उत्तम रस्ते, शाळा, आरोग्य, शहर स्वच्छता यावर त्यांचा भर होता.गव्हर्नरच्या स्वागतावर अनाठायी पैसा उधळण्याला तसेच मंडईच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला.त्याच पैशाचा वापर शिक्षणासाठी करावा असा त्यांचा आग्रह होता.आज शहरातील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रुप धारण केलेले आहे. या पार्श्वभुमीवर कमिशनर फुले यांनी आपल्या घरातील अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठीसुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला बघून चकित व्हायला होते.

महात्मा जोतीराव फुले हे पर्यायी संस्कृतीचे जनक होते. बहुजन समाजाच्या मानसिकतेचं समग्र परिवर्तन करण्यासाठी त्यांनी विचार मांडले, चळवळी चालवल्या. बहुतांश भारतीय समाज हा देव, धर्म, ईश्‍वर, परमेश्‍वर यावर अपार श्रद्धा असलेला आहे. तो पोकळीत जगू शकत नाही. अशा समाजाला विज्ञाननिष्ठा, साधनशुचिता आणि विवेकाच्या आधारावर उभी केलेली बुद्धिनिष्ठ श्रद्धा देण्याची त्यांची धडपड होती. 33 कोटी देवांवर विसंबून असलेल्या समाजाला परंपरा आणि परिवर्तन यांचा सुवर्णमध्य साधून एक नवा विचार त्यांनी दिला. त्यांनी पारंपरिक देव, ईश्‍वर, परमेश्‍वर, संकल्पना नाकारुन ’निर्मिका' ची संकल्पना विकसित केली. सत्यशोधकाला 33 नियमांची आचारसंहिता घालून देताना ही निर्मिक संकल्पना त्यांनी पायाभूत मानली आहे. लिंगभाव, वर्ग आणि जातीची विषमता संपूर्णपणे नाकारणारी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित ही संकल्पना ते देऊन जातात.

"अज्ञानाशी ज्ञान, पांगळ्या अन्नदान, हेच बा स्मरण निर्मिकाचे !!'' ही आपली निर्मिकपूजेची, आराधनेची संकल्पना ते सांगतात. बुद्ध कबीर येशू, महंमद पैगंबर, संत तुकाराम, टॉमस पेन, मिशनरी वृत्ती आणि अमेरिकन उदारमतवाद यांच्या प्रभावातून त्यांची ही संकल्पना विकसित होताना दिसते. सत्यधर्माची, शोषणविरहित आणि सर्वचिकित्सक मानसिकता वाढीला पूरक ठरणारी ही मांडणी काळाच्या ओघात ओढाताण झाल्यानं बाजूला पडली असली तरी भारतीय समाजमनाला ती एक उत्तम पर्याय देते, ही निश्‍चित.

फुले साहित्याचा आपण गेल्या २५ वर्षात हिंदी, तेलगू, बंगाली, कन्नड, तमीळ, उर्दू, पंजाबी, इंग्रजी आदी १३  भाषांमध्ये अनुवाद केलेला आहे. त्याला विविध राज्यांमध्ये खूप मोठी मागणी आणि लोकप्रियता मिळते आहे त्याचे कारण या साहित्याची प्रस्तुतता होय.

सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली.आजचे सामाजिक न्यायाचे सगळे राजकारण याच सुत्राच्या भोवती फिरते आहे.जोतीरावांच्या  राजकारण समजून घेण्यासाठी "सत्तेवाचून सकळ कळा झाल्या अवकळा" हे जोतीसुत्र समजून घेतले पाहिजे. त्यांचा विरोध शोषणकर्त्या नेतॄत्वाला होता. त्यावेळी हे नेतॄत्व ब्राह्मणांकडे होते.हा समाज त्यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक सत्तेच्या सगळ्या किल्ल्या स्वत:च्या कंबरेला बाळगून होता. जोतीराव पर्यायी संस्कृतीचे जनक होते.

आज समग्र सत्ता परिवर्तन झालेले आहे.आता सगळी सुत्रे बहुजनांकडे आलेली आहेत. आज जोतीराव असते तर त्यांनी आसुडाचे  फटके कोणाला मारले असते? "ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधूपरी!" असे पोटतिडकीने सांगणार्‍या जोतीरावांच्या नावाचा वापर जातीविद्वेष पसरवण्यासाठी केला जावा ही शोकांतिका आहे. सत्ता समग्र बहुजनांपर्यंत झिरपलेली नाही. भटकेविमुक्त, दलित-आदिवासी,ओबीसी,महिला यांची परवड चलू आहे.

देशातील सत्ताधारी वर्गाचे अपयश लपवण्यासाठी आणि वर्ग, जाती, धर्म व लिंगभावाच्या आधारे केले जाणारे शोषण आणि पक्षपात यांच्यावर पांघरूण घालण्यासाठी आज जातीविद्वेषाच्या वणव्याचा सर्रास आधार घेतला जातो आहे. अशावेळी जोतीरावांचा विवेकी वारसा समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या कालसुसंगत संकल्पचित्राच्या प्रकाशात सामाजिक ऎक्याची चळवळ मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला जायला हवा..
.....................