Friday, May 31, 2013

अभिजात मराठी- "एक मिशन"

प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आज अभिजात मराठी भाषा समितीची शेवटची बैठक झाली.आम्ही तयार केलेल्या १२७ पानांच्या अंतिम अहवालाला मान्यता देण्यात आली.बैठकीला समितीचे सदस्य प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा.मधुकर वाकोडे, प्रा. आनंद उबाळे,प्रा. मैत्रेयी देशपांडॆ. प्रा.कल्याण काळे,सतीष काळसेकर, आणि सर्व शासकीय संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.
गेल्या वर्ष-सव्वा वर्षात आम्ही तमाम ११ कोटी मराठी भाषकांच्या वतीने मराठीला "अभिजात" दर्जा मिळण्यासाठी हा प्रस्ताव तयार केलेला आहे.तो आता राज्य  सरकारतर्फे भारत सरकारकडे रितसर सादर करण्यात येईल. त्याची छाननी केल्यानंतर भारत सरकार मराठीला "अभिजात" दर्जा दिल्याची योग्यवेळी घोषणा करु शकेल.
हा अहवाल तयार करण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य मिळाले. आपले मार्गदर्शन आणि शुभेच्छा याबद्दल धन्यवाद.
अहवालाच्या प्रस्तावनेत अध्यक्ष प्रा. पठारे म्हणतात, "हा मसुदा तयार करण्यात सर्व सदस्यांचे मन:पुर्वक सहकार्य लाभले.प्रत्यक्ष मसुदा तयार करण्याचे किचकट आणि बौध्दिक परिश्रमांची मागणी करणारे काम अतिशय मन:पुर्वक प्रा. हरी नरके यांनी केले हे मी खास करून नमूद करतो."
मायमराठीची प्रतिष्ठा उंचावणारे काम "एक मिशन" म्हणून करण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो.
केंद्र सरकारकडून मराठीला हा दर्जा मिळाल्यास १.मराठी ही श्रेष्ठ दर्जाची राष्ट्रीय भाषा असल्याचे शिक्कामोर्तब होईल... २..मराठीची जागतिक प्रतिष्ठा उंचावेल...३.मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारकडून राज्याला दरवर्षी किमान १००कोटी ते ५०० कोटी रूपये मिळतील...४...मराठीचा अभ्यास करण्यासाठी देशातील सर्व विद्यापिठांना मराठी अध्यासन स्थापन करण्यासाठी विद्यापिठ अनुदान आयोग भरीव निधी देईल...५..असा दर्जा मिळवणारी मराठी ही तमीळ,संस्कृत,तेलगू, कन्नड आणि मळ्यालम नंतरची सहावी भाषा असेल...६..७..८..९....

Friday, May 24, 2013

मल्याळममुळे मराठीच्या दाव्याला बळकटी,



पुरावे आहेत, जनसमर्थन हवे.

मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला आहे.जगभरातील ३कोटी ३३लख लोक ही भाषा बोलतात.असा दर्जा मिळविणारी ही पाचवी भारतीय भाषा ठरली आहे.यापुर्वी तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड चार भाषांना हा दर्जा मिळालेला आहे. यापुर्वी मल्याळमचा अभिजाततेचा दावा गुणवत्तेवर फेटाळण्यात आला होता. केरळचे सत्ताधारी व विरोधी पक्ष एकत्र येवून त्यांनी पुन्हा नव्याने  प्रयत्न केल्याने त्यांना शेवटी यश मिळाले आहे.हा दर्जा मिळाल्याने मल्याळमची प्रतिष्टा वाढली असून केंद्र सरकारकडून दरवर्षी किमान १००कोटी रुपयांचा निधी त्यांना मिळणार आहे. याशिवाय विद्यापिठ अनुदान आयोग केंद्रीय विद्यापिठांमध्ये या भाषेची अध्यासने स्थापन करण्यासाठी निधी देईल तो वेगळा. यानिर्णयामुळे मराठीच्या अभिजाततेच्या दाव्याला बळकटी मिळाली असून मराठीचे एक पाऊल पुढे पडले आहे.
      भाषेच्या अभिजातपणासंबंधीचे केंद्र सरकारचे ४ निकष  आहेत - भाषेची श्रेष्ठता, भाषेची दीड ते दोन हजार वर्षाची प्राचीनता आणि सलगता, भाषिक आणि वाड्मयीन परंपरेचे स्वयंभूपण,  प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणार्‍या खंडासह असलेले नाते. या चारही मुद्यांच्या अनुषंगाने विचार करता मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करणारा १२५ पृष्टांचा अहवाल आम्ही याच आठवड्यात राज्य सरकारला सादर केलेला आहे. पुरावे आहेत, जनसमर्थन तेव्हढे हवेय.मराठी भाषा अभिजात ठरण्यासाठी काही पूर्वग्रह आणि खोलवर रुजलेल्या गैरसमजुती यांचा फार मोठा अडथळा होता. आहे. मराठीचे वय अवघे आठशे वर्षे आहे, अशी लोकसमजूत करून देण्यात आलेली आहे.खरे तर आपल्या भाषेचे वय किमान दोन हजार वर्षे असल्याचे सज्जड पुरावे आहेत. महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगळ्या भाषा नसून ही एकाच मराठीची तीन रुपे आहेत हे वास्तव आजवर नजरेआड करण्यात आलेले होते.प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास झालेला आहे. या वेगवेगळ्या भाषा मुळीच नसून मराठीचाच हा बारदाना आहे असे ल. रा. पांगारकर यांनी सोदाहरण दाखवून दिलेले आहे.
मराठीतले आद्यग्रंथ मानले जाणारे 'लीळाचरित्र', 'ज्ञानेश्वरी', 'विवेकसिंधू' हे मराठी प्रगल्भ व श्रीमंत झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. जागतिक तोडीचे असे ग्रंथ भाषेच्या बालवयात निर्माण होणे शक्य आहे का? आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत हे जागतिक दर्जाचे ग्रंथ लिहिले गेले ती त्याच्या आधी हजार बाराशे वर्षे अत्यंत समृद्ध भाषा होती याचे शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे आज उपलब्ध झाले आहेत.
मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ सुमारे दोन हजार वष्रे जुना असून, त्याचे नाव 'गाथासप्तशती' असे आहे. संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली, असा संतप्त सवाल संत एकनाथांनी विचारला होता. एकनाथांची भाषा आजची मराठी भाषा असूनही ते तिला प्राकृत म्हणतात. यावरून या दोन वेगळ्या भाषा नाहीत हेच स्पष्ट होते. ज्ञानेश्वरांनी मराठीला देशी भाषा म्हटलेले आहे. हेमचंद्रांचे 'देशी नाममाला' हे या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध आहे.वररुची (कात्यायन), चंड, हेमचंद्र, त्रिविक्रम, वसंतराज, मार्केंडेय, लक्ष्मीधर या ख्यातनाम व्याकरणकारांनी महाराष्ट्रीला सर्वाधिक महत्वाचे स्थान दिलेले आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेकडे सुमारे 30 हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध असून त्यातील दीड ते दोन हजार वर्षे जुन्या असलेल्या सुमारे ८0 ग्रंथांमध्ये मराठी भाषा सापडते. त्यात संस्कृतातील कालिदासाचे शाकुंतल (चौथे शतक) आणि शुद्रकाचे मृच्छकटिक (सहावे शतक) यांच्यासह प्रवरसेनाचे सेतुबंध (पाचवे शतक), वाक्पतीराजाचे गौडवध [इ.स.७५०], भद्रबाहूचे आवशयका निरयुक्ती (तिसरे शतक), विमलसुरीचे पौमचरिया (पहिले ते तिसरे शतक),लीलावती-कौतुहल[आठवे शतक] आदींचा समावेश आहे. रामायण, महाभारतातही शेकडो मराठी शब्द सापडतात. दोन हजार वर्षांपूर्वी 'बृहत्कथा' हा पैशाची भाषेतील ग्रंथ गुणाढय़ या मराठी लेखकाने लिहिलेला आहे. 'विनयपिटक', 'दीपवंश', 'महावंश' या बौद्ध ग्रंथांमध्ये पाली व सिंहली भाषेत महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. मोगलिपुत्तातिष्य याने काही 'थेर' म्हणजे र्शेष्ठ धर्मोपदेशक निरनिराळ्या देशांना पाठवल्याचा उल्लेख आहे. पैकी 'महारठ्ठ' देशात थेरोमहाधम्मरखिता यास पाठवले, {'रक्खितथेरं वनवासि योनक धम्मरक्खित थेरं अपरंकतं महाधम्मरक्खित थेरं महारठ्ठ.'} असे त्यात म्हटले आहे.
  हार्वर्ड विद्यापिठाचे प्रा.विट्झेल यांचे ताजे संशोधन सांगते की, संस्कृत ही  वैदीक भाषेतून विकसित झाली. वैदीक भाषा ही त्या आधीच्या वैदीकपूर्व बोली भाषांमधून जन्मली. मराठी ही मुख्यत: महाराष्ट्राची लोकभाषा असून वेदपूर्वकाळापासून चालत आलेल्या वैदीकपूर्व बोलीतून जन्माला आलेली आहे. आजपर्यंत मराठीवर आर्यांची बोलीभाषा, वैदिक, संस्कृत व विविध प्राकृत तसेच द्रविडी भाषा यांचा परिणाम जरुर झालेला असला तरी मराठी ही संस्कृतची मुलगी नक्कीच नव्हे. मराठीत तत्सम, तद्भव व देश्य यात तीनही प्रकारचे शब्द आढळतात. महाराष्ट्री म्हणून जी प्राकृत भाषेतील विशेष प्रौढ व वाड्मयीन भाषा तीच मराठी होय. मराठी भाषेतील पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा आहे. तो ब्राह्यी लिपीतील असून, तो पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील आहे. या शिलालेखात 'महारठिनो' लोकांचा स्पष्ट उल्लेख आहे. डॉ. वा. वि. मिराशी यांनी आपल्या ’सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख' या ग्रंथात हा शिलालेख प्रकाशित केला आहे. (''..व महरठिनो अंगियकुलवधनस सगरगिरिवलयाय पथविय पथमवीरस वस.. य महतो मह.. '' अनुवाद- ''..महारठी अंगिय कुलोत्पन्न गिरिसमुद्रवलयांकित पृथ्वीवरील वीर्शेष्ठ.. महान अशा पुरुषांत र्शेष्ठ अशा..'') असेच उल्लेख कार्ले,भाजे, बेडसे येथील शिलालेखातही मिळतात.मराठी भाषा ब्राम्ही,देवनागरी आणि मोडी लिपीत लिहिली गेलेली आहे. संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याआधी महाराष्ट्री भाषा अस्तित्वात होती. एवढेच नाही तर ती प्रगल्भ झालेली होती. हाल सातवाहनाची 'सत्तसई', जयवल्लभाचा 'वज्जालग्ग' हा सुभाषित कोश, प्रवरसेन वाकाटकाचे 'रावणवहो', वाक्पतीराजाचे 'गऊडवहो' ही महाकाव्ये हे महाराष्ट्री प्राकृतातील मुख्य ग्रंथ. पैकी 'सत्तसई' व 'रावणवहो' नि:संशय महाराष्ट्रात लिहिले गेले. उद्योतनसुरीने इ. स. ७७८मध्ये लिहिलेल्या 'कुवलयमाला'त 'मरहट्ट' भाषेचा उल्लेख आहे. {'दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य। दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे।' बळकट, ठेंगण्या, सावळ्या अंगाच्या काटक, अभिमानी, भांडखोर, दिण्णले (दिले), गहिल्ले (घेतले) असे बोलणाऱ्या मराठ्यांस त्याने पाहिले.) असे तो म्हणतो.
'महाराष्ट्राश्रया भाषां प्रकृष्ट प्राकृतं विदु:।' असे महाकवी दंडी [६ वे शतक] म्हणतो. म्हणूनच महाराष्ट्री प्राकृत हा महाराष्ट्रीयांचा अभिमानविषय आहे. महाकवी बाणभट्ट (सातव्या शतकाचा प्रथमार्ध) याने हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाथा कोशाचा उल्लेख केला आहे. अपभ्रंशापासून मराठी निघाली, हे डॉ. वि. भि. कोलते यांनी वाड्मयीन पुराव्याने सिद्ध केले आहे. वराहमिहिराने 'बृहत्संहिते'त महाराष्ट्रीयांविषयी 'भाग्ये रसविक्रयिग: पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्र': असे म्हटले आहे. (बृहत्संहिता 10.8) ऐहोळे शिलालेखात (इ.स. 634) सत्त्याश्रय पुलकेशी (चालुक्य) हा तिन्ही महाराष्ट्राचा सार्वभौम राजा झाल्याचा उल्लेख आढळतो. (एपि. इं. 6.4). प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग (इ. स. 629 ते 645) महाराष्ट्रास 'मोहोलाश' असे संबोधून त्याविषयी विस्ताराने लिहितो.राजशेखर स्वत:ला 'महाराष्ट्र चुडामणी' म्हणवून घेतो.
राजाराम शास्त्री भागवत, ज्ञानकोशकार केतकर, शं.गो.तुळपुळे, अन फेल्डहाऊस,विट्झेल, पांगारकर, मिराशी,कोलते,यांची मांडणी आणि  शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्या, प्रकाशित ग्रंथ या सार्‍यांच्या संशोधनातून  एक 'प्रमाणक परिवर्तन' (पॅराडाइम शिफ्ट) होणार असून मराठीची श्रेष्टता, मौलिकता, प्राचिनता आणि प्रवाहीपण याबाबत शिक्कामोर्तब करणारी अभिजात दर्जाची मोहोर उमटणार आहे. मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे.आजवर सुमारे एक लाख पुस्तके प्रकाशित झालेल्या मराठीत दरवर्षी  दोन हजार पुस्तके प्रकाशित होतात. पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटीमोठी सुमारे दोनशे साहित्य संमेलने होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल,तसेच पाठ्यपुस्तके, धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे दोनशे पन्नस कोटींपर्यंत आहे. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राबाहेरील १५ विद्यापिठांमध्ये मराठी शिकवली जाते. देशातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यात आणि जगातील ७२ देशांमध्ये मराठी भाषकांची वस्ती आहे.सव्वा अकरा कोटी लोकांच्या या राष्ट्रीय ज्ञानभाषेला, महानुभाव आणि जैनांच्या धर्मभाषेला, अमृतातेही पैजा जिंकणार्‍या अभिजात मराठीला तिच्या लेकरांचा एकमुखी पाठींबा मिळाला तर तिला या दर्जापासून कोणीही रोखू शकणार नाही.

Thursday, May 16, 2013

'रिंगणा'तल्या संपन्न अनुभवाचे 45 दिवस

 (प्रमिती नरके)










Sunday, April 14, 2013 AT 02:30 AM (IST)
"बर्टोल्ट ब्रेख्तचं वैचारिक नाटक बसवण्याच्या प्रक्रियेतून खूप काही शिकायला मिळालं. "आंतररूप ते बाह्यरूप' या पद्धतीनं ग्रुशाची भूमिका मी सादर केली. कलाकार म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही काहीतरी नवं गवसल्यासारखं वाटलं...'' ललित कला केंद्रातल्या विद्यार्थिनीनं शब्दबद्ध केलेला हा अनुभव... 

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. "ललित'च्या नाट्य विभागाचे प्रमुख प्रा. प्रवीण भोळे यांचं गेल्या पाच वर्षांपासूनचं स्वप्न होतं, की "व्ही लान्झी हे "बर्टोल्ट ब्रेख्त' लिखित जर्मन नाटक सादर करावं. हे स्वप्न या वर्षी साकारलं जाणार असल्याची सूचना लागली होती. या नाटकाचं "रिंगण" हे मराठी रूपांतर "द कॉकेशिअन चॉक सर्कल' या एरिक बेंटलीच्या इंग्रजी भाषांतरावरून सरांनी स्वत: केलं. या नाटकाच्या ऑडिशनसाठी "इसापनीती'मधली एक गोष्ट तात्पर्य पटवून देण्यासाठी सादर करायची, असं जाहीर झालं. याआधी जितकी नाटकं आम्ही बसवली, पाहिली, ऐकली, त्या वेळी कधीच ऑडिशन झाली नव्हती. ही ऑडिशन संगीत आणि नृत्याच्या विद्यार्थ्यांनाही खुली होती. प्रत्येकानं आपापल्या परीनं वेगवेगळे घटक वापरून गोष्टी सादर केल्या. त्यातून पहिल्याच दिवशी आम्ही शिकलो, की कोणत्याही गोष्टीचं एकच एक तात्पर्य नसतं, तर त्याला इतरही अनेक पैलू असतात. त्यामुळं नकळत विचारांची दिशा बदलली. वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून नाटकाकडं पाहण्याची वाटचाल सुरू झाली. पहिल्या आठवड्यात वेगवेगळे गट करून चिऊ-काऊची गोष्ट, लाकूडतोड्याची गोष्ट अशा लहानपणीच्या गोष्टी आजच्या काळाशी, समाजाशी जोडत, त्यातला राजकीय संदेश समोर यावा, अशा रीतीनं सादर केल्या. दुसऱ्या आठवडयात एमए च्या विद्यार्थ्यांनी ब्रेख्तच्या "एपिक थिएटर'विषयी आपापले शोधनिबंध सादर केले. त्यावरून आपण करत असलेल्या इम्प्रोवायजेशन्सचा नाटकाला कसा फायदा होणार आहे, याची कल्पना आली. यानिमित्तानं ब्रेख्तच्या कथक रंगभूमीचा, डाव्या विचारसरणीचा अभ्यास झाला. ऍक्‍टर-नॅरेटर संकल्पना,(अभिनेता-निवेदक) एलिअनेशन इफेक्‍ट, प्रेक्षकांना गुंतवून न ठेवता "हे' नाटक चालू आहे, ही जाणीव करवून देणं', 'स्थळ-काळ-वेळ बदल' या सर्व ब्रेख्तियन वैशिष्ट्यांशी परिचय झाला.

वेगवेगळ्या चाली, देहबोली, आवाज शोधून काढत प्रत्येकानं स्वत:साठी वेगळं असं "कॅरिकेचर' तयार केलं. माझ्यासाठी हे खूप नवीन असल्यामुळं यावर प्रेम जडलं होतं. तेव्हाच यातलं मुख्य पात्र "ग्रुशा" ही भूमिका मी करणार असल्याचं कळल्यावर प्रचंड आनंद झाला. हे पात्र नाटकातल्या इतर पात्रांपेक्षा वेगळं म्हणजेच वास्तववादी होतं. त्यामुळं शरीराच्या, आवाजाच्या विविध लकबी वापरण्यासाठी इतरांएवढा वाव नव्हता; परंतु ही एक मोठी जबाबदारी होती. याआधी उत्तरा बावकर, भक्ती बर्वे या नामवंत अभिनेत्रींनी "ग्रुशा' साकारली होती. सरांच्या मार्गदर्शनाखाली पात्रांचा अभ्यास करत असताना दोन पद्धती समोर होत्या. एक म्हणजे "बाह्य ते आंतररूप प्रवास' आणि दुसरी म्हणजे "स्टेनिसलावस्की पद्धती'नुसार "आं तररूप ते बाह्यरूप' असा उलटा प्रवास. सरांनी जाणीवपूर्वक दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करायला सांगितला. त्यानुसार नाटकाचं मुख्य उद्दिष्ट, प्रत्येक दृश्‍यामागचं उद्दिष्ट व त्यामागचं उद्दिष्ट आणि त्यात येणारे अडसर अशा पद्धतीनं "ग्रुशा" शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला.

यादरम्यान सरांनी आम्हाला काफ्काची न्यायाविषयी भाष्य करणारी एक प्रतीकात्मक कथा सांगितली. नाटकातील "अजदक' या पात्राचे न्यायाविषयीचे विचार हे वरवर पाहता मूर्खपणाचे वाटत असले, तरी ते अतार्किक नसून त्यामागचा ब्रेख्तचा राजकीय दृष्टिकोन समोर येण्यास या गोष्टीमुळं अधिक मदत झाली. या गोष्टीचा नाटकात अंतर्भाव केल्यामुळं न्यायाचा दरवाजा व त्याविषयी दोन विचारवंतांचे (ब्रेख्त व काफ्का) दोन वेगळे विचार प्रेक्षकांसमोर मांडले गेले.

अल्लड, मनमौजी जीवन जगणारी दासी ग्रुशा आपल्या सैनिक प्रियकराबरोबर उर्वरित आयुष्य सुखात घालवण्याचं स्वप्न रंगवत असतानाच राज्यात युद्धपरिस्थिती निर्माण होते. शत्रूच्या तावडीतून गव्हर्नरच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी ती प्रतिकूल परिस्थितींवर मात करत त्याला घेऊन पळून जाते व त्याचा सांभाळ करते. युद्ध संपल्यावर अचानक त्याची फरार झालेली खरी आई उगवते आणि संपत्तीच्या वारसासाठी त्याच्यावर हक्क सांगू लागते. न्यायाधीश अजदक याचा निकाल देण्यासाठी विक्षिप्त अशी, रिंगणातून मुलाच्या खेचाखेचीची, परीक्षा घ्यायला सांगतो. मुलाच्या प्रेमापोटी ग्रुशा त्याचा त्याग करते; पण शेवटी अनपेक्षितपणे तिला मुलाचा ताबा मिळतो. अजदकने दिलेले न्याय-निवाडे हे एका वेगळ्याच दिशेनं विचार करायला लावतात. असं हे छोटी उपकथानकं असलेलं गुंतागुंतीचं नाटक.

प्रयोगाला बारा दिवस उरलेले असताना सरांनी धक्काच दिला. नाटकातला तुटका पूल पार करण्याचा प्रसंग ग्रुशा दोरीवरून चालून करेल, असं त्यांनी सांगितलं. मला वाटलं, सर चेष्टा करत आहेत; पण दुसऱ्या दिवशी खरंच प्रॉपर्टीज्‌मधून एक लांबलचक दोरखंड बाहेर निघाला. साधारण दहा फूट उंचीवर दोन खांबांना तो बांधला गेला आणि सुरू झाली "तारेवरची कसरत'! नाटकाच्या तालमीव्यतिरिक्त ही दोरावरून चालण्याचीही तालीम सुरू झाली. पहिल्याच प्रयत्नापासून आपण करू शकू, असा आत्मविश्‍वास वाटू लागला. रंगीत तालमीपर्यंत तर, आपण यात तरबेज झालो आहोत, असं वाटू लागलं होतं. पहिल्या प्रयोगाला खचाखच गर्दी झालेली असताना दोरीवरून काही पावलं चालून गेल्यावर अचानक पाय घसरला आणि प्रेक्षकांमधून "स्स्‌ऽऽऽ' असा स्वर ऐकू आला. मी दोन्ही हातांनी दोरीला लटकत होते. माझं हृदय इतक्‍या वेगानं धडधडत होतं, की मला वाटलं, ते छाती फोडून बाहेर उडीच मारेल की काय! आपण साऱ्या सीनचा विचका केला, ही जाणीव टोचत होती आणि मी हातानंच दोरीला लोंबकळत पुढं पुढं जाऊ लागले. अर्धा रस्ता पार झाला आणि हातांतला जीव संपला, त्यासरशी ग्रुशा दोन हजार फूट दरीमध्ये पडली! पण या भूलचुकीकडं प्रेक्षकांनी दुर्लक्ष केलं आणि प्रयोग पूर्णत्वास गेला. तालमीत एकदाही न पडता प्रयोगात मात्र फजिती झाल्यानं माझा आत्मविश्‍वास खूपच खच्ची झाला होता. मात्र सर, रूपालीताई आणि माझे सर्व सहकलाकार यांच्या पांठिब्यामुळं पुढचे दोन्ही प्रयोग दणक्‍यात पार पडले आणि विशेषत: या सीनला प्रचंड टाळ्या पडल्या.

हे नाटक "ललित'च्या अंगणमंचात सादर झालं. तिन्ही प्रयोग हाऊसफुल होते. काही प्रेक्षक तर तिन्ही प्रयोगांना आले होते. मकरंद साठे यांनी "नाटकात 46 जण वेगवेगळे न वाटता सर्व जण एकात्म दिसत होते. प्रत्येकाला आपण काय आणि कशासाठी करतोय, याची स्पष्ट जाणीव असल्याचं दिसलं,' अशी कौतुकाची थाप पाठीवर दिली. या यशाचं पूर्ण श्रेय भोळेसरांना जातं. त्यांनी सुरवातीपासूनच आमच्या मनावर हे बिंबवलं, की "नाटकाचा प्रयोग महत्त्वाचा नसतो, तर प्रोसेस महत्त्वाची असते.' त्या प्रक्रियेतून केवळ नट म्हणूनच नव्हे; तर माणूस म्हणूनही आम्हाला खूप काही नव्यानं गवसलं.

सरांनी प्रत्येक विद्यार्थी-नटाला, लेखकाचं म्हणणं काय आहे, याची जाणीव करून दिली. प्रत्येकाचं त्याबद्दल स्वतःचं मत तयार होत गेलं व त्यातून या नाटकाचा प्रयोगाविष्कार साकार झाला. दत्तप्रसाद रानडे यांनी संगीत, निरंजन गोखले यांनी प्रकाशयोजना तर परिमल फडके यांनी नृत्यदिग्दर्शन जीव ओतून केलं. नाटकाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये महत्त्वाचा सहभाग असलेल्या रूपाली भोळे म्हणजे आमची लाडकी रूपालीताईच बनली. 45 दिवसांचा ही शैक्षणिक अनुभव...! पण तरीही जणू काही "पिकनिक'च वाटावी, असा हा अनुभव होता, एवढं खरं.

Thursday, May 9, 2013

"महात्मा" पदवीचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव...११मे २०१३.




................................................
जोतीरावांनी सर्वांना शिक्षण, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन,संसाधनांचे फेरवाटप,ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह,सामाजिक न्याय या कार्यक्रमपत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम केले.ख्यातनाम विचारवंत डा. रामचंद्र गुहा यांनी त्यामुळेच जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे.बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपला गुरू मानत असत. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी  म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा थे."  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते.
..................................................

आजपासुन १२५ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. ११ मे १८८८ रोजी मुंबईतील हजारो कामगारांनी भायखळ्याला एकत्र जमून समाजक्रांतिकारक जोतीराव फुल्यांना "महात्मा" ही पदवी दिली. सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्त्याला अशी पदवी देवून सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती.जोतीरावांच्या वयाला ६१ वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईकरांनी हा समारंभ आयोजित केला होता.मांडवी कोळीवाड्यातील रघुनाथ महाराज सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.भायखळ्याच्या परिसरात या दिवशी सणासुदीचा उत्साह होता. नारायण मेघाजी लोखंडे, दामोदर सावळाराम यंदे,स्वामी रामय्या व्यंकय्या आय्यावारू, रावबहादूर वंडेकर,मोरो वि्ट्ठल वाळवेकर, भाऊ डुंबरे पाटील आदींनी पुढाकार घेवून हा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाला हजारो आग्री,कोळी,भंडारी बांधव उपस्थित होते.
जोतीरावांनी सर्वांना शिक्षण, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन,संसाधनांचे फेरवाटप, ज्ञाननिर्मिती,धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम केले.ख्यातनाम विचारवंत डा. रामचंद्र गुहा यांनी त्यामुळेच जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे.बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपला गुरू मानत असत. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी  म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा थे."  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. 
१३१ वर्षांपुर्वी प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक झाले पाहिजे अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली होती.अशी मागणी करणारे ते संपुर्ण आशिया खंडातले पहिले शिक्षणतज्ञ होते. शिक्षणहक्क कायद्याद्वारे २०१० साली ती नुकतीच पुर्ण झाली.१४० वर्षांपुर्वी त्यांनी आपला "गुलामगिरी" हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रो चळवळीला अर्पण केला होता.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भारतभेटीत ही अर्पणपत्रिका बघुन या महात्म्याला "सलाम" केला. जागतिक सामाजिक चळवळींना असा पाठिंबा देण्याचे त्याकाळातले असे दुसरे उदाहरण सापडणार नाही.
शेती परवडत नाही म्हणून आजवर देशातील लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केलेल्या आहेत. १३० वर्षांपुर्वी त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही असे "शेतकर्‍याचा असूड" मध्ये सांगून या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले होते. आधुनिक पद्धतीची शेती करणे, तलावतळी,धरणे बांधून शेतीला "नळाद्वारे" पाण्याचा पुरवठा करणे, शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता.अशाप्रकारे आजच्या ठिबक सिंचनचे बीजरूपच जणू ते दाखवित होते.
त्यांच्या शाळांमध्ये मुलामुलींना वयाच्या ६व्या वर्षापासून शेती आणि उद्योगाचे शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले होते.त्यांनीच पहिल्यांदा त्रिभाषा सुत्र सुचवले. शैक्षणिक गळतीच्या प्रश्नाचे मूळ शोधून त्यावर गरिब मुलांना विद्यावेतन {पगार} देण्याचा उपाय त्यांनी अमलात आणलेला होता.त्यांनी दाखवलेल्या याबाबतच्या इतर १५ कारणांचा आणि उपायांचा  अभ्यास आजही मार्गदर्शक ठरावा. 
द्रष्टे शिक्षणतज्ञ म्हणून जोतीरावांची प्रस्तुतता आजही कमी झालेली नाही.
१८७६ ते १८८३ याकाळात ते पुण्याचे आयुक्त {कमिशनर} होते. घरोघरी बंद नळाद्वारे पाणी पुरविण्याची योजना यशस्वी करण्यासाठी ते झटले.उत्तम रस्ते, शाळा, आरोग्य, शहर स्वच्छता यावर त्यांचा भर होता.गव्हर्नरच्या स्वागतावर अनाठायी पैसा उधळण्याला तसेच मंडईच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला.त्याच पैशाचा वापर शिक्षणासाठी करावा असा त्यांचा आग्रह होता.आज शहरातील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रुप धारण केलेले आहे. या पार्श्वभुमीवर कमिशनर फुले यांनी आपल्या घरातील अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठीसुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला बघून चकित व्हायला होते.
स्वत: फुले एक बांधकाम व्यावसायिक होते. कात्रजचा बोगदा, बंडगार्डनचा पुल, डावा कालवा, रस्ते, इमारतींची अनेक कामे त्यांच्या "पुणे व्यावसायिक आणि कंत्राटदार कंपनी"द्वारे करून पुण्यातील एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांनी नावलौकिक कमावलेला होता. बिल्डर या शब्दाला आता "आदर्श" रुप प्राप्त झाल्याने ते बिल्डर होते असे म्हणायची हिंम्मत मी करणार नाही. पण ते "नेशन बिल्डर" होते याबाबत दुमत होवू शकत नाही. शेयर बाजारात यशस्वी होण्यासाठी कोणती  दक्षता घ्यावी  यावर त्यांनी कविता लिहिल्या. ते ग्रंथप्रकाशनाच्या व्यवसायात होते. दागिन्यांचे साचे विकण्याची त्यांच्याकडे एजन्सी  होती. शेती,उद्योग,व्यापार यातली त्यांची ही चौफेर कामगिरी पाहिली की ते मुळात सामाजिक नेते असूनही ते उत्तम उद्योगपती कसे होवू शकले यावर खूप लिहिता येईल.
भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतीरावांचेच प्रोत्साहन होते.टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यातही तेच दोघे पुढे होते.१८६९ साली जोतीरावांनी शिवचरित्र लिहिले. १८८५ साली  त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडवरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणुन लोकमाणसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत. 
सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली.आजचे सामाजिक न्यायाचे सगळे राजकारण याच सुत्राच्या भोवती फिरते आहे.जोतीरावांच्या  राजकारण समजून घेण्यासाठी "सत्तेवाचून सकळ कळा झाल्या अवकळा" हे जोतीसुत्र समजून घेतले पाहिजे. त्यांचा विरोध शोषणकर्त्या नेतॄत्वाला होता. त्यावेळी हे नेतॄत्व ब्राह्मणांकडे होते.हा समाज त्यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक सत्तेच्या सगळ्या किल्ल्या स्वत:च्या कंबरेला बाळगून होता. जोतीराव पर्यायी संस्कृतीचे जनक होते.आज समग्र सत्ता परिवर्तन झालेले आहे.आता सगळी सुत्रे बहुजनांकडे आलेली आहेत. आज जोतीराव असते तर त्यांनी आसुडाचे  फटके कोणाला मारले असते? "ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधूपरी!" असे पोटतिडकीने सांगणार्‍या जोतीरावांच्या नावाचा वापर जातीविद्वेष पसरवण्यासाठी केला जावा ही शोकांतिका आहे.सत्ता समग्र बहुजनांपर्यंत झिरपलेली नाही.भटकेविमुक्त, दलित-आदिवासी,ओबीसी,महिला यांची परवड चलू आहे.
देशातील सत्ताधारी वर्गाचे अपयश लपवण्यासाठी आणि वर्ग,जाती,धर्म व लिंगभावाच्या आधारे केले जाणारे शोषण आणि पक्षपात यांच्यावर पांघरूण घालण्यासाठी आज जातीविद्वेषाच्या वणव्याचा सर्रास आधार घेतला जातो आहे.अशावेळी जोतीरावांचा विवेकी वारसा समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या कालसुसंगत संकल्पचित्राच्या प्रकाशात सामाजिक ऎक्याची चळवळ मजबूत करण्यासाठी यानिमित्ताने पुढाकार घेतला जायला हवा.
...................................................................................................................................