Wednesday, September 24, 2014

परिवर्तन आणि प्रसिद्धी

बर्ट्राड रसेल म्हणतात,"शोषितांकडे सत्ता नसल्याने स्वार्थपुर्तीचे मार्ग त्यांना उपलब्ध नसतात, आणि म्हणून जुलूम, अन्याय, अत्याचार,भ्रष्टाचार,हिंसाचार यांचे प्रदर्शन करण्याची संधीही त्यांना मिळत नाही.पर्यायाने नीतिमानतेबाबत त्यांची मूठ झाकली राहते. याच शोषित घटकांना जेव्हा स्वातंत्र्य आणि सत्ता मिळते, तेव्हा यथावकाश त्यांच्यामधील दुर्गुण वर उफाळून येतातच. सचोटी, नीति, लोभ, मत्सर, सहृदयता हे गुणविशेष व्यक्तीनिष्ठ असतात, त्यांचा लिंग, वंश, वर्ग यांच्याशी फारसा संबंध नसतो, हे लक्षात घेतले, की माणूस भाबडेपणाने निराधार समजुतींना कवटाळून बसत नाही."{ ”अनपो‘प्युलर एसेज” चे मराठी भाषांतर, ’नाही लोकप्रिय तरी उदारमतवादाची कास धरी’, अनु. डा. करूणा गोखले, मेनका प्रकाशन, पुणे ३०, पृ.१०४} आज दलित, बहुजन, कष्टकरी, स्त्री चळवळींना अर्थाजनाची रोजगार हमी योजना समजणारे काही लोक पाहिले, मोठ्या कष्टाने मिळालेल्या हक्कसंरक्षक कायद्यांचाही दुरूपयोग करणारे काही लोक पाहिले की, रसेलचे हे मत पटू लागते काय?
माणूस आणि माणसाचा पूर्वज लाखो वर्षे जंगलात राहिला असून त्याच्यातले हिंस्त्र श्वापद आजही कायम आहे काय?
सत्ता मिळाल्यावर माणसे भ्रष्ट होतात, पण सत्ता मिळण्याची शक्याता जरी निर्माण झाली तरी सगळीच माणसं अंगात सत्ता आल्यासारखेच वागू लागतात काय?
लिंगभाव, वर्ग, जात, धर्म, वंश यावरून पक्षपात केला जातो. ज्यांना ते व्यवस्थेचे बळी असल्याने न्यायासाठी संघर्ष करावा लागतो, ते आणि त्यांचे नेते सत्याची कास धरून प्रामाणिकपणे झुंज देत असतात हे विधान सर्वांनाच लागू करता येईल काय? की त्यांचेही प्रयत्न प्रसिद्धी, पैसा, हितसंबंध सांभाळणे यातच गुंतलेले असतात असतात?
जे चिकित्सा, विवेकवाद, यांच्याबद्दल आग्रही असतात त्यांनाही कोणी जर याबाबत अडचणीचे प्रश्न विचारायला लागले तर त्यांच्यातला हिंस्त्रपणा उफाळून येतो आणि तेही "गप्प बसा" संस्कृतीचे पाईक बनतात काय?
विषमता निर्मुलनासाठी जे वंचित, शोषित, अन्यायग्रस्त आहेत त्यांच्या संरक्षणासाठी विशेष कायदे करावे लागतात. या कायद्यांचा उचित वापर होणे अभिप्रेत नी अपेक्षित असते. त्यांचा गैरवापर होतच नाही असे म्हणण्याजोगी आज खरेच परिस्थिती आहे काय?
परिवर्तन आणि प्रसिद्धी, मुल्ये आणि हितसंबंध असा झगडा असतो तेव्हा बांधिलकीवाले/चळवळवाले कशाला जास्त महत्व देतात?
भिकेची वृत्ती, गुन्हेगारी मानसिकता यातून आयते खाण्याची, दुसर्‍याचे पळवण्याची / चोरण्याची जी मानसिकता हाडीमाशी भिनते त्यातून कष्ट करण्याची वृत्ती नष्ट होते काय? त्यातूनच फुकटेपणाचे / भिक मागण्याच्या वृत्तीचे समर्थन करण्याचे तत्वज्ञान जन्माला येते काय?
एव्हढ्या लांबपल्ल्याच्या मानवी प्रवासानंतरही माणसं मानवनिर्मित दु:खं, विकृती, विकार, लुटणे, झडप घालणे यातून एकुणच कितपत बाहेर पडू शकलीत? त्यासाठीचे चालू असलेले प्रयत्न कितपत गंभीर नी प्रामाणिक आहेत? की तोही बराचसा देखावाच आहे? या कामांचे जेव्हा ढोल वाजवले जातात तेव्हा तोही मार्केटिंगचा एक भाग असतो की की त्यात खरेच तथ्य असते?
..................................

No comments:

Post a Comment