Saturday, September 13, 2014

देशीवादावर बेफाम आरोप, शेरे आणि ताशेरे

.सतिश वाघमारे यांनी देशीवादाबद्दल काही प्रश्न उपस्थित करून चर्चा सुरू केलेली आहे. त्यांच्या भिंतीवर ही चर्चा जोरदार रंगलेली आहे.
हरी नरके: प्रा.सतिश वाघमारेजी : चर्चा वाचली. धन्यवाद. माझ्या माहितीप्रमाणे प्रा. भालचंद्र नेमाडे आणि प्रा. राजन गवस फेसबुकवर नाहीत. त्यामुळे ते फरार झाले म्हणजे कुठून फरार झाले? पुस्तकांमधून ते गेले अनेक वर्षे मांडणी करीत आहेत. त्यांच्या भुमिकेची झाडाझडती जरूर घ्यावी, त्यातल्या विसंगती, उणीवा किंवा फोलपणा जरूर मांडावा. हेत्वारोप करू नयेत. नेमाडेंची कौटुंबिक पार्श्वभुमी शोधून चर्चा करायची असेल तर चर्चेचा स्तर घसरेल. मला वाटते, इकडे त्यांच्या भुमिकांचेही फार मोठ्या प्रमाणात सुलभीकरण केले जात आहे. { तुम्ही नाही } हे लोक { देशीवादी } संपूर्ण फुली मारून बाद करावेत असे लोक आहेत काय? त्यांच्या विचारांवर आक्षेप घेणारे तसे करू इच्छितात असे प्रथमदर्शनी तरी वाटते. फुले-शाहू-आंबेडकर वादावरील चर्चेत मी आता जात नाही. तिचा जो धागा देशीवादाशी संबंधित असेल किंवा विरोधी असेल तेव्हढे जरूर बोलू या. नेमाडॆंनी ज्या जातीव्यवस्थेचे आणि सामंतशाहीचे कायम वाभाडे काढले त्यांनाच आम्ही जातीव्यवस्थेचे समर्थक ठरवणार असू तर मग ही चर्चा खूपच सवंग आणि सरधोपट होईल. नेमाडे, गवस यांच्यावर ज्यांचा व्यक्तीगत राग असेल { तुम्ही नाही } त्यांनी आपली खाजगी धुणी या घाटावर कृपया धुवू नयेत. {वि.सु. एखाद्या लेखकाला ज्ञानपिठ मिळायला हवे असे म्हणणे आणि त्याच्या लेखनावर टिका करणे यात काहीही विसंगती नाही. एकतर ही मते कोणत्या काळातील आहेत ते पाहिले पाहिजे. ती वेगवेगळ्या काळातील असू शकतात. भुमिकांचा विकास होऊ शकतो.एकाच काळातील असतील तरी उणीवा असूनही ज्ञानपिठ द्यावे असे म्हणणे चुक ठरत नाही.निर्दोष लेखन आनि लेखक कुठून आणायचे सतिषराव?}

हरी नरके: जातीव्यवस्थेचे चटके ज्यांना बसलेत त्यांच्या भावना स्वाभाविकच त्याबाबतीत कठोर असतात. असणार. ते योग्यच आहे. तथापि जातीव्यस्थेवर हल्ला करताना एक गोष्ट विसरून चालणार नाही की, ’भारतात प्रत्येक जात हे एक स्वतंत्र राष्ट्र आह” असे बाबासाहेब म्हणाले होते. जाती-वर्ण व्यवस्थेचे लाभार्थी ज्या पद्धतीने तिचे समर्थनपर तत्वज्ञान मांडतात त्या प्रकारचे नेमाडे तिचे समर्थक नाहीत. त्यांची भुमिका वेगळी आहे. त्या दोन्हींची सरमिसळ किंवा गल्लत करणे म्हणजे या गोष्टीतली गुंतागुंत विसरून सब घोडे बारा टक्के अशी भुमिका घेणे होय.
भारतीय संस्कृती असे काही म्हटले की काही लोक थेट अंगावरच येतात.त्यांनी कृपया ताज्या साधनाच्या अंकातील दिवंगत यु.आर. अनंतमुर्ती यांची प्रदीर्घ मुलाखत वाचावी. नेमाडॆंनी फुल्यांवर जे लिहिलेय ते वाचले की त्यांची भुमिका फुलेवादाची समर्थक असल्याचे स्पष्ट व्हावे. वेगवेगळ्या स्कूलची दृष्टी वेगवेगळी असली तरी देशीवाद्यांना थेट संघवाले ठरवणे म्हणजे फारच झाले. टिका करा. वाभाडेही काढा. मात्र थेट शत्रूच्या छावणीत ढकलू नका. बाबासाहेब म्हणाले होते, {पाहा: रानडे ,गांधी आनि जिना } "जे चुका करतात पण चुकीच्या बाजूला {तत्वज्ञान म्हणुन}उभे नसतात ते मला माझे वाटतात. मात्र जे चुकीच्या बाजूलाच उभे असतात त्यांनी मी आपले म्हणणार नाही." नेमाडेंना {पठारे, आदींना} आपण कोठे बसवणार आहोत?
September 13 at 7:59pm · Like · 8.....


हरी नरके: आरोप झाले. शेरे आणि ताशेरे झाले. तुमची मते मांडून झाली. आता जरा सज्जड पुरावेही देऊ या.१..२..३..४.. चला सुरू करा.
मी देशीवादाचा प्रवक्ता नाही. मी या विचारसरणीचा कट्टर समर्थकही नाही. मात्र मला त्या विचारातली काही सामर्थ्यस्थळे मोलाची वाटतात. ती एक भोंगळ आणि जातीय विचारधारा आहे अशी तोफ सर्वसाधारणपणे सर्व बड्या मंडळींनी डागलेली आहे. मला त्यांचा प्रतिवाद करायचा नाही.
सहजपणे नजर टाकली तर आरोपपत्रातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे दिसतात.
१.देशीवाद एक बेगडी आणि निव्वळ तकलादू संकल्पना आहे. देशीवादाची नेमकी आणि सुस्पष्ट अशी कुठलीही व्याख्या नाही. कोणत्या परंपरा , मूल्ये देशीवादाच्या मुळाशी आहेत ? २.वैचारिक सामाजिक दृष्टीकोनातून पाहताना ती मुल्ये चिरंतन शाश्वत म्हणून कितपत टिकणारी आहेत ? भारतीय ग्रामीण समाजव्यवस्थेतील लाभार्थी घटक विशेषतः सरंजामदार या देशीवादी भोंगळ कल्पनेचा जोरकस पुरस्कार करताना दिसतात. ही सरंजामी मानसिकता आहे.
३.फुले शाहू आंबेडकर परंपरेची विचारधारा न झेपणारे न मानणारे या देशीवादी गोलमोल कल्पनेच्या भोवती पिंगा घालतात.
४.देशीवाद संस्कृती आणि परंपरा यांना केंद्रबिंदू मानतो. प्रचलित व्यवस्था प्रमाण मानूनच जगणारा माणूस देशीवाद विचारात घेतो. या पलीकडच्या माणसाला देशीवाद मान्यता देत नाही . कारण सनातनी परंपरा. वैदिक परंपरा, सनातन धर्म, वर्णाश्रम धर्म या परिप्रेक्षात देशीवाद विसावला आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेच्या आड देशीवादी मुल्ये येतात. देशीवादी लेखकांच्या कादंबऱ्यातला दलित वर्गविषयक तुच्छ दृष्टीकोन त्या अंगाने पाहता येईल.
५.जात-धर्म आणि लिंगभेदाची विचारधारा देशीवाद स्वीकारतो. तिचे समर्थन करतो.
६.वस्तुतः आज महार मांगांचीच भाषा खर्‍या अर्थाने सतेज आहे. (पृ. ३४४) असा निर्वाळा देणारे नेमाडे चांगल्या भाषेची उदाहरणे देताना मात्र गोडसे भटजी, लोकहितवादी, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, चिं. वि. जोशी, माडगुळकर, भाऊ पाध्ये इत्यादी बहुतांशी ब्राह्मण लेखकांच्या भाषेचाच दाखला देतात यावरून ते ब्राह्मणीविचारसरणीचे समर्थक ठरतात?
७. देशीवाद हा सौम्य अर्थाने हिंदुत्ववाद आहे...क्रमश: {पाहा भाग २..}
८.देशीवादी झूल ही प्रतिगामी, स्थानिक परंपराप्रधान सांस्कृतिक मूल्यं जपण्याच्या ओढीतुन निपजलेली निरर्थक संकल्पना आहे.ती बदलविरोधी नि न्यूनगंडग्रस्त मानसिकता आहे.
९.थोडक्यात संरजामी जातीवर्चस्वाचे तथाकथित राष्ट्रवादी सांस्कृतीक तत्वज्ञान परिभाषित करणारे ही विचारधारा आहे.ती या देशातील मूल आणि मूलतत्ववादी प्रवृती आहे.या देशीवादाची भूमिका संरजामी आणि ब्राह्मणी दोन्ही व्यवस्थेला पोषकच आहे.
या आरोपपत्राचे सार एका अभ्यासकाने पुढीलप्रमाणे दिलेले दिसते."देशीवाद हा लोकार्थाने जातीयव्यवस्थाच आहे.
बलूतेदारी आणि सरंजमशाहीची यांचे नेमाडे समर्थक आहेत. ते सधन कुटुंबातून आलेले असल्यामुळे त्यांना देशीवादाचे चटके आणि त्याचे उपद्रवमुल्ये याच्याशी देणे-घेणे नाही
उलट हा वाद आजही टिकला जावा आणि आपली सुभेदारी पुर्वीसारखीच अबाधित रहावी हाच या मंडळींचा खरा अट्टाहास आहे."
या सगळ्यांना उत्तरे देणे हे माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे. मी ते करू शकणार नाही.
"देशीवाद हा लिंगभाव आणि जातीव्यवस्थेचा समर्थक आहे. तो सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेच्या आड येतो. तो दलित वर्गविषयक तुच्छतेचा दृष्टीकोन मांडतो." हा करण्यात आलेला आरोप जर खरा असेल तर देशीवाद सर्वथा टाकाऊ मानायला हवा.
मात्र याबद्दलचे पुरावे देऊन ही चर्चा सप्रमाण आणि टोकदारपणे करावी अशी आक्षेपकांना नम्र विनंती आहे........

No comments:

Post a Comment