Saturday, November 8, 2014

दिलदार पु.ल.

दिलदार पु.ल.



शाळकरी वयात पुलंच्या साहित्याने मनावर गारूड केलेले होते.

त्यांच्या वाढदिवसाला त्यांना  शुभेच्छा द्यायला त्यांच्या घरी गेलेलो. एव्हढा लहान मुलगा एकटा सायकलवर दुरून आला याचे त्यांना कौतुक वाटलेले. मी बावळटासारखी  त्यांना "हरी नारायण आपटेंची" ’गड आला पण सिंह गेला.  ही कादंबरी भेट द्यायला नेलेली. पुलंनी त्या भेटीचेही बहुधा मला बरं वाटावं म्हणुन छान कौतुक केलं.

म्हणाले, "मुला, अरे तू कितवीत आहेस?"

"चौथी"

"अरे, मीही चौथीत असतानाच पहिली एकांकिका लिहिली होती. ती याच कादंबरीवर आधारित होती. किती छान योगायोग. बरं सांग, तू हेच पुस्तक का निवडलस?"

मी सरळ खरं कारण सांगून टाकलं.

"ही माझी आवडती कादंबरी आहे, नी सध्या सर्वात स्वस्तात मिळणारी एकमेव चांगली कादंबरी आहे, म्हणून मी ती निवडली."

तेव्हा माझा महिन्याचा पगार पाच रूपये होता नी पुस्तकाची किंमत १ रूपया २५ पैसे होती.
पुल दिलदार होते. हजरजबाबी तर होतेच. त्या पहिल्याच भेटीत त्यांनी आपलंसं केलं.

पुढे सतत भेटत राहिलो. पत्रं लिहित राहिलो. ते प्रत्येक पत्राला आवर्जून उत्तर द्यायचे.

भालचंद्र नेमाडे यांनी पुलंवर केलेली टिका मला फार झोंबली होती. मी पुल भक्तच होतो ना!

मी भाईंकडे नेमाडॆंवर खूप चिडून बोललो. म्हटलं, मला नेमाडॆंचा पत्ता द्या. मी त्यांना खरमरीत पत्रं लिहितो.
त्यांनी विचारलं, " तू नेमाडेंचं कायकाय वाचलेयस?"
"काहीच नाही."

" आधी कोसला वाच. मग मी तुला त्यांचा पत्ता देईन."

भाईंची आज्ञा. वाचली कोसला.

केवळ ग्रेट. खूप भाराऊन गेलो.

म्हटलं, "भाई, नेमाडे तर बाप माणूस आहे. एव्हढा मोठा लेखक तुमच्यावर का भडकतो?"

"हे बघ, तू अजून खूप लहान आहेस. थोडा मोठा झालास की कळेल तुला. अरे, मी मध्यमवर्गियांची करमणूक करणारा बरा लेखक आहे. मात्र माझा रोल विदुषकाचा आहे.मात्र  नेमाडे हा मराठीतलाच नव्हे तर जागतिक साहित्यातला अफाट लेखक आहे. त्यांची माझ्यावरची टिका फारशी चुकीची नाही.तू या वादात पडू नकोस. नेमाडेंची साहित्यातली झेप बघ. त्यांची दृष्टी बघ.हे सारं महाराष्ट्राला पुढं नेणारं आहे हे कधीही विसरू नकोस."

"पु.ल". - असा दिलदार "भाई " पुन्हा होणे नाही.
...............................................

No comments:

Post a Comment